रविवार, ३१ मे, २०१५

झाडे आख्यान

- खूप झाडे लावली पाहिजेत.
- झाडे लावा झाडे.
- ही जागा रिकामीच आहे ना, इथे झाड लावून टाका.
- रिकाम्या जागा झाडांनी भरा.
- काय तुम्ही झाडांचे शत्रू...
- किती रखरखीत आहे इथे, झाडे का लावत नाही.
- झाडांशिवाय जगणं हे पाप आहे.
- जितकी माणसे तितकी झाडे.
- घराचं सौंदर्य महत्वाचं आहे, पण झाडे त्याहून जास्त महत्वाची आहेत.
- झाडांशी शत्रुत्व करून इमारतींचं सौंदर्य वाढवलं तर, आपलं आणि जगाचं सौंदर्य कोमेजून जाईल.
- झाडांसाठी एखाद्याशी भांडण करायलाही हरकत नाही.
- सगळ्यांशी गोड बोलावेच, पण झाडांच्या शत्रूंशी तिखट आणि कडू बोलायला हरकत नाही.
- आपसात खूप काही निरर्थक बोलण्यापेक्षा थोडे झाडांशीही बोलावे.
- आपला स्वार्थ म्हणून तरी झाडे लावा, जगवा, वाढवा, जोपासा.
- झाडांशी शत्रुत्व म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे.
- झाडांचे महत्व न कळणाऱ्याला स्वार्थसुद्धा कळत नाही, असेच म्हणावे लागेल.

ही आणि यासारखी वाक्ये आपल्या रोजच्या बोलण्यात, व्यवहारात यायला हवीत. त्यातून एक सकारात्मक वातावरण नक्कीच तयार होईल. अन्य टिवल्या बावल्या फक्त १% कमी करून तो वेळ, ती उर्जा, तो उत्साह, ती सक्रियता झाडे (वृक्ष या अर्थाने. बाल्कनीत एखाद्या छोट्याशा कुंडीत लावलेलं दुर्लक्षित तुळशीचं रोपटं या अर्थाने नव्हे.) या विषयाकडे लावली तरी परिस्थितीत खूप फरक पडेल. सुरुवातीला कंटाळवाणं वाटू शकेल. पण हा सगळा सवयीचा भाग असतो. चित्रपट आणि क्रिकेट सारख्या कंटाळवाण्या गोष्टी आपण आवडीने चघळतोच ना !!!

शांघाय शहराची चर्चा आपल्या येथे जुनी आहे. पंतप्रधान मोदी तेथे गेल्याने तिला पुन्हा उजाळा मिळाला. तेथील वर्णनात्मक माहितीपट पाहताना जाणवला तो तेथील झाडांचा अभाव. आम्हाला अशी शहरे नको, असे मोदींना सांगण्याची ताकद सुद्धा आपण ठेवली पाहिजे. मोदींमुळे स्वच्छता या विषयालाही चांगले दिवस आले आहेत आणि ते चांगलेच आहे. पण स्वच्छता ही निसर्ग, झाडे, माती, पशू पक्षी यांच्याशी विरोधी स्वरुपात पाहिली व आचरली जाऊ नये.

झाडांचे प्रेम आम्हालाही आहे, पण त्यासाठी जंगले वाढवा. झाडांची ब्याद शहरात, घरांजवळ आणि आपल्या रोजच्या जगण्यात नको; ही भूमिकाही टाकून द्यायला हवी. झाडांची, निसर्गाची, मातीची, पशू पक्ष्यांची जवळीक वाढली तर माणसातली पशू वृत्ती, स्वार्थी वृत्ती हळूहळू आपोआप कमी होते हेही लक्षात ठेवायला हवे. प्रदूषण दूर करण्यासोबतच माणसाला माणूसपण मिळवून देण्यात निसर्गाचा वाटा असतो. त्याकडे डोळेझाक नको.

अनोखे कोकणची सोनल

आज अचानक आठवली सोनल. `अनोखे कोकण'मधील सोनल. `अनोखे कोकण' हे एक प्रदर्शन आहे गणपती पुळेचं. गणपती पुळे या कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रसिद्ध ठिकाणी असलेलं. जुन्या कोकणातील गाव कसा होता. त्याचे व्यवहार कसे चालत वगैरे या ठिकाणी शिल्पांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रदर्शन पाहायला गेलो तेव्हा ते दाखवण्यासाठी आणि समजवण्यासाठी जी मुलगी माझ्यासोबत मार्गदर्शक म्हणून होती ती सोनल. अशा आजूबाजूच्या खेड्यातील काही मुली तिथे काम करतात. त्यांना तयारही छान केले आहे. त्या सारे समजावून सांगतात. हे `अनोखे कोकण' दाखवताना आम्ही एका शिल्पासमोर उभे राहिलो. सोनल सांगू लागली- `हा कासार. हा मुलींना, बायांना बांगड्या भरून देतो. लहान मुलींना बांगड्या भरून देण्याचे तो पैसे घेत नाही. दहाव्या बाराव्या वर्षी मुलीचे लग्न होत असे. तेव्हाही हा बांगड्या भरून देत असे. तेव्हा त्याला मुलीचे वडील एक सोन्याचा तुकडा देत असत. तो त्याला पुरे. दुसऱ्या एखाद्या मुलीचं लग्न होईल तेव्हा पुन्हा दुसरा सोन्याचा तुकडा. एक प्रकारे आजच्या भाषेत सांगायचं तर, तो दहा वर्षांचं क्रेडीट देत असे.' त्या शिडशिडीत बांध्याच्या काळ्यासावळ्या कोकणी खेड्यातील सोनलच्या तोंडून क्रेडीट शब्द आला तेव्हा छान वाटलं. तिला त्याचा अर्थ फार समजत असावा किंवा नसावा. ती शिकवल्याप्रमाणे सांगत होती. पण नकळत माझ्यासारख्या शहरी माणसाला आपल्या समाज जीवनात मुरलेल्या विश्वास आणि मानवतेचं दर्शन मात्र त्यामुळे घडलं होतं. आजच्या अर्थकारणात लोप पावलेल्या आणि पारंपरिक अर्थकारणाचा जणू आधारच असलेल्या विश्वास आणि मानवता, या दोहोंची रुजवणूक पुन्हा कशी होऊ शकेल? सगळ्यांनी विचार करावा असाच प्रश्न आहे, नाही का?

ओवैसीच्या युक्तिवादाच्या निमित्ताने

गोहत्या बंदीला विरोध करताना खा. असदुद्दिन ओवैसी अनेक मुद्दे मांडत होते. त्यातला एक मुद्दा होता- आमच्या खाण्याच्या सवयी आणि आवडीनिवडी आम्ही का बदलाव्यात? वरवर बिनतोड वाटणारा हा बुद्धिवादी युक्तिवाद तद्दन तकलादू आहे. खाण्यापिण्याच्याच नव्हे तर अनेक सवयी, आवडीनिवडी जगभरातील मनुष्यप्राणी सतत बदलत आला आहे. गायीचेच कशाला नरमांसभक्षण करणारेही अनेक जण पूर्वी होते. आजही थोडेच का होईना आहेत. ती सवय माणसाने बदललीच ना? पूर्वीचा मानव मृगयाजीवी होता. आज अनेक देशांमध्ये अनेक गोष्टींच्या शिकारीवर बंदी आहे. मृगयाजीवीतून उत्क्रांत होत आजचा मानव आकाराला आला आहे. चोरी हाच पिढीजात व्यवसाय असलेले लोक होते. म्हणून चोरीचे समर्थन करून ती अधिकृत व्यवसायाच्या यादीत टाकायची का? पूर्वी माणूस कपडे घालत नव्हता, आताही तसेच करावे का? खाणे, पिणे, राहणे, वागणे, बोलणे, चालणे, अशा अनेक सवयी आणि आवडीनिवडी सतत बदलत असतात. गरजा, उपलब्धता, संवेदनशीलता, आदर, प्रेम, सहअस्तित्वाची गरज, जाणिवांचा स्तर उंचावणे अशा अनेक कारणांनी हे होत असते. असे बदल करण्यास हट्टाने नकार देणे हीच कट्टरवादाची सुरुवात असते. आज संपूर्ण जगात मुसलमानांची किंवा इस्लाम मानणाऱ्या लोकांची जी प्रतिमा तयार झाली आहे, त्यामागे इष्ट बदल न करण्याची त्यांची वृत्तीच कारणीभूत आहे. खा. ओवैसी त्यांचेच प्रतिनिधित्व करतात असे म्हणावे लागेल. अन प्रसार माध्यमे अशा वृत्तीला जाणीवपूर्वक किंवा अजाणता खतपाणी घालत असतात असाही निष्कर्ष काढावा लागेल. अन्यथा, शेकडो गायींच्या गोशाळा चालवणाऱ्या मुसलमानांच्या मुलाखती प्रसार माध्यमांनी दाखवल्या नसत्या का? मुलाखती जाऊ द्या, त्यांच्या कामाची माहिती एक बातमी म्हणून तरी कधी या प्रसार माध्यमांनी दाखवली आहे का? गोंधळ माजवून बुद्धिभ्रम उत्पन्न करण्याच्या सध्याच्या शर्यतीत तारतम्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी सामान्य माणसाचीच अधिक आहे.

रविवार, २४ मे, २०१५

थोडे लक्ष इकडेही...

सध्या उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिरे, छंद वर्ग वगैरे बरेच सुरु आहेत. अनेक गोष्टी मुलामुलींना तिथे शिकवल्या जातात. पण असं लक्षात येतं की, खूप छोट्या छोट्या गोष्टी; आवश्यक असून आणि आयुष्यभरासाठी असूनही दुर्लक्षित राहतात.
१) चपला, जोडे नीट रांगेत ठेवणे. पादत्राणे दारापुढे काढू नये. पादत्राणे घालून घरात जाऊ नये. काही कामांच्या ठिकाणीही पादत्राणे आत नेता येत नाहीत. तिथे सरळ, जोडीने आणि रांगेत ती ठेवावी. कशीही टाकू वा फेकू नयेत.
२) सायकली किंवा अन्य वाहने नीट उभी करणे. वाहने दारापुढे उभी करू नयेत, अंतर ठेवून उभी करावीत, एका वाहनामागे लागून दुसरे वाहन उभे करू नये. आपल्याला वा दुसऱ्याला काढता येईल अशी वाहने उभी करावी.
३) रुमाल, पेन, मोबाईल, पाकीट, किल्ल्या योग्य पद्धतीने जागच्या जागी ठेवावे.
४) कपड्यांच्या घड्या कशा घालाव्या. कपडे बोळे किंवा गोळे करून टाकू नये.
५) पायपुसणी कशी ठेवावी.
६) रिमोट, चार्जर इत्यादी वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात.
७) तेलाच्या बाटल्या, पावडरीचे डब्बे बंद करून ठेवावे. कंगवा साफ करून जागच्या जागी ठेवावा.
८) हातपुसणी (नॅपकिन्स) कोंबून किंवा गोळा करून न ठेवता मोकळे ठेवावे.
९) चादरी कशा आंथराव्या, खोळा कशा घालाव्या, पांघरुणांच्या घड्या कशा कराव्या.
१०) पाणी कसे भरावे. बादल्या भरताना किंवा नळाखाली लावताना काय काळजी घ्यावी.
११) भांड्यांवर झाकण्या कशा ठेवाव्या.
१२) केर काढणे, जाळी जळमट साफ करणे, केर भरणे.
१३) संडास, बाथरूमची स्वच्छता. संडास, बाथरूम वापरल्यानंतर स्वच्छ आणि नेटके करून बाहेर येणे.
१४) झाडांना पाणी टाकणे.
१५) गाण्यांचा वा टीव्हीचा आवाज मर्यादित ठेवणे.
१६) कचरा जागच्या जागी टाकणे.
१७) दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्याची चूक सुधारून घेणे किंवा देणे, स्वत:च्या हातापायाने काम करणे- यात काहीही वाईट, कमीपणाचे, अपमानजनक नाही हे समजावणे.
१८) धुतलेले कपडे नीट पिळून, झटकून, टोकाला टोक जुळवून वाळत घालणे.
१९) स्वयंपाक वा जेवणानंतर भांडी स्वच्छ करून, एकात एक घालून, त्यात पाणी घालून आटोपशीर पद्धतीने ठेवणे.
२०) पाण्याच्या बादल्या, टब, मग्गे अस्ताव्यस्त न ठेवणे.
२१) वर्तमानपत्र नियमित वाचणे आणि जुने वर्तमानपत्र पतंगीसारखे न उडवता, व्यवस्थित घडी घालून गठ्ठा करून ठेवणे.

यादी आणखीनही वाढू शकेल. पण या गोष्टी सांगणे, करवून घेणे, अंगी मुराव्या म्हणून त्याचा वारंवार सराव करून घेणे; या गोष्टी आढळत नाहीत. यामुळे चांगल्या सवयी, व्यवस्थितपणा तर निर्माण होईलच; पण सौंदर्यदृष्टी (ज्याचा प्रचंड अभाव जाणवतो) निर्माण होऊन जन्मभर या गोष्टींचा उपयोग होईल. घरात किंवा घराबाहेर होणारे अनेक संघर्ष सुद्धा कमी होऊ शकतील.

सोमवार, १८ मे, २०१५

ही लढाई बरी नव्हे...

एकदा युधिष्ठिराला विचारण्यात आले- `जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते?' त्यावर युधिष्ठीर म्हणाले- `माणूस रोज स्वत:च्या डोळ्यांनी मरण पाहतो आणि तरीही स्मशानातून बाहेर पडताना असा बाहेर पडतो की, आपण अमर आहोत. जगातील हे सगळ्यात मोठे आश्चर्य आहे.' युधीष्ठिरांच्या या उत्तरावर दुमत होण्याचे कारण नाही. उलट सगळ्यांना पटेल असेच ते उत्तर आहे. पुढच्या क्षणी काय होणार हे सांगता येत नाही, सगळ्या गोष्टींची अखेर मृत्यू आहे हेही ठरलेले आहे आणि तरीही माणूस असा वागत असतो की, तो जणूकाही अमरपट्टा घेऊन आलेला आहे.

अरुणा शानभाग या अभागी महिलेचा आज मृत्यू झाला. त्यासंबंधीचे वृत्त पाहताना युधीष्ठिराच्या या उत्तराची प्रकर्षाने आठवण झाली. खरे तर गेली ४२ वर्षे त्या मृत्यूची याचना करीत होत्या, कधी यमाकडे तर कधी तुमच्या आमच्या जगाकडे. आज अखेर तो दिवस उजाडला. `मी अरुणा' नाटकात अरुणा शानभाग यांची भूमिका करणाऱ्या चिन्मयी सुभाष यांची प्रतिक्रियाही ऐकली. त्यांनी नाटकाविषयी, अरुणा शानभाग यांच्याविषयी सांगितले. आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या- `आम्ही त्यांचा मोठा वाढदिवस साजरा केला होता. अर्थात त्यांना काहीच जाणीव नव्हती. ते सारे आपल्यासाठीच होते.' फार मोठा अर्थ या दोन वाक्यात आहे. खरंच जीवन म्हणजे काय? जगणे म्हणजे काय? पाच सहा फुटाचा देह, त्याचे अवयव, चालणारा श्वास की मेंदूची प्रतिक्रियाशक्ती? मेंदूची ही प्रतिक्रिया कितीही क्षीण असली किंवा समजण्याच्या पलीकडची असली किंवा अनाकलनीय असली, तरीही त्याला जीवन वा जगणे म्हणायचे? कशाला म्हणायचे जगणे? आम्हाला तो देह पाहिला की बरे वाटते म्हणून तो टिकवायचा? त्या देहातील जे कोणी आहे त्याला बरे वाटते वा नाही याचा विचार न करताच? धडधाकट शरीराच्या व्यक्तीला शरीर सोडावेसे न वाटणे स्वाभाविक असते. तसेच ते `गलितगात्र' या शब्दाच्याही पलीकडे गेलेल्याला वाटत असेल? अगदी सर्वोच्च न्यायालयानेही दयामरणाची याचिका फेटाळून लावली होती. त्यांची सेवा करणाऱ्या नर्सेसनी त्यावेळी पेढे वाटून आनंदही साजरा केला होता. पण खरेच `आपले वाटणे' यापलीकडे अशा गोष्टींना अर्थ असतो? मानवी जगण्याचा तराजू अशावेळी अकारण भावनांच्या बाजूने थोडा अधिक झुकतो का?

त्यांच्या अंत्यसंस्कारावरून झालेला वादही असाच दुर्दैवी. नाते आणि परंपरा यांचे कारण सांगून त्यांच्या अंत्यसंस्काराचा हक्क मागणे अयोग्यच आहे, पण आम्ही त्यांची सेवा केली म्हणून आम्हाला तो हक्क आहे हे म्हणणेही योग्य नाही वाटत. मुळात अंत्यसंस्कार करणे ही हक्काची बाब कशी असू शकते? आपण किती छोट्या छोट्या गोष्टीत अडकतो? अन युधिष्ठिराचे उत्तर आठवते. जिथे या सगळ्या जगालाच तात्पुरते अस्तित्व आहे तिथे अंत्यसंस्काराचा हक्क मागणे कसेतरीच वाटते नाही का? नर्सेसनी सुद्धा शव नातेवाईकांना देऊन टाकले असते तरी त्यांनी केलेली सेवा, त्यांचे समर्पण, त्यांची बांधिलकी कोणीही नाकारली नसती. नातेवाईकांचा तर प्रश्नच नाही. सहानुभूती पदरात पडून घेण्याचाच त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु खरा प्रश्न- कोण खरे, कोण खोटे वगैरे नाहीच. प्रश्न आहे- अधिकार वगैरेचा विचारच मुळात चुकीचा आहे हा. त्यातही माणूस गेल्यानंतर तर अशी अधिकारांची लढाई केविलवाणीच ठरते.

अर्थात हे काही नवीन नाही. अगदी सामान्य माणसांच्या सामान्य कुटुंबातही असे वाद होतात. कोणी अंत्यसंस्कार करायचे यावरून. संतांच्या शिष्यांमध्येही असे वाद झालेले आहेत आणि त्यापायी अंत्यसंस्कार दोन दोन तीन तीन दिवस रखडलेले आहेत. अलीकडच्या काळात गाजलेला वाद म्हणजे कवी ग्रेस यांचा. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी असाच वाद झाला होता आणि सुमारे दोन तास अंत्यसंस्कार खोळंबला होता. जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते, या प्रश्नावरील युधिष्ठिराचे उत्तर किती सार्वलौकिक होते याचाच प्रत्यय अशा वेळी येतो.

जीवन आणि मृत्यू यांचाही विचार अशा वेळी मनात येतोच. भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना जगण्याचा मुलभूत अधिकार दिलेला आहे असे म्हटले जाते. कधीकधी गंमत वाटते याची. राज्यघटना अस्तित्वात नव्हती तेव्हा तो अधिकार नव्हता का? हा अधिकार असा देता वगैरे येतो का? देता येतच असेल तर जन्माला घालणारा सोडून कोण तो देऊ किवा काढून घेऊ शकतो? मुळात जन्म म्हणजे काय? जगणे म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? दोघांचा काय संबंध? मृत्यू म्हणजे पूर्णविराम का? मृत्यू म्हणजे अस्तित्वहीन होणे का? भगवद्गीता तर म्हणते की- मृत्यू म्हणजे केवळ वस्त्र बदलणे. जीर्ण झालेले कायारूपी वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करणे. भारतीय चिंतन तर मृत्यू मानतच नाही. आम्ही अमृताचे पुत्र आहोत, अमर आहोत, आम्हाला मरण नाहीच असे ते म्हणते. जन्म अथवा मृत्यू याचा अर्थच आम्हाला कळलेला नसताना, त्यांच्या अधिकारांची वगैरे लढाई बरी वाटत नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १८ मे २०१५

सोमवार, ११ मे, २०१५

भुलभुलय्यात कुठवर फिरायचे?

वा वा... आधी सलमान, आता जयललिता. काहीच महिन्यांपूर्वी खुर्ची सोडावी लागलेल्या अम्मा चार आठ दिवसात पुन्हा मुख्यमंत्री होणार. आनंद आहे. कशाकशाचं कौतुक करायचं आम्ही? न्यायव्यवस्थेचं, लोकशाहीचं, प्रसार माध्यमांचं, पोलिसांचं, तपास यंत्रणांचं, नोकरशाहीचं, जनता जनार्दनाचं? घाबरू नका, थोड्याच दिवसात देशातील सगळे तुरुंग, पोलीस कोठड्या रिकाम्या होतील आणि देश पूर्णपणे गुन्हेमुक्त होईल. मग फक्त चालेल आरोग्यदायी स्पर्धा. कोण सत्तेवर येतो याची स्पर्धा, कोण भ्रष्टाचार अधिक करतो याची स्पर्धा, कोण किती गुंड पोसतो याची स्पर्धा, कोण किती मुडदे पाडतो याची स्पर्धा, कोण अमली पदार्थांची तस्करी वगैरे जास्त करतो त्याची स्पर्धा, कोण जास्तीत जास्त बेताल- बेमुर्वतखोर- उन्मत्तपणे- वागतो याची स्पर्धा. अन या स्पर्धेतून सर्वोत्तम तोच टिकेल आणि आबादी आबाद होईल. अर्थात ही स्पर्धा मान्य नसणारे उरणारच नाहीत, हे वेगळे सांगायला नकोच.

यातील प्रतिक्रियेचा भाग बाजूस काढून विचार केला तर लक्षात येते की- न्यायप्रक्रिया, व्यवस्था, फौजदारी व दंड संहिता, कायदे, नियम सगळंच आमूलाग्र बदलण्याची गरज आहे. त्याहीपेक्षा अधिक म्हणजे आपण स्वीकारलेली फार उदात्त वगैरे वाटणारी ब्रिटीश संसदीय व्यवस्था बदलण्याची गरज आहे. निवडणुका या सगळ्या वाईट गोष्टींची जननी आहे, हे प्रत्यक्ष राजकारणीही मान्य करतात. पण खरी जननी आहे आपली संसदीय व्यवस्था. मुळात लोकशाही याचा अर्थ फक्त आपल्या येथे असलेली संसदीय व्यवस्था एवढाच नाही. लोकशाहीच्या अन्यही व्यवस्था आहेत. मुख्य म्हणजे या व्यवस्थांमध्ये आणखीन भर टाकली जाऊ शकत नाही असेही नाही. पण त्यासाठी प्रथम प्रामाणिक मन, प्रामाणिक भावना आणि प्रामाणिक विचारांची गरज आहे. कायदे,

संसदीय व्यवस्था, एवढेच नव्हे तर ज्याचे अतिशय फाजील कौतुक केले जाते ते `फेडरल स्ट्रक्चर' सुद्धा बदलण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन घटना समिती बसवायला हवी. पण असा विचार जरी व्यक्त केला तरी केवढा आणि किती वेगवेगळा आकांत केला जाईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या उथळपणाला काहीही उपाय नाही. या जगातील सगळी क्षमता आणि बुद्धिमत्ता संपून गेलेली आहे असेच मानायचे असेल तर त्याला काय करणार? आज स्पष्ट, सत्य बोलण्याची सुद्धा कोणाची इच्छा आणि तयारी नाही. हे परिवर्तन घडवून आणणे तर दूरची गोष्ट राहिली. भुलभुलय्यात फिरण्यातच सार्थकता मानणाऱ्यांची कमी नाहीच ना?