शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

निवेदिता प्रसंग

आदिशक्तीच्या जागरणाच्या नऊ रात्री. त्यानिमित्त अभिवादन- शक्तीस्वरूपा सारदा मां आणि शक्तीस्वरूपा भगिनी निवेदिता. योगायोगाने आज भगिनी निवेदिता यांचा स्मृतिदिन. अन्य अनेक थोरांप्रमाणे त्याही अवघ्या ४३ व्या वर्षी हे जग सोडून गेल्या. दूर कुठल्या आयर्लंडची ही कन्या, भारतमातेची ललामभूत सुपुत्री ठरली. ज्ञान, अध्ययन, लेखन, शिक्षण, सेवा, क्रांतिकार्य यात विलक्षण योगदान देऊन त्या गेल्या.

त्यांच्या जीवनातील छोटासा प्रसंग- एकदा रात्रीच्या वेळी एक क्रांतिकारक त्यांना भेटायला येतो. त्या त्याच्याशी बोलतात, विचारपूस करतात आणि जेवण झालं का विचारतात. तो म्हणतो, दोन दिवसांपूर्वी झालं होतं. त्या त्याला जेवायला बसवतात. त्याच्यासमोर ताट ठेवतात. तो जेवतो आणि झोपी जातो. त्यांना सोबत करायला असलेली मुलगी त्यांना विचारते- तुम्ही स्वत: चार दिवस जेवलेल्या नाहीत. मग त्याला का दिलंत तुमचं ताट? त्या फक्त एकच वाक्य उच्चारतात- मी या सगळ्यांची आई आहे.

आई आणि बाई यातला महान भेद किती सहजतेने सांगितला निवेदितांनी. सृजन म्हणजे फक्त जन्माला घालणे नव्हे. या विश्वातील नवनवोन्मेशशाली कोट्यवधी सृजनासाठी गाडून घेणारं प्रत्येक तत्व म्हणजे आई. जन्माला घालणं, संगोपन आणि लालन पालन करणं अन तेच भंगून टाकून त्या द्रव्यातून पुन्हा नवीन सृजन करणं; साराच त्या आदिशक्तीचा विलास. त्या आदिशक्तीने स्वत:ला गाडून घेतलं म्हणून हे विश्व आकारास आलं. सृजनाचा हा पिसारा दिसतो पण त्यासाठी गाडून घेतल्यामुळे आई दिसत नाही. अन युगानुयुगे हे जग, या विश्वातील कणनकण शोधतो आहे आपल्या आईला.

हेच आईपण जगणाऱ्या, भोगणाऱ्या अन समजावून सांगणाऱ्या निवेदितांनी आजच्याच दिवशी दार्जीलिंग येथे शेवटला श्वास घेतला.

या नवरात्रीतील आदिशक्तीचे जागरण या विश्वातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषातील, प्रत्येक सजीव आणि निर्जीवातील, प्रत्येक सचेतन आणि अचेतनातील, प्रत्येक अणुरेणूतील `आई' जागवो असा जोगवा मागतो. जोगी आणखीन काय करू शकतो?

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

व्यक्तिवाद

भारतीय चिंतन हे मूलतः व्यक्तिवादी चिंतन आहे. व्यक्तिवाद भारताला नवीन नाही. किंबहुना भारतीय विचार प्रचलित व्यक्तिवादाहून अधिक व्यक्तिवादी आहे. परंतु या दोन व्यक्तिवादात दोन फरक आहेत.
१) प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे भौतिकता, ऐहिकता, जडवाद, भोगवाद, वर्चस्ववाद हे भारतीय व्यक्तिवादाचे आधार नाहीत.
२) भारतीय व्यक्तिवादाने त्याची जबाबदारी व्यक्तीवर टाकलेली आहे. प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे समाजावर नाही. आम्हाला आमच्या मताप्रमाणे जगता आले पाहिजे हे दोघांनाही मान्य असले तरीही; त्यातील यश, अपयश, त्रास, संघर्ष, मान्यता, अमान्यता, कौतुक, हेटाळणी यांची जबाबदारी समाजाची; असे प्रचलित व्यक्तिवाद म्हणतो. आम्हाला काय वाटावे किंवा आम्ही काय करावे यात समाजाला say असता कामा नये, पण परिणामांची जबाबदारी आणि आपल्या मतानुसार वागण्यासाठी अनुकूल स्थिती देण्याची जबाबदारी मात्र समाजाची; हा प्रचलित व्यक्तिवादी विचार आहे. तो समाजाला व्यक्तीचा नोकर अशा स्वरूपात पाहतो. तो समाजाला गृहित धरतो. याउलट भारतीय व्यक्तिवाद पूर्ण स्वातंत्र्यासोबत पूर्ण जबाबदारी घ्यायला सांगतो आणि समाज आणि व्यक्तीचे संबंध mutual आहेत असे मानतो.

जोगवा

नेहमीप्रमाणे आजही, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती आली. तिचे नाव गाव माहिती नाही. पण चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र अशा दोन्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती येते. जोगवा मागायला. बरीच वर्षे झाली. नेम चुकलेला नाही. आई येथे असताना त्या दोघींच्या गप्पाही होत. आई येथे नसल्याला तीन वर्षे झाली. तरीही ती येते. कारण ती जोगवा मागायला आल्यानंतर तिला शिधा, दक्षिणा देण्याचे मी सुरूच ठेवले आहे. आजही ती येऊन गेली. शिधा, दक्षिणा घेऊन गेली. हा काही तिचा व्यवसाय नाही. अन दोन नवरात्रीत जोगवा मागून वर्षभर उदरनिर्वाह चालतही नाही. हे तिचे व्रत आहे आणि ती ते निष्ठेने करते आहे. भारतीय समाजजीवनाचा एक चिवट धागा मला यात दिसतो. दान मागणे आणि दान देणे या दोन्हीत चुकीचे आणि ओशाळवाणे काही नाही. भारतात तसे कधी समजले गेले नाही. आज तसे समजले जाते याचे कारण आपण भारतीय ethos चा त्याग केलेला आहे. भारतीय संदर्भात `भिक्षा' ही खूप वेगळी कल्पना आहे. प्रत्येक गोष्टीचे महत्व, मूल्य, किंमत, उपलब्धता सारखी असू शकत नाही; प्रत्येक व्यक्तीची क्षमता, कल आणि गुण समान असू शकत नाही; तरीही प्रत्येकाला चांगले जगण्याचा हक्क आहे आणि प्रत्येकाच्या वेगळेपणाची समाजाला व सृष्टीला गरज आहे; या सगळ्याचा मेळ घालणे; आणि या प्रयत्नातून मानवी जीवन अंतरंगसमृद्ध करणे; याचं जे एक web designing भारताने केलेलं आहे ते लक्षणीय आहे. त्यामुळेच बारकाईने पाहिलं तर `दान' हा व्यक्तीजीवनाचा, समाजजीवनाचा, विश्वजीवनाचा, धार्मिक जीवनाचा, आध्यात्मिक जीवनाचा पाया आणि आधार आहे. वर्तमान आर्थिक, सामाजिक समस्यांच्या दाहक वास्तवाचा विचार करताना वास्तविक भारताच्या या पैलूचा अधिक आणि सर्वंकष विचार व्हायला हवा, समोर मांडला जायला हवा. मात्र, कालमहिमा असा आहे की आमच्यावर भारतेतर विचार, भावभावना वरचढ आहेत आणि `मी' हा कमालीचा मोठा झाला आहे. अर्थात काळ कूस पालटत असतो, हेही खरे.

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

approach


सध्या कुस्तीस्पर्धांची एक जाहिरात सुरु आहे. एक तरुण मांडीवर थाप मारून एका तरुणीला आव्हान देतो आणि ती तरुणी न घाबरता तशीच मांडीवर थाप देते आणि न बोलता पुढे जाते. तरुण खजील होऊन खाली मान घालतो. जाहिरातीतून जो संदेश दिला तो स्पृहणीय आहेच.
कालच राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या जीवनावर एक बोलपट लोकसभा टीव्हीवर पाहिला. काही गोष्टींची उजळणी झाली. सध्या सुरु असणाऱ्या कुस्ती स्पर्धांच्या जाहिरातीतून जो संदेश देण्यात येत आहे तोच संदेश घेऊन मावशी १९३६ साली उभ्या राहिल्या. पतीच्या निधनानंतर आणि नऊवारी पातळ नेसून. सगळ्या भारतभर तो संदेश पोहोचवला आणि त्यानुसार वागणाऱ्या, दंड खांद्यावर घेऊन थाटात संचलन करणाऱ्या हजारो सेविका देशाच्या कानाकोपऱ्यात उभ्या केल्या.
आमच्या घरासमोरच काही मोकळे प्लॉट होते. त्या मैदानावर समितीची शाखा लागत असे. माझ्या बहिणी इतर सेविकांसह ती शाखा सांभाळत. त्यावेळच्या नागपूरच्या काँग्रेस खासदाराच्या ताफ्यातील एक `दादा' आमच्या पलीकडील वस्तीत राहत असे. तो अनेकदा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन उभा राहत असे. सुमारे चाळीसेक वर्षांपूर्वीची ही कहाणी. त्यावेळी नागपूर सुद्धा आजच्या सारखे नव्हते. आमची वस्ती नवीनच होती. रिक्षावाले अंधार पडला की यायला घाबरत. वस्तीच्या मुख्य चौकात रात्री एकटेदुकटे जाणे कठीण होते. तलवारी वगैरे केव्हा निघतील नेम नसे. रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा राहणारा `दादा' तर मोठंच प्रस्थ होतं. पण समितीची शाखा. त्या सगळ्या मुलींची हिंमत, संघाची तगडी शाखा (आमची शाखा शंभरी शाखा होती), संघाची म्हणून जी खास कुटुंब होती त्यांचे परस्पर संबंध, या सगळ्यामुळे निर्माण झालेले वस्तीतील वातावरण यामुळे, कोपऱ्यावर उभे राहण्यापलीकडे त्या `दादाने'` काहीही केले नाही. तो करू शकला नाही.
हे सांगण्याचे कारण म्हणजे मावशी केळकर यांनी सांगितलेला approach.
जाहिरातीतील संदेश आणि मावशी केळकर यांनी दिलेला संदेश एकच आहे. पण दोन्हीचा approach मात्र फार वेगळा आहे. तो फार समजावून सांगण्याची गरज नाही. दोन्ही approach चे परिणाम गुणवत्ता म्हणूनही खूप वेगळे. दोन्हीची उदाहरणे आज मोठ्या प्रमाणात आजूबाजूला सहज दिसणारी. शेवटी कोणाचाही कोणताही approach हा प्रेरणा आणि प्रयोजन यांनी आकार घेतो. मावशी केळकर यांचा approach आणि जाहिरातीचा approach यात हा फरक आहे. संदेश एक असला तरीही. समाजासमोर दोन्ही आहे. काय स्वीकारायचं हा समाजाचा प्रश्न आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ८ ऑक्टोबर २०१८

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

काल्पनिक संवाद

काल्पनिक संवाद, वास्तवाशी सांगड घालण्यासाठी.
.........१.........
- तुम्ही महालक्ष्मी नाही मांडल्या का?
- नाही.
- का?
- आमच्याकडे महालक्ष्मीचा सण नाही.
- पण खूप जण करतात महालक्ष्मी.
- हो. पण आमच्याकडे नाही.
- पण तुम्ही का करत नाही?
🤣🤣🤣
.........२.........
- वांग्याची भाजी का केली?
- तीच होती घरात.
- मला वांगी नाही आवडत.
- ओके. पण मला माहित नव्हतं. तू जेवणार आहेस का?
- नाही. मी जेवूनच आलोय.
- मग?
- काही नाही असंच विचारलं. पण मला नाही आवडलं वांग्याची भाजी करणं. अन पटलंही नाही.
- बरं. आता बाजारातून भाजी आणली की दुसरी भाजी करीन.
- ते ठीक. पण आत्ताचं काय?
😄😄😄

हसावंसं वाटलं तर भरपूर हसा. किंवा नका हसू. पण कालपासून जाती वगैरेबाबत जी चर्चा, मतमतांतरे सुरु आहेत ती पाहून हेच संवाद सुचले. मला काय म्हणायचे आहे ते ज्यांना लक्षात येईल त्यांचेही भले होवो, ज्यांना येणार नाही त्यांचेही भले होवो.

जात

ज्यांना खरंच विचार करायचा आहे त्यांच्याचसाठी केवळ.
१) जात म्हणजे काय?
२) किती सुतार आज लाकूडकाम करतात?
३) किती सोनार दागिने घडवतात?
४) किती यादव दुधदुभत्याचा व्यवसाय करतात?
५) किती कुंभार मडकी बनवतात?
(लांबलचक यादी करता येईल.)
६) goldsmith म्हणजे काय?
७) blacksmith म्हणजे काय?
८) bootmaker म्हणजे काय?
९) oilman म्हणजे काय?
१०) carpenter म्हणजे काय?
११) scavenger म्हणजे काय?
१२) fisherman म्हणजे काय?
(लांबलचक यादी करता येईल.)
मानवाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक गरजांमधून जगभर विविध पद्धतीने जातींचा विकास होतो. आजही होतो आहे. पुढेही होत राहील. कोणीही ही प्रक्रिया थांबवू शकत नाही. भारतात त्याचे योजनापूर्वक व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठी ओशाळवाणे वाटण्याचे काहीही कारण नाही. अगदी रोटी बेटी व्यवहार सुद्धा (अयोग्य असले तरीही) मोठ्या प्रमाणात गरजेपोटी जन्माला आले. आज जातीव्यवस्था अस्तित्वातच नाही. राज्यघटनेने ती मोडीत काढली आहे आणि व्यवहारात सुद्धा ती अस्तित्वात नाही.

तरीही एवढी चर्चा का होते?
- सत्ता वा संपत्ती यासाठी.
- सूडभावना.
- राजकारण.
- मनातील किल्मिष आणि अविश्वास.
- मनाचा, वृत्तीचा कोतेपणा.
याशिवाय अन्य काहीही आज जुनी जात म्हणून अस्तित्वात नाही. वरील पाच कारणे दूर करणे हे घोषणांचे, कायद्यांचे काम नाही. मी काय करतो हा विचार प्रत्येकाने करणे हा एकच उपाय आहे.
जात हाच घटक लक्षात घेऊन घडणाऱ्या घटनांची चर्चा करतानाही, suffering and sufferer एवढ्याच मर्यादेत करण्याची मर्यादा आणि दक्षता घेणे हे सुबुद्ध माणसांचे कर्तव्य आहे. समोर दिसत असूनही, त्याला खतपाणी न घालता, सत्याचा वगैरे अतिरेकी आवेश न आणता, त्याकडे दुर्लक्ष करून त्यातील हवा काढून टाकण्याची शहाणीव दाखवायला हवी. प्रामाणिक कळकळीच्या लोकांची ही जबाबदारी आहे. आपल्याला काय वाटते किंवा आपण स्वत:चे वर्चस्व कसे सिद्ध केले किंवा दुसऱ्याला कसे कोंडीत पकडले याचा विचार करणे आणि समाजाच्या कल्याणाच्या प्रक्रियेकडे लक्ष न देणे; हे शोभणारे ठरत नाही. असा विचार न करता, वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या महात्मा गांधींचा अनुयायी म्हणवणारी व्यक्ती जेव्हा तर्कशून्य शेरेबाजी करताना दिसते तेव्हा फक्त एकच शब्द तोंडी येतो - अरेरे !!

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

उज्जैन


मध्यंतरी दोन दिवस उज्जैनला होतो. काही निरीक्षणे.
- शहर छान आहे.
- क्षीप्रा नदी मोठी, वाहती, स्वच्छ, देखणी आहे.
- क्षीप्रा नदीत मासोळ्या भरपूर आहेत. मुरमुरे, कणिकगोळे टाकले की झुंडी धावत येतात. त्यांच्याशी खेळणे हा निरागस आनंद.
- श्री महाकाल मंदिर मोठे, विस्तीर्ण आहे. व्यवस्था चांगल्या आहेत. धक्काबुक्की नाही. पंडे नाहीत.
- शिवलिंगाचे स्पष्ट दर्शन होईल अशी व्यवस्था.
- महाकाल मंदिर क्षीप्रा नदीपासून थोडे दूर आहे. रुद्रसागर तलावाकाठी.
- महाकाल मंदिराच्या जवळच देखणे, शांत, पवित्र `भारत माता मंदिर' आहे.
- खाणे पिणे, रिक्षा आदी महाराष्ट्रापेक्षा थोडे स्वस्त.
- डास नाहीत.
- श्री भैरवनाथ ही वेगळी स्वतंत्र देवता. श्री भैरवनाथ म्हणजे श्री महाकालाचे सेनापती.
- त्यांचे मंदिर शहरापासून लांब जंगलात आहे.
- मदिरा जेथे अर्पण केली जाते ते मंदिर श्री भैरवनाथाचे. तेथे अनेक भक्त, मुली, महिला सुद्धा फुलांच्या टोपलीसोबत मदिरेची बाटली पुजाऱ्याच्या हाती देतात. त्याची जबरदस्ती नाही. दारू चढवलीच पाहिजे असे नाही.
- मदिरापान न करणारेही बाटली अर्पण करतात आणि परत मिळणारी अर्धी बाटली तिथल्याच रिक्षावाला किंवा अन्य कोणाला देऊन टाकतात.
- मदिरा अर्पण करण्याची पद्धत असूनही श्री भैरवनाथ मंदिरातील वातावरण मात्र अन्य मंदिरांप्रमाणेच सामान्य. कुठेही असभ्यता, अश्लीलता, तमाशे नाहीत.
- शहराच्या जवळच जंगलात नीतिशतक कर्ते श्री. भर्तृहरी यांची गुहा आहे. नाथ संप्रदायाचे हे एक महत्वाचे स्थान आहे. या जागेला तपश्चर्येचा सुगंध आहे.
- श्री. भर्तृहरी हे सम्राट विक्रमादित्य याचे बंधू. एक बंधू सम्राट आणि एक बंधू नाथजोगी फकीर.
- बाजारात मलाईदार दूध, रबडी, भांग आदी भरपूर उपलब्ध.