रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

कामाचे तास

तरुणांनी आठवड्याला ७० तास काम करावं, हे नारायण मूर्ती यांचं मत न पटणारं आहे. हा भांडवलशाही विचार आहे. उलट आठवड्यात सहा दिवस रोज पाच तास काम आणि एक दिवस सुटी असं हवं. पाच पाच तासांच्या तीन पाळ्या असाव्या. याने अधिक लोकांना काम मिळेल. जास्त efficiently काम होईल. अन् माणसाचा बैल किंवा गाढव न होता (खरं तर बैल आणि गाढव यांच्याकडून पण मर्यादितच काम करून घ्यायला हवं.) तो माणूस म्हणून जगू शकेल, विकसित होऊ शकेल. काम कशासाठी करायचं याचाही मुळातून विचार करायला पाहिजे. केवळ उत्पादन वाढवा (पक्षी पैसा वाढवा) हा तर्क निरर्थक आहे.

#श्रीपाद कोठे

२८ ऑक्टोबर २०२३

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

नवीन रस्ते हवेत

- अमेरिकेत गेल्या दहा महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये १५ हजार लोक मरण पावले.

- प्रदूषणामुळे दरवर्षी मरण पावणाऱ्यांची संख्या अंदाजे ९० लाख.

- इस्रायल हमास युद्धात गेल्या १५ दिवसात चार ते पाच हजार लोक मरण पावले.

हकनाक मरण पावणाऱ्या या हजारो लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? कोणासाठी आणि कशाची किंमत चुकवली या लोकांनी?

अपघातात होणारे मृत्यू टाळण्यासाठी जुने रस्ते मोडीत काढून आपण चांगले रस्ते बांधतो. अकारण मरावे लागणाऱ्या अशा लोकांसाठी, जगण्याचा जुना रस्ता सोडून नवीन रस्ता बांधायला नको का? जीवनाच्या जुन्या रस्त्यावरील हे महाप्रचंड अपघात आपली वेदना, संवेदना कधी जागी करणार??

#श्रीपाद कोठे

२७ ऑक्टोबर २०२३

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

ऋषी सुनक आणि हिंदू अर्थशास्त्र

ॠषी सुनक हिंदू आहेत?

- हो.

ॠषी सुनक अर्थतज्ज्ञ आहेत?

- हो.

ॠषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान आहेत?

- हो.

म्हणूनच एक अपेक्षा. ईशावास्य उपनिषदापासून डॉ. म. गो. बोकरे यांच्यापर्यंत हिंदू अर्थविचारांचा जो प्रवाह वाहत आलेला आहे, त्याला जागतिक आर्थिक विचारांचा व्यवस्थांचा आधार बनवण्याचा प्रयत्न करावा. ब्रिटनसह जगाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यात त्याची मदतच होईल.

#श्रीपाद कोठे

२६ ऑक्टोबर २०२३

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

मनमानी

मनमानी करणे हा स्वभाव असतो. खरं तर त्याला राक्षसी वृत्तीच म्हटलं पाहिजे. कारण 'कोण माझं काय करून घेणार?' ही मानसिकता त्यामागे असते. असंख्य गोष्टीत ही मनमानी वृत्ती पाहायला मिळते. सिग्नलला न थांबणे असो, रांगेत न लागणे असो, गाडीचा वेग नियंत्रणात न ठेवणे असो, गाणी मोठ्याने वाजवणे असो, कचरा शेजाऱ्याकडे ढकलणे असो, बील वेळेवर न भरणे असो, पाण्याची नासाडी असो, सार्वजनिक जागी मोबाईलवर मोठमोठ्याने बोलणे असो, पाळीव प्राण्यांना कुठेही घाण करू देणे असो; अक्षरशः असंख्य ठिकाणी, असंख्य घटनांत, असंख्य प्रसंगात ही मनमानी वृत्ती पाहायला मिळते. बरं, या वृत्तीच्या लोकांना सांगून, समजावून, धमकावून, बळजबरी करून, प्रेमाने, द्वेषाने, कायद्याने; कशानेही काही फरक पडत नाही. एक वेळ दगड चालायला लागतील पण यांना काही म्हणजे काही फरक पडत नाही. लाजलज्जा तर यांच्याकडे नसतेच. सदसद्विवेबुद्धीशी त्यांचं काहीही नातं नसतं. कधी अडचणीत सापडलेच तर लाचारी करून सुटका करून घेतील पण पुन्हा कुत्र्यांचं शेपूट वाकडं ते वाकडंच. आपल्या आजूबाजूला असलेल्या मोठ्या संख्येतील या राक्षसांना सहन करणे यापलीकडे काय करता येणे शक्य आहे?

# श्रीपाद कोठे

११ ऑक्टोबर २०२३

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

approach

सध्या कुस्तीस्पर्धांची एक जाहिरात सुरु आहे. एक तरुण मांडीवर थाप मारून एका तरुणीला आव्हान देतो आणि ती तरुणी न घाबरता तशीच मांडीवर थाप देते आणि न बोलता पुढे जाते. तरुण खजील होऊन खाली मान घालतो. जाहिरातीतून जो संदेश दिला तो स्पृहणीय आहेच.

कालच राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या जीवनावर एक बोलपट लोकसभा टीव्हीवर पाहिला. काही गोष्टींची उजळणी झाली. सध्या सुरु असणाऱ्या कुस्ती स्पर्धांच्या जाहिरातीतून जो संदेश देण्यात येत आहे तोच संदेश घेऊन मावशी १९३६ साली उभ्या राहिल्या. पतीच्या निधनानंतर आणि नऊवारी पातळ नेसून. सगळ्या भारतभर तो संदेश पोहोचवला आणि त्यानुसार वागणाऱ्या, दंड खांद्यावर घेऊन थाटात संचलन करणाऱ्या हजारो सेविका देशाच्या कानाकोपऱ्यात उभ्या केल्या.

आमच्या घरासमोरच काही मोकळे प्लॉट होते. त्या मैदानावर समितीची शाखा लागत असे. माझ्या बहिणी इतर सेविकांसह ती शाखा सांभाळत. त्यावेळच्या नागपूरच्या काँग्रेस खासदाराच्या ताफ्यातील एक `दादा' आमच्या पलीकडील वस्तीत राहत असे. तो अनेकदा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन उभा राहत असे. सुमारे चाळीसेक वर्षांपूर्वीची ही कहाणी. त्यावेळी नागपूर सुद्धा आजच्या सारखे नव्हते. आमची वस्ती नवीनच होती. रिक्षावाले अंधार पडला की यायला घाबरत. वस्तीच्या मुख्य चौकात रात्री एकटेदुकटे जाणे कठीण होते. तलवारी वगैरे केव्हा निघतील नेम नसे. रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा राहणारा `दादा' तर मोठंच प्रस्थ होतं. पण समितीची शाखा. त्या सगळ्या मुलींची हिंमत, संघाची तगडी शाखा (आमची शाखा शंभरी शाखा होती), संघाची म्हणून जी खास कुटुंब होती त्यांचे परस्पर संबंध, या सगळ्यामुळे निर्माण झालेले वस्तीतील वातावरण यामुळे, कोपऱ्यावर उभे राहण्यापलीकडे त्या `दादाने'` काहीही केले नाही. तो करू शकला नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे मावशी केळकर यांनी सांगितलेला approach.

जाहिरातीतील संदेश आणि मावशी केळकर यांनी दिलेला संदेश एकच आहे. पण दोन्हीचा approach मात्र फार वेगळा आहे. तो फार समजावून सांगण्याची गरज नाही. दोन्ही approach चे परिणाम गुणवत्ता म्हणूनही खूप वेगळे. दोन्हीची उदाहरणे आज मोठ्या प्रमाणात आजूबाजूला सहज दिसणारी. शेवटी कोणाचाही कोणताही approach हा प्रेरणा आणि प्रयोजन यांनी आकार घेतो. मावशी केळकर यांचा approach आणि जाहिरातीचा approach यात हा फरक आहे. संदेश एक असला तरीही. समाजासमोर दोन्ही आहे. काय स्वीकारायचं हा समाजाचा प्रश्न आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ८ ऑक्टोबर २०१८

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

गांधी

 - गांधीजींचं दुर्दैव कोणतं?

- गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे गांधी, हा काँग्रेसचा दावा आणि हा दावा मान्य करणारे असंख्य समर्थक व विरोधक; हे गांधीजींचं दुर्दैव.

- गांधीजींचं सुदैव कोणतं?

- हाताशी एक - दोन अणुबॉम्ब असताना, कोणताही विचार न करता त्याचा उपयोग करणारे जग; हाताशी हजारो अधिक शक्तीशाली अणुबॉम्ब असताना आणि परिस्थिती खूप चिघळते तरीही; अणुबॉम्ब वापरायला टाळाटाळ करतं; हे गांधीजींचं सुदैव.

#####

द्वेष सहन करण्याची अपार शक्ती असणाऱ्या महात्मा गांधीजींना...

आणि...

गांधीजींच्या पायी जीवननिष्ठा वाहणाऱ्या लालबहादूर शास्त्रीजींना...

जयंतीचे अभिवादन. 🙏