मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

सुबुद्ध करणारे पक्ष हवेत

काही संतांनी अयोध्येत शाहरुख खानची तेरवी करणे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करण्यावरून भाजपने काँग्रेसवर टीका करणे; या दोन्ही गोष्टी अजिबात न पटणाऱ्या. समाजाला फक्त भांडखोर आणि निर्बुद्ध करणारे पक्ष, संस्था आणि लोक काय कामाचे? राजकारण, समाजकारण, धर्मकारण करतानाच समाज सुबुद्ध व्हावा; याची काळजी घेणारे पक्ष, संस्था, लोक हवेत.

**********

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सी ई ओ चंदा कोचर यांच्यानंतर व्हिडिओकॉन चे वेणुगोपाल धुत यांनाही अटक झाली आहे. शिवाय कॅग ने सादर केलेल्या ताज्या अहवालाची बातमीही आज आहे. विविध संस्थांनी अनधिकृतपणे २१ हजार कोटी रुपयांची करचोरी केल्याचा. त्यात गुजरात आणि उत्तरप्रदेश सह देशभरातील संस्थांचा समावेश आहे. आणखीनही बऱ्याच गोष्टी समोर येत असतात. ही बौद्धिक गुन्हेगारी म्हणता येईल. गुन्हेगारीचे वेगवेगळे विश्लेषण होते. त्यात बौद्धिक गुन्हेगारी असं विश्लेषण आणि अभ्यास माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण हा खूप मोठा विषय आहे. कोणाला अभ्यास करायचा असेल तर मी मार्गदर्शन आणि मदत करू शकेन. अर्थात मला गुरुदक्षिणा देणाऱ्यांना.

- श्रीपाद कोठे

२७ डिसेंबर २०२२

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

मोफत धान्य वाटप

चीन, अमेरिकेतील कोरोना उद्रेक पाहता; गरीबांना मोफत धान्य देण्याची योजना सरकारने एक वर्ष वाढवली आहे. ८० कोटी लोकांना त्याचा लाभ होणार आहे. यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही आणि ते सरकारचे कर्तव्यही आहे. परंतु या निर्णयाचा अर्थ हा होतो की, १३५ कोटी देशवासीयांपैकी ८० कोटी लोक असे आहेत जे धान्य विकत घेऊ शकत नाहीत. हे वास्तव मात्र भूषणावह नाही. जागतिकीकरण, तेल, युद्ध इत्यादी चर्चा आणि तर्क पुष्कळ होऊन गेले आहेत. काँग्रेस आणि भाजपशिवायच्या पक्षांची सरकारे याचाही चोथा झालेला आहे. भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याला साडेआठ वर्षे झालेली आहेत. दीड वर्षाने पुन्हा अशीच एकहाती सत्ता मिळेल असे चित्र आहे. त्यामुळे ८० कोटी लोक स्वतः धान्य खरेदी करू शकत नाहीत ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारीही भाजपची आहे. भाजप समर्थकांनाही ही परिस्थिती कशी बदलेल याची चर्चा करण्याकडे लक्ष वळवले पाहिजे. 

८० कोटी हा धान्य खरेदी करू न शकणाऱ्या लोकांचा आकडा आहे. जे अस्सल, कम अस्सल धान्य खरेदी करतात पण बाकी आर्थिक परिस्थिती यथातथा आहे असे गरीब, निम्न मध्यवर्गीय, मध्यम मध्यावर्गीय असेही कोट्यवधी लोक आहेत. थोडक्यात : समाधानकारक आर्थिक स्थितीत नसलेले शंभर कोटीहून जास्त लोक आहेत. विकास, संपन्नता मोजक्या लोकांकडे आहे. देश व समाज म्हणून हा चिंतेचा विषय व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

२४ डिसेंबर २०२२

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

वानरे

सध्या अयोध्येत असलेल्या एका कार्यकर्त्यांशी आज गप्पा झाल्या. त्यांनी एक गंमत सांगितली. अयोध्येत माकडे खूप आहेत. ती लाल तोंडाची आहेत. एकदम इबलिस. केव्हा काय करतील भरवसा नाही. त्यामुळे राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले तेव्हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता. त्यांना कोणीतरी एक जालीम उपाय सांगितला आणि तो यशस्वी पण झाला. लाल तोंडाची ही माकडे काळ्या तोंडाच्या माकडांना घाबरतात. मग पोलिसांनी काळ्या तोंडाचे हुप्पे आणले अन् त्यांना अयोध्येत फिरवले. कार्यक्रमाच्या दोन चार दिवस आधी या काळ्या तोंडाच्या वानारांना पोलिसांनी फिरवले. अन् लाल तोंडाची ही इबलीस माकडे पंधरा दिवस अयोध्येतून गायब होती.

#अयोध्या

- श्रीपाद कोठे

२१ डिसेंबर २०२२