काही संतांनी अयोध्येत शाहरुख खानची तेरवी करणे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करण्यावरून भाजपने काँग्रेसवर टीका करणे; या दोन्ही गोष्टी अजिबात न पटणाऱ्या. समाजाला फक्त भांडखोर आणि निर्बुद्ध करणारे पक्ष, संस्था आणि लोक काय कामाचे? राजकारण, समाजकारण, धर्मकारण करतानाच समाज सुबुद्ध व्हावा; याची काळजी घेणारे पक्ष, संस्था, लोक हवेत.
**********
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सी ई ओ चंदा कोचर यांच्यानंतर व्हिडिओकॉन चे वेणुगोपाल धुत यांनाही अटक झाली आहे. शिवाय कॅग ने सादर केलेल्या ताज्या अहवालाची बातमीही आज आहे. विविध संस्थांनी अनधिकृतपणे २१ हजार कोटी रुपयांची करचोरी केल्याचा. त्यात गुजरात आणि उत्तरप्रदेश सह देशभरातील संस्थांचा समावेश आहे. आणखीनही बऱ्याच गोष्टी समोर येत असतात. ही बौद्धिक गुन्हेगारी म्हणता येईल. गुन्हेगारीचे वेगवेगळे विश्लेषण होते. त्यात बौद्धिक गुन्हेगारी असं विश्लेषण आणि अभ्यास माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण हा खूप मोठा विषय आहे. कोणाला अभ्यास करायचा असेल तर मी मार्गदर्शन आणि मदत करू शकेन. अर्थात मला गुरुदक्षिणा देणाऱ्यांना.
- श्रीपाद कोठे
२७ डिसेंबर २०२२