गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

काल्पनिक संवाद

काल्पनिक संवाद, वास्तवाशी सांगड घालण्यासाठी.
.........१.........
- तुम्ही महालक्ष्मी नाही मांडल्या का?
- नाही.
- का?
- आमच्याकडे महालक्ष्मीचा सण नाही.
- पण खूप जण करतात महालक्ष्मी.
- हो. पण आमच्याकडे नाही.
- पण तुम्ही का करत नाही?
🤣🤣🤣
.........२.........
- वांग्याची भाजी का केली?
- तीच होती घरात.
- मला वांगी नाही आवडत.
- ओके. पण मला माहित नव्हतं. तू जेवणार आहेस का?
- नाही. मी जेवूनच आलोय.
- मग?
- काही नाही असंच विचारलं. पण मला नाही आवडलं वांग्याची भाजी करणं. अन पटलंही नाही.
- बरं. आता बाजारातून भाजी आणली की दुसरी भाजी करीन.
- ते ठीक. पण आत्ताचं काय?
😄😄😄

हसावंसं वाटलं तर भरपूर हसा. किंवा नका हसू. पण कालपासून जाती वगैरेबाबत जी चर्चा, मतमतांतरे सुरु आहेत ती पाहून हेच संवाद सुचले. मला काय म्हणायचे आहे ते ज्यांना लक्षात येईल त्यांचेही भले होवो, ज्यांना येणार नाही त्यांचेही भले होवो.

जात

ज्यांना खरंच विचार करायचा आहे त्यांच्याचसाठी केवळ.
१) जात म्हणजे काय?
२) किती सुतार आज लाकूडकाम करतात?
३) किती सोनार दागिने घडवतात?
४) किती यादव दुधदुभत्याचा व्यवसाय करतात?
५) किती कुंभार मडकी बनवतात?
(लांबलचक यादी करता येईल.)
६) goldsmith म्हणजे काय?
७) blacksmith म्हणजे काय?
८) bootmaker म्हणजे काय?
९) oilman म्हणजे काय?
१०) carpenter म्हणजे काय?
११) scavenger म्हणजे काय?
१२) fisherman म्हणजे काय?
(लांबलचक यादी करता येईल.)
मानवाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक गरजांमधून जगभर विविध पद्धतीने जातींचा विकास होतो. आजही होतो आहे. पुढेही होत राहील. कोणीही ही प्रक्रिया थांबवू शकत नाही. भारतात त्याचे योजनापूर्वक व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठी ओशाळवाणे वाटण्याचे काहीही कारण नाही. अगदी रोटी बेटी व्यवहार सुद्धा (अयोग्य असले तरीही) मोठ्या प्रमाणात गरजेपोटी जन्माला आले. आज जातीव्यवस्था अस्तित्वातच नाही. राज्यघटनेने ती मोडीत काढली आहे आणि व्यवहारात सुद्धा ती अस्तित्वात नाही.

तरीही एवढी चर्चा का होते?
- सत्ता वा संपत्ती यासाठी.
- सूडभावना.
- राजकारण.
- मनातील किल्मिष आणि अविश्वास.
- मनाचा, वृत्तीचा कोतेपणा.
याशिवाय अन्य काहीही आज जुनी जात म्हणून अस्तित्वात नाही. वरील पाच कारणे दूर करणे हे घोषणांचे, कायद्यांचे काम नाही. मी काय करतो हा विचार प्रत्येकाने करणे हा एकच उपाय आहे.
जात हाच घटक लक्षात घेऊन घडणाऱ्या घटनांची चर्चा करतानाही, suffering and sufferer एवढ्याच मर्यादेत करण्याची मर्यादा आणि दक्षता घेणे हे सुबुद्ध माणसांचे कर्तव्य आहे. समोर दिसत असूनही, त्याला खतपाणी न घालता, सत्याचा वगैरे अतिरेकी आवेश न आणता, त्याकडे दुर्लक्ष करून त्यातील हवा काढून टाकण्याची शहाणीव दाखवायला हवी. प्रामाणिक कळकळीच्या लोकांची ही जबाबदारी आहे. आपल्याला काय वाटते किंवा आपण स्वत:चे वर्चस्व कसे सिद्ध केले किंवा दुसऱ्याला कसे कोंडीत पकडले याचा विचार करणे आणि समाजाच्या कल्याणाच्या प्रक्रियेकडे लक्ष न देणे; हे शोभणारे ठरत नाही. असा विचार न करता, वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या महात्मा गांधींचा अनुयायी म्हणवणारी व्यक्ती जेव्हा तर्कशून्य शेरेबाजी करताना दिसते तेव्हा फक्त एकच शब्द तोंडी येतो - अरेरे !!

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

उज्जैन


मध्यंतरी दोन दिवस उज्जैनला होतो. काही निरीक्षणे.
- शहर छान आहे.
- क्षीप्रा नदी मोठी, वाहती, स्वच्छ, देखणी आहे.
- क्षीप्रा नदीत मासोळ्या भरपूर आहेत. मुरमुरे, कणिकगोळे टाकले की झुंडी धावत येतात. त्यांच्याशी खेळणे हा निरागस आनंद.
- श्री महाकाल मंदिर मोठे, विस्तीर्ण आहे. व्यवस्था चांगल्या आहेत. धक्काबुक्की नाही. पंडे नाहीत.
- शिवलिंगाचे स्पष्ट दर्शन होईल अशी व्यवस्था.
- महाकाल मंदिर क्षीप्रा नदीपासून थोडे दूर आहे. रुद्रसागर तलावाकाठी.
- महाकाल मंदिराच्या जवळच देखणे, शांत, पवित्र `भारत माता मंदिर' आहे.
- खाणे पिणे, रिक्षा आदी महाराष्ट्रापेक्षा थोडे स्वस्त.
- डास नाहीत.
- श्री भैरवनाथ ही वेगळी स्वतंत्र देवता. श्री भैरवनाथ म्हणजे श्री महाकालाचे सेनापती.
- त्यांचे मंदिर शहरापासून लांब जंगलात आहे.
- मदिरा जेथे अर्पण केली जाते ते मंदिर श्री भैरवनाथाचे. तेथे अनेक भक्त, मुली, महिला सुद्धा फुलांच्या टोपलीसोबत मदिरेची बाटली पुजाऱ्याच्या हाती देतात. त्याची जबरदस्ती नाही. दारू चढवलीच पाहिजे असे नाही.
- मदिरापान न करणारेही बाटली अर्पण करतात आणि परत मिळणारी अर्धी बाटली तिथल्याच रिक्षावाला किंवा अन्य कोणाला देऊन टाकतात.
- मदिरा अर्पण करण्याची पद्धत असूनही श्री भैरवनाथ मंदिरातील वातावरण मात्र अन्य मंदिरांप्रमाणेच सामान्य. कुठेही असभ्यता, अश्लीलता, तमाशे नाहीत.
- शहराच्या जवळच जंगलात नीतिशतक कर्ते श्री. भर्तृहरी यांची गुहा आहे. नाथ संप्रदायाचे हे एक महत्वाचे स्थान आहे. या जागेला तपश्चर्येचा सुगंध आहे.
- श्री. भर्तृहरी हे सम्राट विक्रमादित्य याचे बंधू. एक बंधू सम्राट आणि एक बंधू नाथजोगी फकीर.
- बाजारात मलाईदार दूध, रबडी, भांग आदी भरपूर उपलब्ध.

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

नीती आयोगाचा इशारा

इ.स. २०३० नंतर म्हणजे फक्त १२ वर्षांनी पाण्यासाठी संघर्ष सुरु होतील असा इशारा खुद्द नीती आयोगाने दिला आहे. १९९६ साली केलेल्या सूचना अद्याप अमलात आलेल्या नाहीत आणि सरकारचे अजूनही याकडे लक्ष नाही, अशा दोन टिप्पण्याही आयोगाने केल्या आहेत. थोडक्यात म्हणजे संकट दार ठोठावते आहे. किंबहुना दारावर धडका मारते आहे. दार कधी मोडेल सांगता येत नाही. आपल्याला याचं गांभीर्य समजतं आहे का? पाण्याचा प्रश्न केवळ साठवणूक वाढवून आणि बचत करून सुटणारा नाही. जमिनीतील पाणी वाढणे, झरे निर्माण होणे, वाहते होणे महत्वाचे आहे. आपण, आपली जीवनपद्धती, आपली अनास्था अमानुष आणि राक्षसी आहे; हे मान्य करण्याचं धाडस आणि समंजसपणा दाखवण्याला पर्याय नाही. वाईट वाटो, राग येवो, अपमान वाटो; पण घरातले पाण्याचे भांडे घेऊन रस्त्यावर उतरणे आणि मारामारी करणे यापेक्षा आजच अपमानाचा घोट गिळणे चांगले. गाड्या, सिमेंट-कोन्क्रीटचे प्रेम, मातीचा द्वेष, अमाप सुखसाधनांचा हव्यास, महानगरांचे वेड; हे सारे कठोरपणे आणि क्रूरपणे सोडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. केवळ झाडे लावा झाडे लावा हे नाटक पुरेसे नाही. झाडे पाउस पाडतील कदाचित पण माती नसेल आणि त्यात पाणी झिरपणार नसेल तर त्याचा काय उपयोग? उलट असले नसलेले पाणी झाडे शोषून घेतील. ते माणसाने पाणी देण्याची वाट पाहत नाहीत. झाडे उपकार करतात तसेच स्वत:च्या अस्तित्वासाठी माणसाला बाजूलाही सारतील. आज खनिज तेलाने आमच्या नाकी नऊ आणले आहेत. उद्या आमच्या उन्मत्त दांभिकतेने आणि मानवी कर्तृत्वाच्या आत्यंतिक उन्मादाने माणूसच माणसाचा भस्मासुर होऊ नये. आम्ही वाट्टेल ते करत राहू अन त्यावर उपाय शोधणे म्हणजेच पुरुषार्थ हे आत्मफसवेपण नालायकांचे उद्योग म्हणूनच शोभू शकतात. नाक, कान, डोळे, हृदय, मेंदू, सगळे कमकुवत होत असल्याच्या बातम्या पाहायच्या. सर्वेक्षणे करायची, अन दुसऱ्याच क्षणी पुरुषार्थाचा अविचारी ढोंगी टेंभा पाजळायचा हे चुकीचे आहे. केवळ आणि केवळ मन आणि इच्छा यांची गुलामी हे माणसाचे लांच्छन आहे. सरकारने देखील लोकानुरंजन बाजूला ठेवून धोरणे आणि अंमलबजावणी याकडे पाहिले पाहिजे. अन अंमलबजावणी म्हणजे केवळ कायद्याचे कठोर पालन, कठोर शिक्षा इत्यादी नसते हेही लक्षात घेतले पाहिजे. जसे व्यक्तीने व समाजाने तसेच सरकारनेही स्वत:च्या संदर्भात कठोर व्हायला पाहिजे. नीती आयोग म्हणजे एक प्रकारे सरकारच. खुद्द पंतप्रधान त्याचे अध्यक्ष. त्यामुळे सरकार आता याबाबत काही करते का हे पाहावे लागेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ४ सप्टेंबर २०१८