आज
अचानक आठवली सोनल. `अनोखे कोकण'मधील सोनल. `अनोखे कोकण' हे एक प्रदर्शन
आहे गणपती पुळेचं. गणपती पुळे या कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रसिद्ध
ठिकाणी असलेलं. जुन्या कोकणातील गाव कसा होता. त्याचे व्यवहार कसे चालत
वगैरे या ठिकाणी शिल्पांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रदर्शन
पाहायला गेलो तेव्हा ते दाखवण्यासाठी आणि समजवण्यासाठी जी मुलगी माझ्यासोबत
मार्गदर्शक म्हणून होती ती सोनल. अशा
आजूबाजूच्या खेड्यातील काही मुली तिथे काम करतात. त्यांना तयारही छान केले
आहे. त्या सारे समजावून सांगतात. हे `अनोखे कोकण' दाखवताना आम्ही एका
शिल्पासमोर उभे राहिलो. सोनल सांगू लागली- `हा कासार. हा मुलींना, बायांना
बांगड्या भरून देतो. लहान मुलींना बांगड्या भरून देण्याचे तो पैसे घेत
नाही. दहाव्या बाराव्या वर्षी मुलीचे लग्न होत असे. तेव्हाही हा बांगड्या
भरून देत असे. तेव्हा त्याला मुलीचे वडील एक सोन्याचा तुकडा देत असत. तो
त्याला पुरे. दुसऱ्या एखाद्या मुलीचं लग्न होईल तेव्हा पुन्हा दुसरा
सोन्याचा तुकडा. एक प्रकारे आजच्या भाषेत सांगायचं तर, तो दहा वर्षांचं
क्रेडीट देत असे.' त्या शिडशिडीत बांध्याच्या काळ्यासावळ्या कोकणी
खेड्यातील सोनलच्या तोंडून क्रेडीट शब्द आला तेव्हा छान वाटलं. तिला त्याचा
अर्थ फार समजत असावा किंवा नसावा. ती शिकवल्याप्रमाणे सांगत होती. पण नकळत
माझ्यासारख्या शहरी माणसाला आपल्या समाज जीवनात मुरलेल्या विश्वास आणि
मानवतेचं दर्शन मात्र त्यामुळे घडलं होतं. आजच्या अर्थकारणात लोप पावलेल्या
आणि पारंपरिक अर्थकारणाचा जणू आधारच असलेल्या विश्वास आणि मानवता, या
दोहोंची रुजवणूक पुन्हा कशी होऊ शकेल? सगळ्यांनी विचार करावा असाच प्रश्न
आहे, नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा