बहुतेक हिंदी मराठी वाहिन्यांवर काल वटसावित्री होती. फेसबुकसुद्धा त्यात सामील होते. खूप गमती जमती पाहायला ऐकायला मिळाल्या. आज काळ बदलला आहे. त्याला धरूनच त्या होत्या. त्याला हरकत पण नाही. त्याच भावनेने त्यांचा आनंद घ्यायला सुद्धा कां कू करण्याची गरज नाही. `बाभळी अमावास्या', `रिन्युवल करार' वगैरे छान होते. गमती जमती करण्यात पुरुष होते तशाच बायाही होत्या. पारंपरिक रूढी आणि भावना जपणारे आणि शुभेच्छा देणारेही प्रकार होते. पर्यावरण हा तर `हॉट केक'. त्यामुळे तो होताच. वृक्ष लावा, वटवृक्ष लावा, त्याचे महत्व, शास्त्रीय कारणे; असे सगळे होते. मृत्युशय्येवर पडलेल्या बायकोसाठी वडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालणारा पुरुष पण होता. सगळेच आपापल्या ठिकाणी योग्य होते. मात्र दोन गोष्टी हरवल्यासारख्या वाटल्या आणि त्या मुळापर्यंत घेऊन जाणाऱ्या आहेत. एक म्हणजे- आपल्याला प्रतीत होणाऱ्या सत्यासाठी जीवनाची बाजी लावण्याची सावित्रीची श्रेष्ठता. दुसरे म्हणजे- सत्यवान सावित्री रूपक कथेचा अन्वयार्थ.
वरच्या आवरणात रमणे आणि त्यातच आशय शोधणे ही मानवी मनाची प्रकृतीच आहे. त्यामुळे एखादी कथा ऐकल्यावर त्यातील पात्र, प्रसंग, परिस्थिती यात आपण गुंतून जातो. गाभ्यापर्यंत जाण्याची तसदी घेत नाही. `सत्यवान-सावित्री'च्या महाभारतातील आख्यानाचे सुद्धा असेच होते. या आख्यानाचा उपयोग करून कोणी तरी कधीतरी एक सामाजिक उपक्रम म्हणून वटसावित्री व्रत सुरु केले असावे. असे सामाजिक उपक्रम, त्यांना आलेले व्रताचे स्वरूप, त्यांच्या झालेल्या रूढी; या सगळ्याला वेगळी समाजशास्त्रीय बैठक असते. त्यांचा फार मोठा उपयोग पण असतो. परंतु प्रदीर्घ काळानंतर त्याचे वरचे आवरण तेवढे उरते. अन हळूहळू तेही गळून पडू लागते. आज या प्रथेचे तसेच होत असल्याचे दिसते. याचा अर्थ जे होते वा आहे ते सारेच निरर्थक, थट्टेवारी नेण्यासारखे आहे असे नाही. मुळात थट्टा करताना आणि आवरण गळून पडताना त्याचा गाभा काय आहे, आशय काय आहे याकडे लक्ष दिले तर त्याचा उपयोग करता येऊ शकतो. आवश्यकता वाटल्यास त्या आशयाभोवती नवीन आवरण उभे करता येऊ शकते.
`सत्यवान-सावित्री' कथेचा व्यावहारिक आशय आहे पतीसाठी प्राणांची बाजी लावण्याचे धैर्य आणि निग्रह. या ठिकाणी तर पती सुद्धा लाक्षणिक आहे. पती म्हणजे कोण तर ज्याच्याशी आयुष्याची गाठ बांधली आहे तो. ही गाठ सुद्धा समजून घ्यायला हवी. आपण व्यवहारात सुद्धा बोलतो की, `नोकरी किंवा व्यवसाय हीच एखाद्याची पहिली बायको आहे' किंवा `नोकरी, व्यवसाय एखादीची सवत आहे' वगैरे. याचा अर्थच लग्नगाठ म्हणजे commitment. ही commitment महत्वाची. अशी commitment तेव्हाच असू शकते ज्यावेळी एखाद्याला वा एखादीला कुठेतरी सत्याची प्रतीती येते. त्यातून विश्वास, प्रेम इत्यादी निर्माण होते. ती व्यक्ती, ती वस्तू, तो विचार, ती संघटना, ते कार्य, ते व्रत म्हणजेच आयुष्य अशी धारणा जन्माला येते आणि मग त्या सत्यासाठी स्वत:च्या प्राणांची सुद्धा बाजी लावायला मागेपुढे पाहत नाही, ती सावित्री. आपल्या प्राणांची आहुती देऊनसुद्धा प्रतीत होणारं सत्य जपलं पाहिजे, जिवंत ठेवलं पाहिजे यासाठी लढणारी, ती सावित्री. `हाच पती लाभो, त्याच्याकडे गाडीघोडा, नोकरचाकर, बंगला, पैसाअडका अमाप राहो. अन त्याचा भोग आम्हाला मिळो' हे सावित्रीचं विडंबन आहे एवढच म्हणता येईल. प्रसिद्ध मराठी कवी म. म. देशपांडे आपल्या `तहान' या कवितेत म्हणतात- `सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण'. आम्हाला अशी सत्याची, न्यायाची, नीतीची, प्रेमाची `महातहान' लागते का? ही `महातहान' लागते तेव्हा सावित्री, राधा, मीरा, बाजीप्रभू, तानाजी, सावरकर, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, सौरव कालिया असे जन्माला येतात. म्हणून `सावित्री' हे व्रत आहे सत्याच्या शोधाचं, सत्याशी बांधिलकीचं. सत्यवानाच्या माध्यमातून सत्याचा शोध, सत्याशी बांधिलकी हा त्याचा व्यावहारिक आशय आहे. खूप साधा असा पर्यावरणाचा विषय घेतला तरीही आमची त्या विषयाशी बांधिलकी आहे का?
या कथेचा एक आध्यात्मिक आशयही आहे. वटवृक्ष हे त्याचं प्रतीक आहे. वटवृक्ष अक्षय असतो. एका पारंबीतून दुसरी शाखा. आमचं अस्तित्वही असंच आहे. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं. त्याला अंत नाही आणि आदीही नाही. अस्तित्व नव्हतं अशी वेळ कधीच नव्हती आणि अस्तित्व नसेल अशीही वेळ कधीच राहणार नाही. हां, अस्तित्वाचं रुप सतत बदलत राहील, पण अस्तित्वहीनता अशक्य आहे. आम्ही `अक्षय' आहोत. आम्हाला क्षय नाही. जन्म मृत्यू ही वरवरची लक्षणं आहेत, याविषयी आश्वस्त करणारी ही रूपक कथा आहे. व्यावहारिक आकलनाच्या कक्षेतील म्हणून वटवृक्षाचे उदाहरण आहे. ही अक्षयता प्राप्त होण्यासाठी सत्याच्या मार्गावर चालावे लागते आणि या मार्गावर चालताना पंचप्राणही पणाला लावण्याची तयारी ठेवावी लागते. `सत्यवान-सावित्रीच्या' आख्यानाचं मला प्रतीत झालेलं हे सत्य आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ३ जून २०१५
वरच्या आवरणात रमणे आणि त्यातच आशय शोधणे ही मानवी मनाची प्रकृतीच आहे. त्यामुळे एखादी कथा ऐकल्यावर त्यातील पात्र, प्रसंग, परिस्थिती यात आपण गुंतून जातो. गाभ्यापर्यंत जाण्याची तसदी घेत नाही. `सत्यवान-सावित्री'च्या महाभारतातील आख्यानाचे सुद्धा असेच होते. या आख्यानाचा उपयोग करून कोणी तरी कधीतरी एक सामाजिक उपक्रम म्हणून वटसावित्री व्रत सुरु केले असावे. असे सामाजिक उपक्रम, त्यांना आलेले व्रताचे स्वरूप, त्यांच्या झालेल्या रूढी; या सगळ्याला वेगळी समाजशास्त्रीय बैठक असते. त्यांचा फार मोठा उपयोग पण असतो. परंतु प्रदीर्घ काळानंतर त्याचे वरचे आवरण तेवढे उरते. अन हळूहळू तेही गळून पडू लागते. आज या प्रथेचे तसेच होत असल्याचे दिसते. याचा अर्थ जे होते वा आहे ते सारेच निरर्थक, थट्टेवारी नेण्यासारखे आहे असे नाही. मुळात थट्टा करताना आणि आवरण गळून पडताना त्याचा गाभा काय आहे, आशय काय आहे याकडे लक्ष दिले तर त्याचा उपयोग करता येऊ शकतो. आवश्यकता वाटल्यास त्या आशयाभोवती नवीन आवरण उभे करता येऊ शकते.
`सत्यवान-सावित्री' कथेचा व्यावहारिक आशय आहे पतीसाठी प्राणांची बाजी लावण्याचे धैर्य आणि निग्रह. या ठिकाणी तर पती सुद्धा लाक्षणिक आहे. पती म्हणजे कोण तर ज्याच्याशी आयुष्याची गाठ बांधली आहे तो. ही गाठ सुद्धा समजून घ्यायला हवी. आपण व्यवहारात सुद्धा बोलतो की, `नोकरी किंवा व्यवसाय हीच एखाद्याची पहिली बायको आहे' किंवा `नोकरी, व्यवसाय एखादीची सवत आहे' वगैरे. याचा अर्थच लग्नगाठ म्हणजे commitment. ही commitment महत्वाची. अशी commitment तेव्हाच असू शकते ज्यावेळी एखाद्याला वा एखादीला कुठेतरी सत्याची प्रतीती येते. त्यातून विश्वास, प्रेम इत्यादी निर्माण होते. ती व्यक्ती, ती वस्तू, तो विचार, ती संघटना, ते कार्य, ते व्रत म्हणजेच आयुष्य अशी धारणा जन्माला येते आणि मग त्या सत्यासाठी स्वत:च्या प्राणांची सुद्धा बाजी लावायला मागेपुढे पाहत नाही, ती सावित्री. आपल्या प्राणांची आहुती देऊनसुद्धा प्रतीत होणारं सत्य जपलं पाहिजे, जिवंत ठेवलं पाहिजे यासाठी लढणारी, ती सावित्री. `हाच पती लाभो, त्याच्याकडे गाडीघोडा, नोकरचाकर, बंगला, पैसाअडका अमाप राहो. अन त्याचा भोग आम्हाला मिळो' हे सावित्रीचं विडंबन आहे एवढच म्हणता येईल. प्रसिद्ध मराठी कवी म. म. देशपांडे आपल्या `तहान' या कवितेत म्हणतात- `सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण'. आम्हाला अशी सत्याची, न्यायाची, नीतीची, प्रेमाची `महातहान' लागते का? ही `महातहान' लागते तेव्हा सावित्री, राधा, मीरा, बाजीप्रभू, तानाजी, सावरकर, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, सौरव कालिया असे जन्माला येतात. म्हणून `सावित्री' हे व्रत आहे सत्याच्या शोधाचं, सत्याशी बांधिलकीचं. सत्यवानाच्या माध्यमातून सत्याचा शोध, सत्याशी बांधिलकी हा त्याचा व्यावहारिक आशय आहे. खूप साधा असा पर्यावरणाचा विषय घेतला तरीही आमची त्या विषयाशी बांधिलकी आहे का?
या कथेचा एक आध्यात्मिक आशयही आहे. वटवृक्ष हे त्याचं प्रतीक आहे. वटवृक्ष अक्षय असतो. एका पारंबीतून दुसरी शाखा. आमचं अस्तित्वही असंच आहे. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं. त्याला अंत नाही आणि आदीही नाही. अस्तित्व नव्हतं अशी वेळ कधीच नव्हती आणि अस्तित्व नसेल अशीही वेळ कधीच राहणार नाही. हां, अस्तित्वाचं रुप सतत बदलत राहील, पण अस्तित्वहीनता अशक्य आहे. आम्ही `अक्षय' आहोत. आम्हाला क्षय नाही. जन्म मृत्यू ही वरवरची लक्षणं आहेत, याविषयी आश्वस्त करणारी ही रूपक कथा आहे. व्यावहारिक आकलनाच्या कक्षेतील म्हणून वटवृक्षाचे उदाहरण आहे. ही अक्षयता प्राप्त होण्यासाठी सत्याच्या मार्गावर चालावे लागते आणि या मार्गावर चालताना पंचप्राणही पणाला लावण्याची तयारी ठेवावी लागते. `सत्यवान-सावित्रीच्या' आख्यानाचं मला प्रतीत झालेलं हे सत्य आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ३ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा