बुधवार, २७ मार्च, २०२४

सुमन कल्याणपूर

DD News वर आत्ता एक छान कार्यक्रम पाहिला. सुमन कल्याणपूर यांची मुलाखत. मुलाखत दूरदर्शन स्टुडिओत झालेली होती. म्हणजे प्रकृती उत्तम आहे. इतका वेळ सुमनजींना बोलताना पहिल्यांदाच ऐकलं. छान बोलतात. आवाजाचे चढउतार बहुधा नाहीच. एका संथ लयीत उत्तरं देत होत्या. दोन तीन गाण्यांचे मुखडे पण म्हटले प्रश्नोत्तराच्या दरम्यान. त्यात त्यांचं आवडतं एक मराठी गाणं पण होतं. केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर... बोलताना न चढणारा स्वर गाताना मात्र सहज टिपेला भिडला. या वयातही. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर... हे उडत्या लयीतल गाणंही लीलया म्हटलं. लताजींच्या संदर्भात स्वाभाविकच प्रश्न होते. एक होता - तुमचे संबंध कसे होते? त्यावर त्यांचं उत्तर होतं - आम्ही भेटत होतो. आमच्यात व्यवस्थित रॅपो होता. दुसरा प्रश्न होता - दोघींचे आवाज खूप मिळतेजुळते आहेत. तुम्हाला काय वाटतं? उत्तर होतं - आम्ही दोघी कदाचित एकाच वेळी देवाकडे आवाज मागायला गेलो असू. अन् त्याने आम्हाला तो विभागून दिला असेल.

- श्रीपाद कोठे

२८ मार्च २०२३

(पद्मभूषण मिळाल्यानंतरची)

बुधवार, १३ मार्च, २०२४

काय म्हणावे?

सध्या महिला क्रिकेट प्रीमियर लीग सुरू आहे. त्याबद्दल आज वाचण्यात आलेले...

काही खेळाडूंना काही कोटी रुपयात काही संघांनी विकत घेतले. परंतु या खेळाडूंचा खेळ अतिशय पडेल होतो आहे. एका संघाने तर अजून एकही सामना जिंकलेला नाही.

......

माझी टिप्पणी :

खेळासाठी एवढा पैसा द्यावा का हा मुद्दा बाजूला ठेवला तरीही, किमान ज्यासाठी पैसा मिळाला आहे त्याचे रिटर्न्स द्यायला नकोत का? त्यासाठी काहीही नियम नाहीत. खेळ ही बेभरवशाची गोष्ट असते असं म्हणून दुर्लक्ष करायचं का?

- शेती ही पण बेभरवशाची गोष्ट नाही का? त्यांना खेळासारखी वागणूक का नको?

- कोणतीही जबाबदारी नसलेल्या गोष्टींवर अमाप पैसा ओतण्याचे कौतुक वाटणारे तुम्ही आम्हीच नंतर; देशाची आर्थिक स्थिती, आर्थिक विषमता, दारिद्र्य इत्यादी गोष्टींवर कथ्याकुट करतो. यापेक्षा हास्यास्पद आणि लाजिरवाणे काय असू शकते?

- श्रीपाद कोठे

१४ मार्च २०२३

अद्भूत अनुभव

संध्याकाळी सातेक वाजताच्या दरम्यान अचानक संथ, शांत स्वरात; हळू पण स्पष्ट आवाजात रामरक्षा ऐकू यायला लागली. मी म्हणत नव्हतो पण ते खूप आकर्षून घेणारं होतं. आजूबाजूला पाहिलं पण कुठेच कोणी म्हणत नव्हतं. आवाज ओळखीचा नव्हता. पूर्ण नाही ऐकू आली. मधूनच सुरू झाली होती अन् मधेच थांबली. पण माझ्या बाहेरून आणि जवळून ते स्वर येत होते एवढं नक्की. असो. प्रभूच जाणोत. 🙏

- श्रीपाद कोठे

१४ मार्च २०२३

रविवार, १० मार्च, २०२४

ते दिवस

सारदा मठाच्या पहिल्या अध्यक्ष प्रव्राजिका भारतीप्राणा यांच्याबद्दल वाचत होतो. १९१२ मध्ये त्या वृंदावनला होत्या. त्याबद्दल त्यांनी सांगितलेली माहिती आज अविश्वसनीय आणि गमतीशीर वाटेल. त्या तिघी जणी होत्या. त्या स्वयंपाक करीत नसत तर तिथल्या गोविंदजी मंदिरात विकत मिळणारा प्रसाद घेऊन येत आणि जेवत असत. प्रत्येकीचा जेवणाचा महिन्याचा खर्च तीन रुपये होता. जो प्रसाद विकत मिळत असे त्यात भात, भाज्या, दही, खीर आणि सोळा पोळ्या असत. याशिवाय नाश्ता म्हणून एक पैशाचा चना मसाला विकत घेत. तो तिघींना दोन दिवस पुरत असे. दूध सहा पैशात एक शेर मिळत असे.

- श्रीपाद कोठे

११ मार्च २०२३

शनिवार, ९ मार्च, २०२४

कृष्ण हवा

साधारण गेल्या वर्षभरापासून भारत रशियाकडून कच्चे तेल कमी किमतीत आयात करतो आहे आणि शुद्ध करून अमेरिका आणि अन्य देशांना निर्यात करून फायदा कमावतो आहे; अशा आशयाचा एक युक्तिवाद सध्या फिरतो आहे. चांगलंच आहे. पण -

: निर्यातीतून पैसा कमावणे महत्त्वाचे आहेच पण आपल्याच नागरिकांचा बोजा कमी करणे; किमानपक्षी नागरिकांवर बोजा न वाढवणे महत्त्वाचे नाही का? स्वयंपाकाचा गॅस वा अन्य पेट्रोलियम पदार्थांची वाढ का थांबू नये? गोकुळातील दूध, दही बाहेर जाणे थांबवणारा एखादा कृष्ण हवा आहे का?

- श्रीपाद कोठे

१० मार्च २०२३