मनमानी करणे हा स्वभाव असतो. खरं तर त्याला राक्षसी वृत्तीच म्हटलं पाहिजे. कारण 'कोण माझं काय करून घेणार?' ही मानसिकता त्यामागे असते. असंख्य गोष्टीत ही मनमानी वृत्ती पाहायला मिळते. सिग्नलला न थांबणे असो, रांगेत न लागणे असो, गाडीचा वेग नियंत्रणात न ठेवणे असो, गाणी मोठ्याने वाजवणे असो, कचरा शेजाऱ्याकडे ढकलणे असो, बील वेळेवर न भरणे असो, पाण्याची नासाडी असो, सार्वजनिक जागी मोबाईलवर मोठमोठ्याने बोलणे असो, पाळीव प्राण्यांना कुठेही घाण करू देणे असो; अक्षरशः असंख्य ठिकाणी, असंख्य घटनांत, असंख्य प्रसंगात ही मनमानी वृत्ती पाहायला मिळते. बरं, या वृत्तीच्या लोकांना सांगून, समजावून, धमकावून, बळजबरी करून, प्रेमाने, द्वेषाने, कायद्याने; कशानेही काही फरक पडत नाही. एक वेळ दगड चालायला लागतील पण यांना काही म्हणजे काही फरक पडत नाही. लाजलज्जा तर यांच्याकडे नसतेच. सदसद्विवेबुद्धीशी त्यांचं काहीही नातं नसतं. कधी अडचणीत सापडलेच तर लाचारी करून सुटका करून घेतील पण पुन्हा कुत्र्यांचं शेपूट वाकडं ते वाकडंच. आपल्या आजूबाजूला असलेल्या मोठ्या संख्येतील या राक्षसांना सहन करणे यापलीकडे काय करता येणे शक्य आहे?
# श्रीपाद कोठे
११ ऑक्टोबर २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा