रविवार, ३० जून, २०२४

बुद्धी

समजणे म्हणजे काय?

मला एखादी गोष्ट समजते म्हणजे काय?

मला समजणारी गोष्ट अन्य कोणाला समजत नाही. असे का?

अन्य कोणाला समजणारी एखादी गोष्ट मला समजत नाही. असे का?

एखाद्या गोष्टीचं आकलन चुकीचं वा पुरेसं नाही हे कसं आणि कोणी ठरवायचं?

कळतं पण वळत नाही, असं का होतं?

बुद्धी भ्रमित होते. विपरीत होते. कली शिरतो. म्हणजे काय?

आईनस्टाईनने सापेक्षता सिद्धांत मांडला तेव्हा फक्त सात जणांना समजला होता म्हणतात. बाकी विद्वान, शास्त्रज्ञ, संशोधक यांना बुद्धी नव्हती का?

सगळ्यांना सारखी बुद्धी असेल, बुद्धीचा वापर करण्याची सारखी क्षमता असेल तर असे का होते?

बुद्धीला चालवणारं, बुद्धीच्या ताब्यात नसलेलं नक्कीच काहीतरी असलं पाहिजे.

- श्रीपाद कोठे

शनिवार, १ जुलै २०२३

शनिवार, २९ जून, २०२४

क्षणजीवीने चिरंजीवीची आस धरावी

वारी आटोपली. वीस पंचवीस वर्षांपूर्वी सुद्धा वारी आटोपत असे. शेकडो वर्षांपासून वारी आटोपतेच. पूर्वी ते फारसे कळत नसे. आता कळते. प्रसार माध्यमे, समाज माध्यमे यातून वारीचा भरपूर जागर होतो. छायाचित्रे, अभंग गायन, दिंड्या, सजावटी, मान्यवरांचा सहभाग, वेशभूषा; अशा अनेक गोष्टीतून वारी भेटते आणि वारी आटोपली हे कळतं. छान आहे. सगळ्यातच आनंद आहे. आनंदं ब्रम्हेती ! आनंद आहे तिथे ब्रम्ह आहे. पण हा वारीचा भाव नाही. उत्सव, उत्साह, लय, ताल, गर्दी, प्रवाह, कौतुक, हौस, नावीन्य, जपणूक; हे सारं आणि यातील आनंद हे क्षणजीवी आहे. चिरंजीवी नाही. हा अनुभव आहे. अनुभूती नाही. वारीचा भाव चिरंजीवीत्वाचा भाव आहे. वारीचा भाव अनुभूतीचा भाव आहे. क्षणजीवीत्वाचा आणि अनुभवाचा तो भाव नाही. म्हणून वारी अखंड चालू आहे. शेकडो वर्ष झाली; प उच्चारला की पांडुरंग आणि आ उच्चारला की आषाढी आठवते; लाखो अनाम जीवांना. अन् क्षणजीवी सारं टाकून देऊन ते ओढले जातात चिरंजीवीकडे. आपोआप. नकळत. अन् परततात तेव्हाही मन रेंगाळत असतं चिरंजीवीमध्येच. क्षणजीवीचा विसर पडणे आणि चिरंजीवीची ओढ लागणे ही सुरुवात असते वारीची. चिरंजीवी होऊन जाणे ही तिची समाप्ती असते. क्षणजीवी जोवर मनातून गळत नाही तोवर वारी खरी नाही. टाळ, मृदंग, टिळे, माळा, फुगड्या, गजर सगळं असेल तरीही वारी खरी नाही. क्षणजीवीने चिरंजीवीची आस धरावी. खरी वारी करावी.

- श्रीपाद कोठे

३० जून २०२३

शुक्रवार, २१ जून, २०२४

धर्म - अधर्म

 #आजचासंवाद

- योग हा काही धर्म नाही. तो व्यायाम प्रकार आणि जगण्याची कला आहे.

- हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, मंदिर, मशीद, चर्च, प्रार्थना, इबादात, प्रेयर, हात जोडणे, दोन्ही हात कोपरात मोडून वर करणे, कपाळ हृदय खांदे यावर क्रॉस काढणे; या अर्थाने धर्म नाही. अगदी खरं. पण खऱ्या अर्थाने तो धर्मच आहे. खरं तर जगातली प्रत्येक गोष्ट धर्म असते आणि धर्म असणारी प्रत्येक गोष्ट अधर्म असते. ती गोष्ट धर्म कधी असते आणि अधर्म कधी असते हे ठरवणारा तो सनातन धर्म. ज्याला आज सनातन धर्म म्हणतात तो सनातन धर्म नाही.

- प्रत्येक गोष्ट धर्म?

- हो. प्रत्येक गोष्ट.

- उदाहरण?

- एक का अनेक देता येतील. पण त्यावर विचार तू करायचा. मी विवरण करणार नाही.

- ठीक.

- मुद्दाम थोडं टोकाचं उदाहरण देतो. विचारांना जरा चालना मिळेल.

- चालेल.

- नग्नता. कधी धर्म, कधी अधर्म. कर विचार.

- ?????

- श्रीपाद कोठे 

२२ जून २०२३