बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

जोगवा

नेहमीप्रमाणे आजही, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती आली. तिचे नाव गाव माहिती नाही. पण चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र अशा दोन्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती येते. जोगवा मागायला. बरीच वर्षे झाली. नेम चुकलेला नाही. आई येथे असताना त्या दोघींच्या गप्पाही होत. आई येथे नसल्याला तीन वर्षे झाली. तरीही ती येते. कारण ती जोगवा मागायला आल्यानंतर तिला शिधा, दक्षिणा देण्याचे मी सुरूच ठेवले आहे. आजही ती येऊन गेली. शिधा, दक्षिणा घेऊन गेली. हा काही तिचा व्यवसाय नाही. अन दोन नवरात्रीत जोगवा मागून वर्षभर उदरनिर्वाह चालतही नाही. हे तिचे व्रत आहे आणि ती ते निष्ठेने करते आहे. भारतीय समाजजीवनाचा एक चिवट धागा मला यात दिसतो. दान मागणे आणि दान देणे या दोन्हीत चुकीचे आणि ओशाळवाणे काही नाही. भारतात तसे कधी समजले गेले नाही. आज तसे समजले जाते याचे कारण आपण भारतीय ethos चा त्याग केलेला आहे. भारतीय संदर्भात `भिक्षा' ही खूप वेगळी कल्पना आहे. प्रत्येक गोष्टीचे महत्व, मूल्य, किंमत, उपलब्धता सारखी असू शकत नाही; प्रत्येक व्यक्तीची क्षमता, कल आणि गुण समान असू शकत नाही; तरीही प्रत्येकाला चांगले जगण्याचा हक्क आहे आणि प्रत्येकाच्या वेगळेपणाची समाजाला व सृष्टीला गरज आहे; या सगळ्याचा मेळ घालणे; आणि या प्रयत्नातून मानवी जीवन अंतरंगसमृद्ध करणे; याचं जे एक web designing भारताने केलेलं आहे ते लक्षणीय आहे. त्यामुळेच बारकाईने पाहिलं तर `दान' हा व्यक्तीजीवनाचा, समाजजीवनाचा, विश्वजीवनाचा, धार्मिक जीवनाचा, आध्यात्मिक जीवनाचा पाया आणि आधार आहे. वर्तमान आर्थिक, सामाजिक समस्यांच्या दाहक वास्तवाचा विचार करताना वास्तविक भारताच्या या पैलूचा अधिक आणि सर्वंकष विचार व्हायला हवा, समोर मांडला जायला हवा. मात्र, कालमहिमा असा आहे की आमच्यावर भारतेतर विचार, भावभावना वरचढ आहेत आणि `मी' हा कमालीचा मोठा झाला आहे. अर्थात काळ कूस पालटत असतो, हेही खरे.

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

approach


सध्या कुस्तीस्पर्धांची एक जाहिरात सुरु आहे. एक तरुण मांडीवर थाप मारून एका तरुणीला आव्हान देतो आणि ती तरुणी न घाबरता तशीच मांडीवर थाप देते आणि न बोलता पुढे जाते. तरुण खजील होऊन खाली मान घालतो. जाहिरातीतून जो संदेश दिला तो स्पृहणीय आहेच.
कालच राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या जीवनावर एक बोलपट लोकसभा टीव्हीवर पाहिला. काही गोष्टींची उजळणी झाली. सध्या सुरु असणाऱ्या कुस्ती स्पर्धांच्या जाहिरातीतून जो संदेश देण्यात येत आहे तोच संदेश घेऊन मावशी १९३६ साली उभ्या राहिल्या. पतीच्या निधनानंतर आणि नऊवारी पातळ नेसून. सगळ्या भारतभर तो संदेश पोहोचवला आणि त्यानुसार वागणाऱ्या, दंड खांद्यावर घेऊन थाटात संचलन करणाऱ्या हजारो सेविका देशाच्या कानाकोपऱ्यात उभ्या केल्या.
आमच्या घरासमोरच काही मोकळे प्लॉट होते. त्या मैदानावर समितीची शाखा लागत असे. माझ्या बहिणी इतर सेविकांसह ती शाखा सांभाळत. त्यावेळच्या नागपूरच्या काँग्रेस खासदाराच्या ताफ्यातील एक `दादा' आमच्या पलीकडील वस्तीत राहत असे. तो अनेकदा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन उभा राहत असे. सुमारे चाळीसेक वर्षांपूर्वीची ही कहाणी. त्यावेळी नागपूर सुद्धा आजच्या सारखे नव्हते. आमची वस्ती नवीनच होती. रिक्षावाले अंधार पडला की यायला घाबरत. वस्तीच्या मुख्य चौकात रात्री एकटेदुकटे जाणे कठीण होते. तलवारी वगैरे केव्हा निघतील नेम नसे. रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा राहणारा `दादा' तर मोठंच प्रस्थ होतं. पण समितीची शाखा. त्या सगळ्या मुलींची हिंमत, संघाची तगडी शाखा (आमची शाखा शंभरी शाखा होती), संघाची म्हणून जी खास कुटुंब होती त्यांचे परस्पर संबंध, या सगळ्यामुळे निर्माण झालेले वस्तीतील वातावरण यामुळे, कोपऱ्यावर उभे राहण्यापलीकडे त्या `दादाने'` काहीही केले नाही. तो करू शकला नाही.
हे सांगण्याचे कारण म्हणजे मावशी केळकर यांनी सांगितलेला approach.
जाहिरातीतील संदेश आणि मावशी केळकर यांनी दिलेला संदेश एकच आहे. पण दोन्हीचा approach मात्र फार वेगळा आहे. तो फार समजावून सांगण्याची गरज नाही. दोन्ही approach चे परिणाम गुणवत्ता म्हणूनही खूप वेगळे. दोन्हीची उदाहरणे आज मोठ्या प्रमाणात आजूबाजूला सहज दिसणारी. शेवटी कोणाचाही कोणताही approach हा प्रेरणा आणि प्रयोजन यांनी आकार घेतो. मावशी केळकर यांचा approach आणि जाहिरातीचा approach यात हा फरक आहे. संदेश एक असला तरीही. समाजासमोर दोन्ही आहे. काय स्वीकारायचं हा समाजाचा प्रश्न आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ८ ऑक्टोबर २०१८

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

काल्पनिक संवाद

काल्पनिक संवाद, वास्तवाशी सांगड घालण्यासाठी.
.........१.........
- तुम्ही महालक्ष्मी नाही मांडल्या का?
- नाही.
- का?
- आमच्याकडे महालक्ष्मीचा सण नाही.
- पण खूप जण करतात महालक्ष्मी.
- हो. पण आमच्याकडे नाही.
- पण तुम्ही का करत नाही?
🤣🤣🤣
.........२.........
- वांग्याची भाजी का केली?
- तीच होती घरात.
- मला वांगी नाही आवडत.
- ओके. पण मला माहित नव्हतं. तू जेवणार आहेस का?
- नाही. मी जेवूनच आलोय.
- मग?
- काही नाही असंच विचारलं. पण मला नाही आवडलं वांग्याची भाजी करणं. अन पटलंही नाही.
- बरं. आता बाजारातून भाजी आणली की दुसरी भाजी करीन.
- ते ठीक. पण आत्ताचं काय?
😄😄😄

हसावंसं वाटलं तर भरपूर हसा. किंवा नका हसू. पण कालपासून जाती वगैरेबाबत जी चर्चा, मतमतांतरे सुरु आहेत ती पाहून हेच संवाद सुचले. मला काय म्हणायचे आहे ते ज्यांना लक्षात येईल त्यांचेही भले होवो, ज्यांना येणार नाही त्यांचेही भले होवो.

जात

ज्यांना खरंच विचार करायचा आहे त्यांच्याचसाठी केवळ.
१) जात म्हणजे काय?
२) किती सुतार आज लाकूडकाम करतात?
३) किती सोनार दागिने घडवतात?
४) किती यादव दुधदुभत्याचा व्यवसाय करतात?
५) किती कुंभार मडकी बनवतात?
(लांबलचक यादी करता येईल.)
६) goldsmith म्हणजे काय?
७) blacksmith म्हणजे काय?
८) bootmaker म्हणजे काय?
९) oilman म्हणजे काय?
१०) carpenter म्हणजे काय?
११) scavenger म्हणजे काय?
१२) fisherman म्हणजे काय?
(लांबलचक यादी करता येईल.)
मानवाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक गरजांमधून जगभर विविध पद्धतीने जातींचा विकास होतो. आजही होतो आहे. पुढेही होत राहील. कोणीही ही प्रक्रिया थांबवू शकत नाही. भारतात त्याचे योजनापूर्वक व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठी ओशाळवाणे वाटण्याचे काहीही कारण नाही. अगदी रोटी बेटी व्यवहार सुद्धा (अयोग्य असले तरीही) मोठ्या प्रमाणात गरजेपोटी जन्माला आले. आज जातीव्यवस्था अस्तित्वातच नाही. राज्यघटनेने ती मोडीत काढली आहे आणि व्यवहारात सुद्धा ती अस्तित्वात नाही.

तरीही एवढी चर्चा का होते?
- सत्ता वा संपत्ती यासाठी.
- सूडभावना.
- राजकारण.
- मनातील किल्मिष आणि अविश्वास.
- मनाचा, वृत्तीचा कोतेपणा.
याशिवाय अन्य काहीही आज जुनी जात म्हणून अस्तित्वात नाही. वरील पाच कारणे दूर करणे हे घोषणांचे, कायद्यांचे काम नाही. मी काय करतो हा विचार प्रत्येकाने करणे हा एकच उपाय आहे.
जात हाच घटक लक्षात घेऊन घडणाऱ्या घटनांची चर्चा करतानाही, suffering and sufferer एवढ्याच मर्यादेत करण्याची मर्यादा आणि दक्षता घेणे हे सुबुद्ध माणसांचे कर्तव्य आहे. समोर दिसत असूनही, त्याला खतपाणी न घालता, सत्याचा वगैरे अतिरेकी आवेश न आणता, त्याकडे दुर्लक्ष करून त्यातील हवा काढून टाकण्याची शहाणीव दाखवायला हवी. प्रामाणिक कळकळीच्या लोकांची ही जबाबदारी आहे. आपल्याला काय वाटते किंवा आपण स्वत:चे वर्चस्व कसे सिद्ध केले किंवा दुसऱ्याला कसे कोंडीत पकडले याचा विचार करणे आणि समाजाच्या कल्याणाच्या प्रक्रियेकडे लक्ष न देणे; हे शोभणारे ठरत नाही. असा विचार न करता, वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या महात्मा गांधींचा अनुयायी म्हणवणारी व्यक्ती जेव्हा तर्कशून्य शेरेबाजी करताना दिसते तेव्हा फक्त एकच शब्द तोंडी येतो - अरेरे !!

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

उज्जैन


मध्यंतरी दोन दिवस उज्जैनला होतो. काही निरीक्षणे.
- शहर छान आहे.
- क्षीप्रा नदी मोठी, वाहती, स्वच्छ, देखणी आहे.
- क्षीप्रा नदीत मासोळ्या भरपूर आहेत. मुरमुरे, कणिकगोळे टाकले की झुंडी धावत येतात. त्यांच्याशी खेळणे हा निरागस आनंद.
- श्री महाकाल मंदिर मोठे, विस्तीर्ण आहे. व्यवस्था चांगल्या आहेत. धक्काबुक्की नाही. पंडे नाहीत.
- शिवलिंगाचे स्पष्ट दर्शन होईल अशी व्यवस्था.
- महाकाल मंदिर क्षीप्रा नदीपासून थोडे दूर आहे. रुद्रसागर तलावाकाठी.
- महाकाल मंदिराच्या जवळच देखणे, शांत, पवित्र `भारत माता मंदिर' आहे.
- खाणे पिणे, रिक्षा आदी महाराष्ट्रापेक्षा थोडे स्वस्त.
- डास नाहीत.
- श्री भैरवनाथ ही वेगळी स्वतंत्र देवता. श्री भैरवनाथ म्हणजे श्री महाकालाचे सेनापती.
- त्यांचे मंदिर शहरापासून लांब जंगलात आहे.
- मदिरा जेथे अर्पण केली जाते ते मंदिर श्री भैरवनाथाचे. तेथे अनेक भक्त, मुली, महिला सुद्धा फुलांच्या टोपलीसोबत मदिरेची बाटली पुजाऱ्याच्या हाती देतात. त्याची जबरदस्ती नाही. दारू चढवलीच पाहिजे असे नाही.
- मदिरापान न करणारेही बाटली अर्पण करतात आणि परत मिळणारी अर्धी बाटली तिथल्याच रिक्षावाला किंवा अन्य कोणाला देऊन टाकतात.
- मदिरा अर्पण करण्याची पद्धत असूनही श्री भैरवनाथ मंदिरातील वातावरण मात्र अन्य मंदिरांप्रमाणेच सामान्य. कुठेही असभ्यता, अश्लीलता, तमाशे नाहीत.
- शहराच्या जवळच जंगलात नीतिशतक कर्ते श्री. भर्तृहरी यांची गुहा आहे. नाथ संप्रदायाचे हे एक महत्वाचे स्थान आहे. या जागेला तपश्चर्येचा सुगंध आहे.
- श्री. भर्तृहरी हे सम्राट विक्रमादित्य याचे बंधू. एक बंधू सम्राट आणि एक बंधू नाथजोगी फकीर.
- बाजारात मलाईदार दूध, रबडी, भांग आदी भरपूर उपलब्ध.

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

नीती आयोगाचा इशारा

इ.स. २०३० नंतर म्हणजे फक्त १२ वर्षांनी पाण्यासाठी संघर्ष सुरु होतील असा इशारा खुद्द नीती आयोगाने दिला आहे. १९९६ साली केलेल्या सूचना अद्याप अमलात आलेल्या नाहीत आणि सरकारचे अजूनही याकडे लक्ष नाही, अशा दोन टिप्पण्याही आयोगाने केल्या आहेत. थोडक्यात म्हणजे संकट दार ठोठावते आहे. किंबहुना दारावर धडका मारते आहे. दार कधी मोडेल सांगता येत नाही. आपल्याला याचं गांभीर्य समजतं आहे का? पाण्याचा प्रश्न केवळ साठवणूक वाढवून आणि बचत करून सुटणारा नाही. जमिनीतील पाणी वाढणे, झरे निर्माण होणे, वाहते होणे महत्वाचे आहे. आपण, आपली जीवनपद्धती, आपली अनास्था अमानुष आणि राक्षसी आहे; हे मान्य करण्याचं धाडस आणि समंजसपणा दाखवण्याला पर्याय नाही. वाईट वाटो, राग येवो, अपमान वाटो; पण घरातले पाण्याचे भांडे घेऊन रस्त्यावर उतरणे आणि मारामारी करणे यापेक्षा आजच अपमानाचा घोट गिळणे चांगले. गाड्या, सिमेंट-कोन्क्रीटचे प्रेम, मातीचा द्वेष, अमाप सुखसाधनांचा हव्यास, महानगरांचे वेड; हे सारे कठोरपणे आणि क्रूरपणे सोडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. केवळ झाडे लावा झाडे लावा हे नाटक पुरेसे नाही. झाडे पाउस पाडतील कदाचित पण माती नसेल आणि त्यात पाणी झिरपणार नसेल तर त्याचा काय उपयोग? उलट असले नसलेले पाणी झाडे शोषून घेतील. ते माणसाने पाणी देण्याची वाट पाहत नाहीत. झाडे उपकार करतात तसेच स्वत:च्या अस्तित्वासाठी माणसाला बाजूलाही सारतील. आज खनिज तेलाने आमच्या नाकी नऊ आणले आहेत. उद्या आमच्या उन्मत्त दांभिकतेने आणि मानवी कर्तृत्वाच्या आत्यंतिक उन्मादाने माणूसच माणसाचा भस्मासुर होऊ नये. आम्ही वाट्टेल ते करत राहू अन त्यावर उपाय शोधणे म्हणजेच पुरुषार्थ हे आत्मफसवेपण नालायकांचे उद्योग म्हणूनच शोभू शकतात. नाक, कान, डोळे, हृदय, मेंदू, सगळे कमकुवत होत असल्याच्या बातम्या पाहायच्या. सर्वेक्षणे करायची, अन दुसऱ्याच क्षणी पुरुषार्थाचा अविचारी ढोंगी टेंभा पाजळायचा हे चुकीचे आहे. केवळ आणि केवळ मन आणि इच्छा यांची गुलामी हे माणसाचे लांच्छन आहे. सरकारने देखील लोकानुरंजन बाजूला ठेवून धोरणे आणि अंमलबजावणी याकडे पाहिले पाहिजे. अन अंमलबजावणी म्हणजे केवळ कायद्याचे कठोर पालन, कठोर शिक्षा इत्यादी नसते हेही लक्षात घेतले पाहिजे. जसे व्यक्तीने व समाजाने तसेच सरकारनेही स्वत:च्या संदर्भात कठोर व्हायला पाहिजे. नीती आयोग म्हणजे एक प्रकारे सरकारच. खुद्द पंतप्रधान त्याचे अध्यक्ष. त्यामुळे सरकार आता याबाबत काही करते का हे पाहावे लागेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ४ सप्टेंबर २०१८

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

वेगळे घर आणि कलह

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया येथील प्रकरणांवर चर्चा सुरु असताना एकाने मुद्दा मांडला की, अफजल गुरूच्या संबंधात काश्मीरच्या पीडीपी पक्षाची भूमिकाही वेगळी (म्हणजे त्याची फाशी अयोग्य आहे अशी) आहे. भाजपा त्यांच्यासोबत सत्तेत राहू शकते, अन जेएनयु व प्रेस ट्रस्ट मधील लोकांवर मात्र आक्षेप; हे कसे? प्रश्न खरंच छान आहे. वरवर पाहता बिनतोड सुद्धा. पण हा युक्तिवाद ऐकला आणि खुदकन हसायला आलं. आईनस्टाईनची एक गोष्ट सांगतात. त्याने मांजर आणि तिच्या पिल्लासाठी दोन वेगळी दारे केली होती. मांजरीच्या मोठ्या दारातून लहान पिल्लू जाऊ शकेल हे सापेक्षतेचा सिद्धांत मांडणाऱ्या आईनस्टाईनच्या लक्षातच आलं नाही. बहुधा आजचे सगळे विद्वान आईनस्टाईनच्या मार्गावरच असावेत. अन्यथा वरील बिनतोड युक्तिवाद सुचलाच नसता. कुटुंबातल्या घटकांनी गरजेपोटी, सोयीसाठी वेगळे राहणे आणि कलहातून कुटुंब विभक्त होणे याचा फरक कळणे इतके दुरापास्त का व्हावे? अफजल गुरुबद्दल वेगळे मत वा सहानुभूती असणे आणि ज्या व्यवस्थेने याबाबत निर्णय घेतला त्याबद्दल शत्रुत्व असणे, देशाच्या शत्रूबद्दल प्रेम असणे, मनात केवळ सूड आणि द्वेष असणे; यातील फरक समजत नाही की समजून न समजल्यासारखे करायचे आहे? देशभरात अगदी दिल्ली ते गल्ली असे लोक आहेत. विचारस्वातंत्र्य अन अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांच्या नावाखाली त्यांना सूड, द्वेष आणि शत्रुता करायची आहे. एका घराची दोन, तीन, चार घरे होणे क्लेशदायक नसते. क्लेशदायक असतो कलह. कलह कधीच समर्थनीय होऊ शकत नाही. डार्विनचा सिद्धांत, समाजवाद, पाश्चात्य लोकशाही, इंग्रजांची सत्ताभिलाशी धूर्तता; यांनी या देशात संघर्ष आणि संघर्षाच्या chain reaction ची बीजे पेरली. येथील असलेल्या व नसलेल्या देखील त्रुटींचा, कमजोरींचा, येथील वेगळ्या जीवनशैलीचा आणि जीवनदृष्टीचा उपयोग त्यांनी यासाठी करून घेतला. काळाचा महिमा आणि सत्ता व संपत्तीची जादू यांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. समस्यांचा वा प्रश्नांचा विचार विश्लेषणात्मक पद्धतीने करावयाचा असतो आणि त्यावरील उपायांचा विचार संश्लेषणात्मक पद्धतीने करायचा असतो. सगळे पाश्चात्य विचार, सिद्धांत वा शास्त्रे मात्र; समस्या आणि त्याचे उपाय दोन्हीचा विचार विश्लेषणात्मक पद्धतीनेच करतात. उदा.- बोटाला काही झाले तर त्याची चिकित्सा बोट म्हणूनच करावी लागेल. पण त्याला पट्टी बांधताना किंवा प्लास्टर घालताना किंवा औषधयोजना करताना हाताचा वा संपूर्ण शरीराचा विचार अपरिहार्य ठरतो. पट्टी बांधताना वा प्लास्टर घालताना बाकीच्या हाताची सोय, गैरसोय पाहावी लागतेच. किंवा द्यावयाच्या औषधाचा अन्य काही परिणाम होत नाही ना हेही पहावे लागते. कारण त्रास बोटाला असला तरीही बोट हे हाताचे वा शरीराचे अंग आहे हे नजरेआड करून चालत नाही. यालाच म्हणतात एकात्म दृष्टी. holistic approach तो हाच. मात्र गेली अनेक वर्ष शिक्षण, प्रबोधन, बौद्धिक चळवळी आदी माध्यमातून आमची दृष्टी इतकी विकृत करून टाकली आहे की हे समजण्याची शक्तीही आम्ही गमावतो आहोत की काय असे वाटते. महात्मा गांधी ज्यावेळी म्हणत की, don't throw baby with bathwater, तेव्हा त्यांना हेच अभिप्रेत होते. चुकीच्या रस्त्याने आम्ही खूप दूर आलो आहोत. मागे फिरून पुन्हा योग्य मार्ग धरावा लागेल. त्याला इलाज नाही. काश्मीर काय, फुटीरतावाद काय, इसीस काय किंवा विचार वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे काय... योग्य रस्ता धरण्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १२ फेब्रुवारी २०१६