मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

आप्तांशी लढाई

एका पोस्ट वरील प्रतिक्रिया -

जीवनाचं ध्येयच पैसा, अधिक पैसा, अधिक अधिक पैसा... हे झालेलं आहे. कोणताही व्यवसाय, कोणताही उद्योग, कोणतीही सेवा, कोणतीही व्यक्ती... अशा स्थितीत काय करणार कोणी? जीवनाचं ध्येय, जीवनाचा आशय बदलायला हवा आहे. त्यासाठी सशक्त आवाहन हवं आहे. त्या आवाहनाचा परिणाम होण्यासाठी किंमत चुकवणाऱ्या आयुष्यांचे तारण हवे आहे. कुठे आहे हे सगळे? आप्तांशी लढाई ही फक्त कुरुक्षेत्रावर नसते. अनेक ठिकाणी असते. ती करणारे अर्जुन आणि त्यासाठी उद्युक्त करणारे कृष्ण कुठे आहेत?

संघभाव

रामभाऊ बोंडाळे काल गेले. अकोल्याचे श्रीकांत कोंडोलीकर यांनी त्यांच्यावर लिहिलेला लेख आज वाचण्यात आला. त्यांनी रामभाऊंच्या मितव्ययतेचे फार भावपूर्ण वर्णन केले आहे. सहज काही गोष्टी आठवल्या आणि जाणवले की, रामभाऊ हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या श्रद्धांजली संदेशात पण ही बाब अधोरेखित केली आहेच. ही मितव्ययता फक्त लहान क्षेत्रातील कार्यकर्त्यांचाच गुण होता असेही नाही. श्री. यादवराव जोशी हे संघाचे एक फार मोठे अधिकारी. डॉ. हेडगेवार यांच्यासोबत काम केलेले. दक्षिण भारतात संघ रोवणारे. प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, सहसरकार्यवाह अशा मोठाल्या जबाबदाऱ्या पार पाडणारे. त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आठवले.

१९५० च्या दशकात संघातील आर्थिक ओढगस्त फार मोठी होती. शाखा रोडावल्या होत्या. गुरुदक्षिणा कमी झाली होती. गैरसमज आणि अपप्रचार यामुळे समाजात मान्यता आणि स्थान कमी झाले होते. अशाही परिस्थितीत संघाचे काम मात्र करायचे या निश्चयाने कार्यकर्ते काम करीत असत. आर्थिक तंगी त्यात बाधा ठरत नसे. उलट या आर्थिक ओढगस्तीवर स्वतःच विनोद करून वातावरण प्रफुल्लित ठेवणे ही कलासुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी आत्मसात केली होती. श्री यादवराव जोशी हे अशा कार्यकर्त्यांपैकी एक होते. विनोदाने ते अनेकदा म्हणत असत की, 'आपल्या कार्यालयाबाहेर एक फलक लावा की; येथे विवाह, मौंजीबंधन, जन्मदिवस, श्राद्ध इत्यादींसाठी अतिथी म्हणून ब्राह्मण मिळतील.' अन् स्वतःच त्यावर हसून वातावरण निर्मळ करीत असत. एका शिबिरातील एक घटनाही त्यावेळच्या परिस्थितीवर पुरेसा प्रकाश टाकते. एका शिबिरामध्ये जेवण सुरू असताना श्री. गुरुजी ताटातील ताक पाहून म्हणाले, 'एखाद्या विहिरीत एक थेंब ताक टाकले तरीही त्याला ताकाची विहीर म्हटले जाईल.' जवळच बसलेले यादवराव त्यावर मोठ्या आवाजात म्हणाले, 'तरीही ते ताक तेवढेच रुचकर आणि पाणीदार राहील.' अशाच शिबिरात वाढल्या गेलेली शेवयाची खीर हाही एक विनोदाचा भाग झाला होता. आपल्या शेजारी बसलेले डॉक्टर आबाजी थत्ते यांना गुरुजी म्हणाले होते, 'हे पहा, हे पहा. या खिरीत शेवयांचा एक तुकडा दिसतो आहे. त्यावरून सिद्ध होते की ही खीर शेवयाचीच आहे.' यात कुठेही कटुता नव्हती. यात कुठेही त्रागा नव्हता, टीकाटिप्पणी आणि दोषदर्शन नव्हते; तर असलेल्या परिस्थितीत हसतखेळत सगळ्यांनी मिळून पुढे जाणे हाच भाव राहत असे.

बरं, यादवराव तर ठरले उमरेडच्या एका दरिद्री भिक्षुकाचे चिरंजीव. त्यांना हे जन्मजात सवयीचे. पण, १९४० च्या दशकात, घरी राहत असूनही शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये देणाऱ्या वडिलांचे चिरंजीव असलेले चौथे सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह देखील त्याच वळणाचे. ते सरकार्यवाह, सहसरकार्यवाह असताना सुद्धा आपला रोजचा खर्च, हिशेब लिहून ठेवत असत.

चार दोन कार्यकर्त्यांची, माहिती असलेली अशी चारदोन उदाहरणे. पण हे कार्यकर्ते पाच पाच, सहा सहा, सात सात दशके काम करत होते. त्यांच्या आयुष्यात असे किती प्रसंग असतील. अन् असेही हजारो हजार कार्यकर्ते ज्यांच्याबद्दल काही माहिती नाही. त्यांच्या जीवनात असे किती क्षण असतील?

याची आणखीन एक बाजूही आहे. कोंडोलीकर यांनी त्यांच्या लेखात श्री. मधुकर कुलकर्णी यांचाही उल्लेख केलेला आहे. ती बाजूही महत्त्वाची आणि लक्षणीय आहे. एकीकडे सगळं विसरून, आपल्याला एक भव्य दिव्य कार्य करायचे आहे या धुंदीत काम करणारे लहानथोर कार्यकर्ते होते; तर दुसरीकडे एका भव्य दिव्य कार्यासाठी स्वत:च्या जीवनावर तुळशीपत्र ठेवून हे कार्य करीत आहेत याची समंजस जाणीव असणारेही अनेक होते. सीमेवर जाणाऱ्या एखाद्या सैनिकाबद्दल जी भावना असते तशीच भावना अनेकांची या प्रचारकांबद्दल होती. संघ यात आहे आणि यातून आहे. संघाचा पिळ आणि पिंड यातून घडले आहे. बाकीच्यांचे असो अनेकदा स्वयंसेवकांना देखील हे आकलन होत नाही. आजची हिंदुत्वाची सुनामी या साधनेचा परिणाम आहे. केवळ घोषणा, वाद, चर्चा, जाहिराती यांचा नाही.

याचा अर्थ तीच परिस्थिती आज राहावी किंवा तशाच प्रकारे जगावे असा होत नाही. बदल होणारच. पण मर्यादांची जाणीव महत्त्वाची. अभावांच्या मर्यादांची जाणीव ठेवून निराश होण्याचे जसे नाकारले, तसेच संपन्नतेच्या मर्यादांची जाणीव ठेवून 'जितं मया' होण्याचे नाकारले की झाले. मर्यादांची ही जाणीव असेल तोवर संघ असेल. जाणीव नसेल तर संघ नसेल. बाहेरचे कोणी काही करू शकत नाहीत. ना भले ना बुरे. हितचिंतकांना, विरोधकांना, टीकाकारांना याबद्दल चिंता वगैरे वाटू शकते पण त्याची सवंग चर्चा करण्याचा अधिकार खरंच आपल्याला आहे का?

- श्रीपाद कोठे

सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

आरक्षण, मोदी, नेहरू

मोदी समर्थकांपैकी खूप जण आरक्षण विरोधी आणि सोबतच नेहरू विरोधी आहेत. काल मोदींनी स्वतः सांगितले की, नेहरू आरक्षण विरोधी होते. आता हे आरक्षण विरोधी मोदी समर्थक नेहरूंचे समर्थक होतील का? किंवा मोदी विरोधक होतील का?

(थोडी चंमत ग हवी ना !!) 😀😀

- श्रीपाद कोठे

८ फेब्रुवारी २०२४

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

हिंदुत्व आणि समजूतदारपणा

समजूतदारपणा म्हटलं की आजकाल अनेकांच्या भुवया उंचावतात. अनेक हिंदुत्ववाद्यांच्या. जणू काही समजूतदारपणा हे पाप आहे असं त्यांचं ठाम मत असतं. अशांना एक विचारावं वाटतं की, लोक कुलुपे लावत नसत किंवा भारतात कुठेही भिकारी नव्हते; हे हिंदू समाजाचं character कसं निर्माण झालं आणि टिकलं? भारतात तर काही क्रांती वगैरे झाल्याचा इतिहास नाही. किंवा इथला माणूस सुद्धा जगातल्या इतर माणसांसारखाच आहे. मात्र इतरांपेक्षा त्याचं वेगळं character कसं निर्माण झालं? ज्याचा सगळ्यांना गौरव आणि हेवा वाटावा असं हे character समजूतदारपणा यापेक्षा अन्य कोणत्या गोष्टीने निर्माण होऊ शकलं असेल? अगदी वर्तमान उदाहरण घ्यायचं तर; ईशान्य भारतात हिंदुत्वाने जे ठामपणे पाय रोवले ते कसे? समजूतदारपणाला तीलांजली देऊन की, समजूतदारपणाच्या भरवशावर? क्रांती आणि क्रांतिकारक पृथ्वीच्या पाठीवर कुठेही कधीही यशस्वी झालेले नाहीत. क्रांती आणि मांजर आपलीच पिले खाऊन टाकतात. आजचे हिंदुत्वाचे उत्थान देखील हिंदुत्वाच्या समजूतदार प्रवाहाचा परिणाम आणि यश आहे. And to be blunt ... हिंदुत्वाचे क्रांतिवादी प्रवाह काहीही करू शकलेले नाहीत.

#श्रीपाद कोठे

६ फेब्रुवारी २०२४

- ललित कला प्रकरणावर तू काही प्रतिक्रिया नाही दिली?

- हं. नाही दिली.

- तरी...

- हे प्रकरण पुढे आलं तेव्हापासून दोन गोष्टी आठवत आहेत. १) पु. ल. देशपांडे यांचं एक वाक्य : गणपतीला बुशकोट घालणे म्हणजे आधुनिकता नाही, आचरटपणा. २) संघाच्या एका गीताची एक ओळ : दानवता का तीमिर हटाने, तीलतील कर हम जलना सीखे...

@@@@@

दानवताका तिमिर हटाने तिल तिल जलतांना

यात कधी कधी ताडन कर हम जीना सिखे... असे होऊ शकते. गरज तिमिराचा पडदा हटवणे ही आहे.

(किशोर पौनिकर)

तीमिराचा पडदा कोणत्याही शक्तीने हटवल्याचं मी तरी कधी कुठे ऐकलं, पाहिलं नाही. तिमिर हटवण्याचा मला माहिती असलेला एकमेव मार्ग म्हणजे दिवा उजळणे. पेटत्या दिव्यांची संख्या वाढवणे. अन्य मार्ग असेल तरी मला ठाऊक नाही.