शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

निवेदिता प्रसंग

आदिशक्तीच्या जागरणाच्या नऊ रात्री. त्यानिमित्त अभिवादन- शक्तीस्वरूपा सारदा मां आणि शक्तीस्वरूपा भगिनी निवेदिता. योगायोगाने आज भगिनी निवेदिता यांचा स्मृतिदिन. अन्य अनेक थोरांप्रमाणे त्याही अवघ्या ४३ व्या वर्षी हे जग सोडून गेल्या. दूर कुठल्या आयर्लंडची ही कन्या, भारतमातेची ललामभूत सुपुत्री ठरली. ज्ञान, अध्ययन, लेखन, शिक्षण, सेवा, क्रांतिकार्य यात विलक्षण योगदान देऊन त्या गेल्या.

त्यांच्या जीवनातील छोटासा प्रसंग- एकदा रात्रीच्या वेळी एक क्रांतिकारक त्यांना भेटायला येतो. त्या त्याच्याशी बोलतात, विचारपूस करतात आणि जेवण झालं का विचारतात. तो म्हणतो, दोन दिवसांपूर्वी झालं होतं. त्या त्याला जेवायला बसवतात. त्याच्यासमोर ताट ठेवतात. तो जेवतो आणि झोपी जातो. त्यांना सोबत करायला असलेली मुलगी त्यांना विचारते- तुम्ही स्वत: चार दिवस जेवलेल्या नाहीत. मग त्याला का दिलंत तुमचं ताट? त्या फक्त एकच वाक्य उच्चारतात- मी या सगळ्यांची आई आहे.

आई आणि बाई यातला महान भेद किती सहजतेने सांगितला निवेदितांनी. सृजन म्हणजे फक्त जन्माला घालणे नव्हे. या विश्वातील नवनवोन्मेशशाली कोट्यवधी सृजनासाठी गाडून घेणारं प्रत्येक तत्व म्हणजे आई. जन्माला घालणं, संगोपन आणि लालन पालन करणं अन तेच भंगून टाकून त्या द्रव्यातून पुन्हा नवीन सृजन करणं; साराच त्या आदिशक्तीचा विलास. त्या आदिशक्तीने स्वत:ला गाडून घेतलं म्हणून हे विश्व आकारास आलं. सृजनाचा हा पिसारा दिसतो पण त्यासाठी गाडून घेतल्यामुळे आई दिसत नाही. अन युगानुयुगे हे जग, या विश्वातील कणनकण शोधतो आहे आपल्या आईला.

हेच आईपण जगणाऱ्या, भोगणाऱ्या अन समजावून सांगणाऱ्या निवेदितांनी आजच्याच दिवशी दार्जीलिंग येथे शेवटला श्वास घेतला.

या नवरात्रीतील आदिशक्तीचे जागरण या विश्वातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषातील, प्रत्येक सजीव आणि निर्जीवातील, प्रत्येक सचेतन आणि अचेतनातील, प्रत्येक अणुरेणूतील `आई' जागवो असा जोगवा मागतो. जोगी आणखीन काय करू शकतो?

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

व्यक्तिवाद

भारतीय चिंतन हे मूलतः व्यक्तिवादी चिंतन आहे. व्यक्तिवाद भारताला नवीन नाही. किंबहुना भारतीय विचार प्रचलित व्यक्तिवादाहून अधिक व्यक्तिवादी आहे. परंतु या दोन व्यक्तिवादात दोन फरक आहेत.
१) प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे भौतिकता, ऐहिकता, जडवाद, भोगवाद, वर्चस्ववाद हे भारतीय व्यक्तिवादाचे आधार नाहीत.
२) भारतीय व्यक्तिवादाने त्याची जबाबदारी व्यक्तीवर टाकलेली आहे. प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे समाजावर नाही. आम्हाला आमच्या मताप्रमाणे जगता आले पाहिजे हे दोघांनाही मान्य असले तरीही; त्यातील यश, अपयश, त्रास, संघर्ष, मान्यता, अमान्यता, कौतुक, हेटाळणी यांची जबाबदारी समाजाची; असे प्रचलित व्यक्तिवाद म्हणतो. आम्हाला काय वाटावे किंवा आम्ही काय करावे यात समाजाला say असता कामा नये, पण परिणामांची जबाबदारी आणि आपल्या मतानुसार वागण्यासाठी अनुकूल स्थिती देण्याची जबाबदारी मात्र समाजाची; हा प्रचलित व्यक्तिवादी विचार आहे. तो समाजाला व्यक्तीचा नोकर अशा स्वरूपात पाहतो. तो समाजाला गृहित धरतो. याउलट भारतीय व्यक्तिवाद पूर्ण स्वातंत्र्यासोबत पूर्ण जबाबदारी घ्यायला सांगतो आणि समाज आणि व्यक्तीचे संबंध mutual आहेत असे मानतो.

जोगवा

नेहमीप्रमाणे आजही, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती आली. तिचे नाव गाव माहिती नाही. पण चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र अशा दोन्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती येते. जोगवा मागायला. बरीच वर्षे झाली. नेम चुकलेला नाही. आई येथे असताना त्या दोघींच्या गप्पाही होत. आई येथे नसल्याला तीन वर्षे झाली. तरीही ती येते. कारण ती जोगवा मागायला आल्यानंतर तिला शिधा, दक्षिणा देण्याचे मी सुरूच ठेवले आहे. आजही ती येऊन गेली. शिधा, दक्षिणा घेऊन गेली. हा काही तिचा व्यवसाय नाही. अन दोन नवरात्रीत जोगवा मागून वर्षभर उदरनिर्वाह चालतही नाही. हे तिचे व्रत आहे आणि ती ते निष्ठेने करते आहे. भारतीय समाजजीवनाचा एक चिवट धागा मला यात दिसतो. दान मागणे आणि दान देणे या दोन्हीत चुकीचे आणि ओशाळवाणे काही नाही. भारतात तसे कधी समजले गेले नाही. आज तसे समजले जाते याचे कारण आपण भारतीय ethos चा त्याग केलेला आहे. भारतीय संदर्भात `भिक्षा' ही खूप वेगळी कल्पना आहे. प्रत्येक गोष्टीचे महत्व, मूल्य, किंमत, उपलब्धता सारखी असू शकत नाही; प्रत्येक व्यक्तीची क्षमता, कल आणि गुण समान असू शकत नाही; तरीही प्रत्येकाला चांगले जगण्याचा हक्क आहे आणि प्रत्येकाच्या वेगळेपणाची समाजाला व सृष्टीला गरज आहे; या सगळ्याचा मेळ घालणे; आणि या प्रयत्नातून मानवी जीवन अंतरंगसमृद्ध करणे; याचं जे एक web designing भारताने केलेलं आहे ते लक्षणीय आहे. त्यामुळेच बारकाईने पाहिलं तर `दान' हा व्यक्तीजीवनाचा, समाजजीवनाचा, विश्वजीवनाचा, धार्मिक जीवनाचा, आध्यात्मिक जीवनाचा पाया आणि आधार आहे. वर्तमान आर्थिक, सामाजिक समस्यांच्या दाहक वास्तवाचा विचार करताना वास्तविक भारताच्या या पैलूचा अधिक आणि सर्वंकष विचार व्हायला हवा, समोर मांडला जायला हवा. मात्र, कालमहिमा असा आहे की आमच्यावर भारतेतर विचार, भावभावना वरचढ आहेत आणि `मी' हा कमालीचा मोठा झाला आहे. अर्थात काळ कूस पालटत असतो, हेही खरे.

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

approach


सध्या कुस्तीस्पर्धांची एक जाहिरात सुरु आहे. एक तरुण मांडीवर थाप मारून एका तरुणीला आव्हान देतो आणि ती तरुणी न घाबरता तशीच मांडीवर थाप देते आणि न बोलता पुढे जाते. तरुण खजील होऊन खाली मान घालतो. जाहिरातीतून जो संदेश दिला तो स्पृहणीय आहेच.
कालच राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या जीवनावर एक बोलपट लोकसभा टीव्हीवर पाहिला. काही गोष्टींची उजळणी झाली. सध्या सुरु असणाऱ्या कुस्ती स्पर्धांच्या जाहिरातीतून जो संदेश देण्यात येत आहे तोच संदेश घेऊन मावशी १९३६ साली उभ्या राहिल्या. पतीच्या निधनानंतर आणि नऊवारी पातळ नेसून. सगळ्या भारतभर तो संदेश पोहोचवला आणि त्यानुसार वागणाऱ्या, दंड खांद्यावर घेऊन थाटात संचलन करणाऱ्या हजारो सेविका देशाच्या कानाकोपऱ्यात उभ्या केल्या.
आमच्या घरासमोरच काही मोकळे प्लॉट होते. त्या मैदानावर समितीची शाखा लागत असे. माझ्या बहिणी इतर सेविकांसह ती शाखा सांभाळत. त्यावेळच्या नागपूरच्या काँग्रेस खासदाराच्या ताफ्यातील एक `दादा' आमच्या पलीकडील वस्तीत राहत असे. तो अनेकदा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन उभा राहत असे. सुमारे चाळीसेक वर्षांपूर्वीची ही कहाणी. त्यावेळी नागपूर सुद्धा आजच्या सारखे नव्हते. आमची वस्ती नवीनच होती. रिक्षावाले अंधार पडला की यायला घाबरत. वस्तीच्या मुख्य चौकात रात्री एकटेदुकटे जाणे कठीण होते. तलवारी वगैरे केव्हा निघतील नेम नसे. रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा राहणारा `दादा' तर मोठंच प्रस्थ होतं. पण समितीची शाखा. त्या सगळ्या मुलींची हिंमत, संघाची तगडी शाखा (आमची शाखा शंभरी शाखा होती), संघाची म्हणून जी खास कुटुंब होती त्यांचे परस्पर संबंध, या सगळ्यामुळे निर्माण झालेले वस्तीतील वातावरण यामुळे, कोपऱ्यावर उभे राहण्यापलीकडे त्या `दादाने'` काहीही केले नाही. तो करू शकला नाही.
हे सांगण्याचे कारण म्हणजे मावशी केळकर यांनी सांगितलेला approach.
जाहिरातीतील संदेश आणि मावशी केळकर यांनी दिलेला संदेश एकच आहे. पण दोन्हीचा approach मात्र फार वेगळा आहे. तो फार समजावून सांगण्याची गरज नाही. दोन्ही approach चे परिणाम गुणवत्ता म्हणूनही खूप वेगळे. दोन्हीची उदाहरणे आज मोठ्या प्रमाणात आजूबाजूला सहज दिसणारी. शेवटी कोणाचाही कोणताही approach हा प्रेरणा आणि प्रयोजन यांनी आकार घेतो. मावशी केळकर यांचा approach आणि जाहिरातीचा approach यात हा फरक आहे. संदेश एक असला तरीही. समाजासमोर दोन्ही आहे. काय स्वीकारायचं हा समाजाचा प्रश्न आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ८ ऑक्टोबर २०१८