बुधवार, १७ जून, २०१५

भत्त्याचे महाभारत

शेजारच्या दुकानात गेलो होतो. मालक लहानपणापासूनचा मित्र. शेजारी राहणारे. स्टेशनरी सामान, झेरॉक्स, इंटरनेट कॅफे, विविध ऑनलाईन कामे असा त्याचा व्याप. तिथे एक त्याच्या ओळखीचे गृहस्थ आले होते. त्यांचे काम तो करत होता. ते सगळे काम सुरु होते इंडियन अॉईलच्या वेबसाईटवर. ते गेल्यावर सहज गप्पा झाल्या. मित्राने त्या गृहस्थांचे जे काम केले त्याबद्दल सांगितले. ते गृहस्थ इंडियन अॉईलमधून फोरमन म्हणून सेवानिवृत्त झालेले. मासिक ३५-४० हजार रुपये पेन्शन. याशिवाय दर सहा महिन्याला १० हजार रुपये, म्हणजे वर्षाचे २० हजार रुपये त्यांना मिळतात. बोनस म्हणून. तसेच इंडियन अॉईलने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दोन पर्याय ठेवले आहेत- १) दर सहा महिन्यांनी ४० हजार रुपये घ्या किंवा २) दर तीन महिन्यांनी तुमचा जेवढा खर्च होईल तो पूर्ण खर्च घ्या. वैद्यकीय भत्ता म्हणून. क्लेम करायचा आणि पैसे घ्यायचे. त्यात `किरकोळ' अशा पर्यायाखाली काही गोष्टींची यादी आहे. त्यात चष्मा असाही पर्याय आहे. या गृहस्थांनी एकदा चष्म्यासाठी क्लेम केला. किती? १० हजार रुपये अन दुसऱ्या दिवशी १० हजार रुपये जमाही झालेत. दर तीन महिन्यांनी ३०-४० हजार रुपयांचा क्लेम केला जातो आणि तेवढे पैसे त्यांना मिळतात. या सगळ्या प्रकारात बेकायदेशीर काहीही नाही. पण याला नैतिक म्हणता येईल का?

यानिमित्ताने आम्ही काही मुद्यांची चर्चा केली.
१) हा सगळा प्रकार कायदेशीर असेल, पण नैतिक आहे का?
२) ३५-४० हजार रुपये पेन्शन असताना एवढे प्रचंड भत्ते कशासाठी?
३) चांगला खातापिता, चालता फिरता माणूस इतका आजारी असतो का?
४) वैद्यकीय भत्ता नियमितपणे देण्याला काय अर्थ आहे? माणूस सतत काय दवाखान्यातच राहतो का? नेहमीच आजारी असतो का?
५) साध्या फोरमनला किमान लाखभर रुपये दरवर्षाला विनाकारण वाटले जातात. असे खालच्या पदापासून उच्च पदापर्यंत हजारो लोक असतील, ज्यांना ही खैरात वाटली जाते.
६) हाच खर्च कंपनीच्या ताळेबंदात दाखवला जातो आणि कंपनीच्या उत्पादनांचे भाव त्यानुसार ठरवले जातात. म्हणजेच पेट्रोल, डिझेलच्या दरात या खैरातीचा वाटाही असतो.
७) अशा तेल क्षेत्रातील सगळ्या कंपन्या विचारात घेतल्या तर हा घोळ कितीतरी वाढेल.
८) तेलाशिवाय कितीतरी क्षेत्रातील वेगवेगळ्या सरकारी कंपन्या आहेत. त्यांच्यात सुद्धा असा काही ना काही प्रकार असेलच.
९) खाजगी क्षेत्रात तर हा सगळा प्रकार कितीतरी अधिक प्रमाणात आहे.
१०) खतांच्या किंवा औषधांच्या कंपन्या तर आपल्या किरकोळ विक्रेत्यांना सहकुटुंब विदेश वारीवर वगैरे पाठवतात.
११) या सगळ्याचा भुर्दंड जनतेवर पडत नाही का? तो योग्य आहे का? जनतेने तो का सहन करायचा?
१२) महागाई, चलन फुगवटा, तुटवडा, भांडवली समस्या; यासारखी अर्थकारणाची अरिष्टे यापोटीच जन्म घेत नाहीत का?
१३) यासंबंधात सामाजिक चर्चा, प्रबोधन, स्पष्ट भूमिका, नियोजन, निर्णय; हे सारे व्हायला हवे की नाही?
१४) नुसता राजकीय चिंधी बाजार मांडून यातून मार्ग निघेल का?
१५) किमती ठरवण्याचा योग्य मार्ग निवडून त्याची अंमलबजावणी झाल्यास जो पैसा हाती येईल त्यातून अनेक कामे होऊ शकतील, अनेक कुटुंब चालू शकतील.

एका व्यक्तीवर एक लाख रुपये हा अगदी हात राखून अंदाज केला तरीही, या एक लाखात एक सामान्य घर चालू शकेल. अशी लाखो घरे चालू शकतील. अशा लाखो लोकांना चांगल्या, उत्पादक कामात सहभागी करून घेता येऊ शकेल. सामाजिक कार्य असा वेगळा विभाग करून हे करता येईल. आज पैशाची खूप अपेक्षा न ठेवता, गरज पूर्ण होईल इतपत पैसा मिळाल्यास; कामात झोकून देणारे हजारो स्त्री पुरुष आहेत. स्व. नानाजी देशमुख यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या अंतर्गत असेच प्रयोग केले आहेत. एकल विद्यालये हा असाच प्रयोग आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे असेच प्रयोग आहेत. अन्यही आहेत. यातून शिक्षण, आरोग्य, सेवा, संस्कार, स्वच्छता, प्रबोधन, सामाजिक स्वास्थ्य, कला; अशा अनेक क्षेत्रात खूप भरीव असे काम होऊ शकेल.

पण स्व. नानाजींचा आदर्श आम्ही ठेवू का? राज्यकर्त्यांचे बाजूला ठेवा, समाजाला तो हवा आहे का?

गुरुवार, ११ जून, २०१५

प्रामाणिक विचार करताना

स्कील डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया आणि एकूण आर्थिक इतिहास याविषयी विचार करताना सहज एक कल्पना चमकून गेली की, आमच्या येथील जुन्या जातिव्यवस्थेबद्दल प्रचंड घृणा, अनेक विपरीत अर्थ, गैरसमज वगैरे इंग्रजी शासनकर्त्यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक तर नसतील पसरवले? उत्पादन, वितरण, उपभोग, तंत्रज्ञान, कौशल्य, कच्चा माल, पक्का माल, साठवणुकीच्या सोयी, गुंतवणूक, मनुष्यबळ वगैरे गोष्टींवरच अर्थकारण अवलंबून असते. जगात कुठेही गेले तरी. गेली अनेक वर्षे जगात सगळे देश, सगळे समाज याच गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या जाती व्यवस्थेत या गोष्टींचा अन शिवाय सामाजिक स्थिरता, मूल्य, व्यक्तिमत्व विकास यांचा अपूर्व संगम होता. अर्थात सगळ्या व्यवस्थांप्रमाणे त्याचेही गुणदोष होते. त्याची चिकित्सा होतही होती आणि व्हायलाही हवी. पण आज जातीव्यवस्था हा शब्द उच्चारायची सुद्धा सोय राहिलेली नाही. तो शब्द उच्चारताच अंगावर पाल पडल्यासारखी प्रतिक्रिया उमटते. हा जो नकारात्मक, घृणेचा, पापाचा आणि ओशाळलेपणाचा भाव आहे, तो निर्माण करून इंग्रजांनी आपले इप्सित तर साध्य केले नसेल? अन्यथा, उण्यापुऱ्या २०० वर्षांपूर्वी ज्या देशात भिकारी नव्हता (खुद्द ब्रिटीश संसदेत १८३५ साली हे अधिकृतपणे सांगण्यात आले.) त्या देशाची आज ही स्थिती का झाली असावी? यावर सखोल, प्रामाणिक चिंतन व्हायला हवे.

बुधवार, ३ जून, २०१५

महातहान

बहुतेक हिंदी मराठी वाहिन्यांवर काल वटसावित्री होती. फेसबुकसुद्धा त्यात सामील होते. खूप गमती जमती पाहायला ऐकायला मिळाल्या. आज काळ बदलला आहे. त्याला धरूनच त्या होत्या. त्याला हरकत पण नाही. त्याच भावनेने त्यांचा आनंद घ्यायला सुद्धा कां कू करण्याची गरज नाही. `बाभळी अमावास्या', `रिन्युवल करार' वगैरे छान होते. गमती जमती करण्यात पुरुष होते तशाच बायाही होत्या. पारंपरिक रूढी आणि भावना जपणारे आणि शुभेच्छा देणारेही प्रकार होते. पर्यावरण हा तर `हॉट केक'. त्यामुळे तो होताच. वृक्ष लावा, वटवृक्ष लावा, त्याचे महत्व, शास्त्रीय कारणे; असे सगळे होते. मृत्युशय्येवर पडलेल्या बायकोसाठी वडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालणारा पुरुष पण होता. सगळेच आपापल्या ठिकाणी योग्य होते. मात्र दोन गोष्टी हरवल्यासारख्या वाटल्या आणि त्या मुळापर्यंत घेऊन जाणाऱ्या आहेत. एक म्हणजे- आपल्याला प्रतीत होणाऱ्या सत्यासाठी जीवनाची बाजी लावण्याची सावित्रीची श्रेष्ठता. दुसरे म्हणजे- सत्यवान सावित्री रूपक कथेचा अन्वयार्थ.

वरच्या आवरणात रमणे आणि त्यातच आशय शोधणे ही मानवी मनाची प्रकृतीच आहे. त्यामुळे एखादी कथा ऐकल्यावर त्यातील पात्र, प्रसंग, परिस्थिती यात आपण गुंतून जातो. गाभ्यापर्यंत जाण्याची तसदी घेत नाही. `सत्यवान-सावित्री'च्या महाभारतातील आख्यानाचे सुद्धा असेच होते. या आख्यानाचा उपयोग करून कोणी तरी कधीतरी एक सामाजिक उपक्रम म्हणून वटसावित्री व्रत सुरु केले असावे. असे सामाजिक उपक्रम, त्यांना आलेले व्रताचे स्वरूप, त्यांच्या झालेल्या रूढी; या सगळ्याला वेगळी समाजशास्त्रीय बैठक असते. त्यांचा फार मोठा उपयोग पण असतो. परंतु प्रदीर्घ काळानंतर त्याचे वरचे आवरण तेवढे उरते. अन हळूहळू तेही गळून पडू लागते. आज या प्रथेचे तसेच होत असल्याचे दिसते. याचा अर्थ जे होते वा आहे ते सारेच निरर्थक, थट्टेवारी नेण्यासारखे आहे असे नाही. मुळात थट्टा करताना आणि आवरण गळून पडताना त्याचा गाभा काय आहे, आशय काय आहे याकडे लक्ष दिले तर त्याचा उपयोग करता येऊ शकतो. आवश्यकता वाटल्यास त्या आशयाभोवती नवीन आवरण उभे करता येऊ शकते.

`सत्यवान-सावित्री' कथेचा व्यावहारिक आशय आहे पतीसाठी प्राणांची बाजी लावण्याचे धैर्य आणि निग्रह. या ठिकाणी तर पती सुद्धा लाक्षणिक आहे. पती म्हणजे कोण तर ज्याच्याशी आयुष्याची गाठ बांधली आहे तो. ही गाठ सुद्धा समजून घ्यायला हवी. आपण व्यवहारात सुद्धा बोलतो की, `नोकरी किंवा व्यवसाय हीच एखाद्याची पहिली बायको आहे' किंवा `नोकरी, व्यवसाय एखादीची सवत आहे' वगैरे. याचा अर्थच लग्नगाठ म्हणजे commitment. ही commitment महत्वाची. अशी commitment तेव्हाच असू शकते ज्यावेळी एखाद्याला वा एखादीला कुठेतरी सत्याची प्रतीती येते. त्यातून विश्वास, प्रेम इत्यादी निर्माण होते. ती व्यक्ती, ती वस्तू, तो विचार, ती संघटना, ते कार्य, ते व्रत म्हणजेच आयुष्य अशी धारणा जन्माला येते आणि मग त्या सत्यासाठी स्वत:च्या प्राणांची सुद्धा बाजी लावायला मागेपुढे पाहत नाही, ती सावित्री. आपल्या प्राणांची आहुती देऊनसुद्धा प्रतीत होणारं सत्य जपलं पाहिजे, जिवंत ठेवलं पाहिजे यासाठी लढणारी, ती सावित्री. `हाच पती लाभो, त्याच्याकडे गाडीघोडा, नोकरचाकर, बंगला, पैसाअडका अमाप राहो. अन त्याचा भोग आम्हाला मिळो' हे सावित्रीचं विडंबन आहे एवढच म्हणता येईल. प्रसिद्ध मराठी कवी म. म. देशपांडे आपल्या `तहान' या कवितेत म्हणतात- `सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण'. आम्हाला अशी सत्याची, न्यायाची, नीतीची, प्रेमाची `महातहान' लागते का? ही `महातहान' लागते तेव्हा सावित्री, राधा, मीरा, बाजीप्रभू, तानाजी, सावरकर, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, सौरव कालिया असे जन्माला येतात. म्हणून `सावित्री' हे व्रत आहे सत्याच्या शोधाचं, सत्याशी बांधिलकीचं. सत्यवानाच्या माध्यमातून सत्याचा शोध, सत्याशी बांधिलकी हा त्याचा व्यावहारिक आशय आहे. खूप साधा असा पर्यावरणाचा विषय घेतला तरीही आमची त्या विषयाशी बांधिलकी आहे का?

या कथेचा एक आध्यात्मिक आशयही आहे. वटवृक्ष हे त्याचं प्रतीक आहे. वटवृक्ष अक्षय असतो. एका पारंबीतून दुसरी शाखा. आमचं अस्तित्वही असंच आहे. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं. त्याला अंत नाही आणि आदीही नाही. अस्तित्व नव्हतं अशी वेळ कधीच नव्हती आणि अस्तित्व नसेल अशीही वेळ कधीच राहणार नाही. हां, अस्तित्वाचं रुप सतत बदलत राहील, पण अस्तित्वहीनता अशक्य आहे. आम्ही `अक्षय' आहोत. आम्हाला क्षय नाही. जन्म मृत्यू ही वरवरची लक्षणं आहेत, याविषयी आश्वस्त करणारी ही रूपक कथा आहे. व्यावहारिक आकलनाच्या कक्षेतील म्हणून वटवृक्षाचे उदाहरण आहे. ही अक्षयता प्राप्त होण्यासाठी सत्याच्या मार्गावर चालावे लागते आणि या मार्गावर चालताना पंचप्राणही पणाला लावण्याची तयारी ठेवावी लागते. `सत्यवान-सावित्रीच्या' आख्यानाचं मला प्रतीत झालेलं हे सत्य आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ३ जून २०१५

रविवार, ३१ मे, २०१५

झाडे आख्यान

- खूप झाडे लावली पाहिजेत.
- झाडे लावा झाडे.
- ही जागा रिकामीच आहे ना, इथे झाड लावून टाका.
- रिकाम्या जागा झाडांनी भरा.
- काय तुम्ही झाडांचे शत्रू...
- किती रखरखीत आहे इथे, झाडे का लावत नाही.
- झाडांशिवाय जगणं हे पाप आहे.
- जितकी माणसे तितकी झाडे.
- घराचं सौंदर्य महत्वाचं आहे, पण झाडे त्याहून जास्त महत्वाची आहेत.
- झाडांशी शत्रुत्व करून इमारतींचं सौंदर्य वाढवलं तर, आपलं आणि जगाचं सौंदर्य कोमेजून जाईल.
- झाडांसाठी एखाद्याशी भांडण करायलाही हरकत नाही.
- सगळ्यांशी गोड बोलावेच, पण झाडांच्या शत्रूंशी तिखट आणि कडू बोलायला हरकत नाही.
- आपसात खूप काही निरर्थक बोलण्यापेक्षा थोडे झाडांशीही बोलावे.
- आपला स्वार्थ म्हणून तरी झाडे लावा, जगवा, वाढवा, जोपासा.
- झाडांशी शत्रुत्व म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे.
- झाडांचे महत्व न कळणाऱ्याला स्वार्थसुद्धा कळत नाही, असेच म्हणावे लागेल.

ही आणि यासारखी वाक्ये आपल्या रोजच्या बोलण्यात, व्यवहारात यायला हवीत. त्यातून एक सकारात्मक वातावरण नक्कीच तयार होईल. अन्य टिवल्या बावल्या फक्त १% कमी करून तो वेळ, ती उर्जा, तो उत्साह, ती सक्रियता झाडे (वृक्ष या अर्थाने. बाल्कनीत एखाद्या छोट्याशा कुंडीत लावलेलं दुर्लक्षित तुळशीचं रोपटं या अर्थाने नव्हे.) या विषयाकडे लावली तरी परिस्थितीत खूप फरक पडेल. सुरुवातीला कंटाळवाणं वाटू शकेल. पण हा सगळा सवयीचा भाग असतो. चित्रपट आणि क्रिकेट सारख्या कंटाळवाण्या गोष्टी आपण आवडीने चघळतोच ना !!!

शांघाय शहराची चर्चा आपल्या येथे जुनी आहे. पंतप्रधान मोदी तेथे गेल्याने तिला पुन्हा उजाळा मिळाला. तेथील वर्णनात्मक माहितीपट पाहताना जाणवला तो तेथील झाडांचा अभाव. आम्हाला अशी शहरे नको, असे मोदींना सांगण्याची ताकद सुद्धा आपण ठेवली पाहिजे. मोदींमुळे स्वच्छता या विषयालाही चांगले दिवस आले आहेत आणि ते चांगलेच आहे. पण स्वच्छता ही निसर्ग, झाडे, माती, पशू पक्षी यांच्याशी विरोधी स्वरुपात पाहिली व आचरली जाऊ नये.

झाडांचे प्रेम आम्हालाही आहे, पण त्यासाठी जंगले वाढवा. झाडांची ब्याद शहरात, घरांजवळ आणि आपल्या रोजच्या जगण्यात नको; ही भूमिकाही टाकून द्यायला हवी. झाडांची, निसर्गाची, मातीची, पशू पक्ष्यांची जवळीक वाढली तर माणसातली पशू वृत्ती, स्वार्थी वृत्ती हळूहळू आपोआप कमी होते हेही लक्षात ठेवायला हवे. प्रदूषण दूर करण्यासोबतच माणसाला माणूसपण मिळवून देण्यात निसर्गाचा वाटा असतो. त्याकडे डोळेझाक नको.

अनोखे कोकणची सोनल

आज अचानक आठवली सोनल. `अनोखे कोकण'मधील सोनल. `अनोखे कोकण' हे एक प्रदर्शन आहे गणपती पुळेचं. गणपती पुळे या कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रसिद्ध ठिकाणी असलेलं. जुन्या कोकणातील गाव कसा होता. त्याचे व्यवहार कसे चालत वगैरे या ठिकाणी शिल्पांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रदर्शन पाहायला गेलो तेव्हा ते दाखवण्यासाठी आणि समजवण्यासाठी जी मुलगी माझ्यासोबत मार्गदर्शक म्हणून होती ती सोनल. अशा आजूबाजूच्या खेड्यातील काही मुली तिथे काम करतात. त्यांना तयारही छान केले आहे. त्या सारे समजावून सांगतात. हे `अनोखे कोकण' दाखवताना आम्ही एका शिल्पासमोर उभे राहिलो. सोनल सांगू लागली- `हा कासार. हा मुलींना, बायांना बांगड्या भरून देतो. लहान मुलींना बांगड्या भरून देण्याचे तो पैसे घेत नाही. दहाव्या बाराव्या वर्षी मुलीचे लग्न होत असे. तेव्हाही हा बांगड्या भरून देत असे. तेव्हा त्याला मुलीचे वडील एक सोन्याचा तुकडा देत असत. तो त्याला पुरे. दुसऱ्या एखाद्या मुलीचं लग्न होईल तेव्हा पुन्हा दुसरा सोन्याचा तुकडा. एक प्रकारे आजच्या भाषेत सांगायचं तर, तो दहा वर्षांचं क्रेडीट देत असे.' त्या शिडशिडीत बांध्याच्या काळ्यासावळ्या कोकणी खेड्यातील सोनलच्या तोंडून क्रेडीट शब्द आला तेव्हा छान वाटलं. तिला त्याचा अर्थ फार समजत असावा किंवा नसावा. ती शिकवल्याप्रमाणे सांगत होती. पण नकळत माझ्यासारख्या शहरी माणसाला आपल्या समाज जीवनात मुरलेल्या विश्वास आणि मानवतेचं दर्शन मात्र त्यामुळे घडलं होतं. आजच्या अर्थकारणात लोप पावलेल्या आणि पारंपरिक अर्थकारणाचा जणू आधारच असलेल्या विश्वास आणि मानवता, या दोहोंची रुजवणूक पुन्हा कशी होऊ शकेल? सगळ्यांनी विचार करावा असाच प्रश्न आहे, नाही का?

ओवैसीच्या युक्तिवादाच्या निमित्ताने

गोहत्या बंदीला विरोध करताना खा. असदुद्दिन ओवैसी अनेक मुद्दे मांडत होते. त्यातला एक मुद्दा होता- आमच्या खाण्याच्या सवयी आणि आवडीनिवडी आम्ही का बदलाव्यात? वरवर बिनतोड वाटणारा हा बुद्धिवादी युक्तिवाद तद्दन तकलादू आहे. खाण्यापिण्याच्याच नव्हे तर अनेक सवयी, आवडीनिवडी जगभरातील मनुष्यप्राणी सतत बदलत आला आहे. गायीचेच कशाला नरमांसभक्षण करणारेही अनेक जण पूर्वी होते. आजही थोडेच का होईना आहेत. ती सवय माणसाने बदललीच ना? पूर्वीचा मानव मृगयाजीवी होता. आज अनेक देशांमध्ये अनेक गोष्टींच्या शिकारीवर बंदी आहे. मृगयाजीवीतून उत्क्रांत होत आजचा मानव आकाराला आला आहे. चोरी हाच पिढीजात व्यवसाय असलेले लोक होते. म्हणून चोरीचे समर्थन करून ती अधिकृत व्यवसायाच्या यादीत टाकायची का? पूर्वी माणूस कपडे घालत नव्हता, आताही तसेच करावे का? खाणे, पिणे, राहणे, वागणे, बोलणे, चालणे, अशा अनेक सवयी आणि आवडीनिवडी सतत बदलत असतात. गरजा, उपलब्धता, संवेदनशीलता, आदर, प्रेम, सहअस्तित्वाची गरज, जाणिवांचा स्तर उंचावणे अशा अनेक कारणांनी हे होत असते. असे बदल करण्यास हट्टाने नकार देणे हीच कट्टरवादाची सुरुवात असते. आज संपूर्ण जगात मुसलमानांची किंवा इस्लाम मानणाऱ्या लोकांची जी प्रतिमा तयार झाली आहे, त्यामागे इष्ट बदल न करण्याची त्यांची वृत्तीच कारणीभूत आहे. खा. ओवैसी त्यांचेच प्रतिनिधित्व करतात असे म्हणावे लागेल. अन प्रसार माध्यमे अशा वृत्तीला जाणीवपूर्वक किंवा अजाणता खतपाणी घालत असतात असाही निष्कर्ष काढावा लागेल. अन्यथा, शेकडो गायींच्या गोशाळा चालवणाऱ्या मुसलमानांच्या मुलाखती प्रसार माध्यमांनी दाखवल्या नसत्या का? मुलाखती जाऊ द्या, त्यांच्या कामाची माहिती एक बातमी म्हणून तरी कधी या प्रसार माध्यमांनी दाखवली आहे का? गोंधळ माजवून बुद्धिभ्रम उत्पन्न करण्याच्या सध्याच्या शर्यतीत तारतम्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी सामान्य माणसाचीच अधिक आहे.

रविवार, २४ मे, २०१५

थोडे लक्ष इकडेही...

सध्या उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिरे, छंद वर्ग वगैरे बरेच सुरु आहेत. अनेक गोष्टी मुलामुलींना तिथे शिकवल्या जातात. पण असं लक्षात येतं की, खूप छोट्या छोट्या गोष्टी; आवश्यक असून आणि आयुष्यभरासाठी असूनही दुर्लक्षित राहतात.
१) चपला, जोडे नीट रांगेत ठेवणे. पादत्राणे दारापुढे काढू नये. पादत्राणे घालून घरात जाऊ नये. काही कामांच्या ठिकाणीही पादत्राणे आत नेता येत नाहीत. तिथे सरळ, जोडीने आणि रांगेत ती ठेवावी. कशीही टाकू वा फेकू नयेत.
२) सायकली किंवा अन्य वाहने नीट उभी करणे. वाहने दारापुढे उभी करू नयेत, अंतर ठेवून उभी करावीत, एका वाहनामागे लागून दुसरे वाहन उभे करू नये. आपल्याला वा दुसऱ्याला काढता येईल अशी वाहने उभी करावी.
३) रुमाल, पेन, मोबाईल, पाकीट, किल्ल्या योग्य पद्धतीने जागच्या जागी ठेवावे.
४) कपड्यांच्या घड्या कशा घालाव्या. कपडे बोळे किंवा गोळे करून टाकू नये.
५) पायपुसणी कशी ठेवावी.
६) रिमोट, चार्जर इत्यादी वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात.
७) तेलाच्या बाटल्या, पावडरीचे डब्बे बंद करून ठेवावे. कंगवा साफ करून जागच्या जागी ठेवावा.
८) हातपुसणी (नॅपकिन्स) कोंबून किंवा गोळा करून न ठेवता मोकळे ठेवावे.
९) चादरी कशा आंथराव्या, खोळा कशा घालाव्या, पांघरुणांच्या घड्या कशा कराव्या.
१०) पाणी कसे भरावे. बादल्या भरताना किंवा नळाखाली लावताना काय काळजी घ्यावी.
११) भांड्यांवर झाकण्या कशा ठेवाव्या.
१२) केर काढणे, जाळी जळमट साफ करणे, केर भरणे.
१३) संडास, बाथरूमची स्वच्छता. संडास, बाथरूम वापरल्यानंतर स्वच्छ आणि नेटके करून बाहेर येणे.
१४) झाडांना पाणी टाकणे.
१५) गाण्यांचा वा टीव्हीचा आवाज मर्यादित ठेवणे.
१६) कचरा जागच्या जागी टाकणे.
१७) दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्याची चूक सुधारून घेणे किंवा देणे, स्वत:च्या हातापायाने काम करणे- यात काहीही वाईट, कमीपणाचे, अपमानजनक नाही हे समजावणे.
१८) धुतलेले कपडे नीट पिळून, झटकून, टोकाला टोक जुळवून वाळत घालणे.
१९) स्वयंपाक वा जेवणानंतर भांडी स्वच्छ करून, एकात एक घालून, त्यात पाणी घालून आटोपशीर पद्धतीने ठेवणे.
२०) पाण्याच्या बादल्या, टब, मग्गे अस्ताव्यस्त न ठेवणे.
२१) वर्तमानपत्र नियमित वाचणे आणि जुने वर्तमानपत्र पतंगीसारखे न उडवता, व्यवस्थित घडी घालून गठ्ठा करून ठेवणे.

यादी आणखीनही वाढू शकेल. पण या गोष्टी सांगणे, करवून घेणे, अंगी मुराव्या म्हणून त्याचा वारंवार सराव करून घेणे; या गोष्टी आढळत नाहीत. यामुळे चांगल्या सवयी, व्यवस्थितपणा तर निर्माण होईलच; पण सौंदर्यदृष्टी (ज्याचा प्रचंड अभाव जाणवतो) निर्माण होऊन जन्मभर या गोष्टींचा उपयोग होईल. घरात किंवा घराबाहेर होणारे अनेक संघर्ष सुद्धा कमी होऊ शकतील.

सोमवार, १८ मे, २०१५

ही लढाई बरी नव्हे...

एकदा युधिष्ठिराला विचारण्यात आले- `जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते?' त्यावर युधिष्ठीर म्हणाले- `माणूस रोज स्वत:च्या डोळ्यांनी मरण पाहतो आणि तरीही स्मशानातून बाहेर पडताना असा बाहेर पडतो की, आपण अमर आहोत. जगातील हे सगळ्यात मोठे आश्चर्य आहे.' युधीष्ठिरांच्या या उत्तरावर दुमत होण्याचे कारण नाही. उलट सगळ्यांना पटेल असेच ते उत्तर आहे. पुढच्या क्षणी काय होणार हे सांगता येत नाही, सगळ्या गोष्टींची अखेर मृत्यू आहे हेही ठरलेले आहे आणि तरीही माणूस असा वागत असतो की, तो जणूकाही अमरपट्टा घेऊन आलेला आहे.

अरुणा शानभाग या अभागी महिलेचा आज मृत्यू झाला. त्यासंबंधीचे वृत्त पाहताना युधीष्ठिराच्या या उत्तराची प्रकर्षाने आठवण झाली. खरे तर गेली ४२ वर्षे त्या मृत्यूची याचना करीत होत्या, कधी यमाकडे तर कधी तुमच्या आमच्या जगाकडे. आज अखेर तो दिवस उजाडला. `मी अरुणा' नाटकात अरुणा शानभाग यांची भूमिका करणाऱ्या चिन्मयी सुभाष यांची प्रतिक्रियाही ऐकली. त्यांनी नाटकाविषयी, अरुणा शानभाग यांच्याविषयी सांगितले. आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या- `आम्ही त्यांचा मोठा वाढदिवस साजरा केला होता. अर्थात त्यांना काहीच जाणीव नव्हती. ते सारे आपल्यासाठीच होते.' फार मोठा अर्थ या दोन वाक्यात आहे. खरंच जीवन म्हणजे काय? जगणे म्हणजे काय? पाच सहा फुटाचा देह, त्याचे अवयव, चालणारा श्वास की मेंदूची प्रतिक्रियाशक्ती? मेंदूची ही प्रतिक्रिया कितीही क्षीण असली किंवा समजण्याच्या पलीकडची असली किंवा अनाकलनीय असली, तरीही त्याला जीवन वा जगणे म्हणायचे? कशाला म्हणायचे जगणे? आम्हाला तो देह पाहिला की बरे वाटते म्हणून तो टिकवायचा? त्या देहातील जे कोणी आहे त्याला बरे वाटते वा नाही याचा विचार न करताच? धडधाकट शरीराच्या व्यक्तीला शरीर सोडावेसे न वाटणे स्वाभाविक असते. तसेच ते `गलितगात्र' या शब्दाच्याही पलीकडे गेलेल्याला वाटत असेल? अगदी सर्वोच्च न्यायालयानेही दयामरणाची याचिका फेटाळून लावली होती. त्यांची सेवा करणाऱ्या नर्सेसनी त्यावेळी पेढे वाटून आनंदही साजरा केला होता. पण खरेच `आपले वाटणे' यापलीकडे अशा गोष्टींना अर्थ असतो? मानवी जगण्याचा तराजू अशावेळी अकारण भावनांच्या बाजूने थोडा अधिक झुकतो का?

त्यांच्या अंत्यसंस्कारावरून झालेला वादही असाच दुर्दैवी. नाते आणि परंपरा यांचे कारण सांगून त्यांच्या अंत्यसंस्काराचा हक्क मागणे अयोग्यच आहे, पण आम्ही त्यांची सेवा केली म्हणून आम्हाला तो हक्क आहे हे म्हणणेही योग्य नाही वाटत. मुळात अंत्यसंस्कार करणे ही हक्काची बाब कशी असू शकते? आपण किती छोट्या छोट्या गोष्टीत अडकतो? अन युधिष्ठिराचे उत्तर आठवते. जिथे या सगळ्या जगालाच तात्पुरते अस्तित्व आहे तिथे अंत्यसंस्काराचा हक्क मागणे कसेतरीच वाटते नाही का? नर्सेसनी सुद्धा शव नातेवाईकांना देऊन टाकले असते तरी त्यांनी केलेली सेवा, त्यांचे समर्पण, त्यांची बांधिलकी कोणीही नाकारली नसती. नातेवाईकांचा तर प्रश्नच नाही. सहानुभूती पदरात पडून घेण्याचाच त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु खरा प्रश्न- कोण खरे, कोण खोटे वगैरे नाहीच. प्रश्न आहे- अधिकार वगैरेचा विचारच मुळात चुकीचा आहे हा. त्यातही माणूस गेल्यानंतर तर अशी अधिकारांची लढाई केविलवाणीच ठरते.

अर्थात हे काही नवीन नाही. अगदी सामान्य माणसांच्या सामान्य कुटुंबातही असे वाद होतात. कोणी अंत्यसंस्कार करायचे यावरून. संतांच्या शिष्यांमध्येही असे वाद झालेले आहेत आणि त्यापायी अंत्यसंस्कार दोन दोन तीन तीन दिवस रखडलेले आहेत. अलीकडच्या काळात गाजलेला वाद म्हणजे कवी ग्रेस यांचा. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी असाच वाद झाला होता आणि सुमारे दोन तास अंत्यसंस्कार खोळंबला होता. जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते, या प्रश्नावरील युधिष्ठिराचे उत्तर किती सार्वलौकिक होते याचाच प्रत्यय अशा वेळी येतो.

जीवन आणि मृत्यू यांचाही विचार अशा वेळी मनात येतोच. भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना जगण्याचा मुलभूत अधिकार दिलेला आहे असे म्हटले जाते. कधीकधी गंमत वाटते याची. राज्यघटना अस्तित्वात नव्हती तेव्हा तो अधिकार नव्हता का? हा अधिकार असा देता वगैरे येतो का? देता येतच असेल तर जन्माला घालणारा सोडून कोण तो देऊ किवा काढून घेऊ शकतो? मुळात जन्म म्हणजे काय? जगणे म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? दोघांचा काय संबंध? मृत्यू म्हणजे पूर्णविराम का? मृत्यू म्हणजे अस्तित्वहीन होणे का? भगवद्गीता तर म्हणते की- मृत्यू म्हणजे केवळ वस्त्र बदलणे. जीर्ण झालेले कायारूपी वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करणे. भारतीय चिंतन तर मृत्यू मानतच नाही. आम्ही अमृताचे पुत्र आहोत, अमर आहोत, आम्हाला मरण नाहीच असे ते म्हणते. जन्म अथवा मृत्यू याचा अर्थच आम्हाला कळलेला नसताना, त्यांच्या अधिकारांची वगैरे लढाई बरी वाटत नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १८ मे २०१५

सोमवार, ११ मे, २०१५

भुलभुलय्यात कुठवर फिरायचे?

वा वा... आधी सलमान, आता जयललिता. काहीच महिन्यांपूर्वी खुर्ची सोडावी लागलेल्या अम्मा चार आठ दिवसात पुन्हा मुख्यमंत्री होणार. आनंद आहे. कशाकशाचं कौतुक करायचं आम्ही? न्यायव्यवस्थेचं, लोकशाहीचं, प्रसार माध्यमांचं, पोलिसांचं, तपास यंत्रणांचं, नोकरशाहीचं, जनता जनार्दनाचं? घाबरू नका, थोड्याच दिवसात देशातील सगळे तुरुंग, पोलीस कोठड्या रिकाम्या होतील आणि देश पूर्णपणे गुन्हेमुक्त होईल. मग फक्त चालेल आरोग्यदायी स्पर्धा. कोण सत्तेवर येतो याची स्पर्धा, कोण भ्रष्टाचार अधिक करतो याची स्पर्धा, कोण किती गुंड पोसतो याची स्पर्धा, कोण किती मुडदे पाडतो याची स्पर्धा, कोण अमली पदार्थांची तस्करी वगैरे जास्त करतो त्याची स्पर्धा, कोण जास्तीत जास्त बेताल- बेमुर्वतखोर- उन्मत्तपणे- वागतो याची स्पर्धा. अन या स्पर्धेतून सर्वोत्तम तोच टिकेल आणि आबादी आबाद होईल. अर्थात ही स्पर्धा मान्य नसणारे उरणारच नाहीत, हे वेगळे सांगायला नकोच.

यातील प्रतिक्रियेचा भाग बाजूस काढून विचार केला तर लक्षात येते की- न्यायप्रक्रिया, व्यवस्था, फौजदारी व दंड संहिता, कायदे, नियम सगळंच आमूलाग्र बदलण्याची गरज आहे. त्याहीपेक्षा अधिक म्हणजे आपण स्वीकारलेली फार उदात्त वगैरे वाटणारी ब्रिटीश संसदीय व्यवस्था बदलण्याची गरज आहे. निवडणुका या सगळ्या वाईट गोष्टींची जननी आहे, हे प्रत्यक्ष राजकारणीही मान्य करतात. पण खरी जननी आहे आपली संसदीय व्यवस्था. मुळात लोकशाही याचा अर्थ फक्त आपल्या येथे असलेली संसदीय व्यवस्था एवढाच नाही. लोकशाहीच्या अन्यही व्यवस्था आहेत. मुख्य म्हणजे या व्यवस्थांमध्ये आणखीन भर टाकली जाऊ शकत नाही असेही नाही. पण त्यासाठी प्रथम प्रामाणिक मन, प्रामाणिक भावना आणि प्रामाणिक विचारांची गरज आहे. कायदे,

संसदीय व्यवस्था, एवढेच नव्हे तर ज्याचे अतिशय फाजील कौतुक केले जाते ते `फेडरल स्ट्रक्चर' सुद्धा बदलण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन घटना समिती बसवायला हवी. पण असा विचार जरी व्यक्त केला तरी केवढा आणि किती वेगवेगळा आकांत केला जाईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या उथळपणाला काहीही उपाय नाही. या जगातील सगळी क्षमता आणि बुद्धिमत्ता संपून गेलेली आहे असेच मानायचे असेल तर त्याला काय करणार? आज स्पष्ट, सत्य बोलण्याची सुद्धा कोणाची इच्छा आणि तयारी नाही. हे परिवर्तन घडवून आणणे तर दूरची गोष्ट राहिली. भुलभुलय्यात फिरण्यातच सार्थकता मानणाऱ्यांची कमी नाहीच ना?

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

पाप आणि गुन्हा

पाप आणि गुन्हा या दोन्ही कल्पनात व्यक्तीची चूक ही मूळ गोष्ट आहे. खरं तर प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तसंच जगत, वागत असते. परिस्थितीच्या दबावामुळे त्यात बदल होतो वा करावा लागतो. परिस्थितीचा दबाव कधी जोरजबरदस्तीचा मामला असतो, तर कधी राजीखुशीचा. त्यानुसार त्याला वेगवेगळी नावेही दिली जातात. जोरजबरदस्तीचा भाग असेल तर त्याला; तडजोड, किंमत चुकवणे, अपरिहार्यता यासारखे रंग लाभतात. राजीखुशीचा मामला असेल तर त्याला प्रेम, त्याग, सेवा असे रंग लाभतात. पण मुळात परिस्थितीचा हा दबाव आपण स्वीकारतोच का? त्याचे साधे, सरळ उत्तर आहे जगण्यासाठी. आजुबाजूला माणसे, निसर्ग, वातावरण काहीही नाही आणि जगतोय ही कल्पनाही करणे शक्य नाही आणि तसे जगणेही शक्य नाही. असे जगताना स्वाभाविकच काही मर्यादा येतात आणि त्यातून सर्वसाधारण शहाणपणातून काही नियमांचा जन्म होतो. सुरळीत (सुखी, समाधानी किंवा सार्थक वगैरे नाही) जगण्यासाठी हे नियम पाळण्याला सगळे मान्य करतात. हे नियम न पाळणे म्हणजे चूक. चूक या गोष्टीला त्याहून फार अर्थ नाही. तसे पाहिले तर चूक नावाची काही गोष्टच नाही. नियम न पाळणे हाच त्याचा अर्थ. आणि चूक केली की दिली जाते ती सजा. सजा देण्यासाठी चूक सिद्ध करावी लागते. त्यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात गुन्हा आणि धार्मिक नीतीच्या भाषेत म्हणतात पाप. परंतु या दोनमध्ये बाकी काही फरक नसला तरीही एक सूक्ष्म भेद आहे आणि तो सूक्ष्म असला तरीही तसा मोठा आणि महत्वाचा आहे. जेव्हा एखाद्या चुकीकडे गुन्हा म्हणून पाहिले जाते तेव्हा त्याचा निर्णय चूक करणारी व्यक्ती सोडून बाकीचे करतात. काय शिक्षा द्यायची तेदेखील अन्य लोक ठरवतात. अन शिक्षा भोगून संपली की त्या चुकीतून सुटका होते. मात्र, एखाद्या चुकीकडे पाप म्हणून पाहिले की, त्याचा अंतिम निर्णय चूक करणाऱ्याच्या मनातून व्हावा लागतो. त्यासाठी प्रायश्चित्त त्याच्याच मनाने घ्यावे लागते. प्रायश्चित्त घेऊनही सुटका नसते, तर उपरती होऊन पुन्हा चूक होऊ नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे पाप कल्पनेत संबंधिताच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन असते. त्यातून व्यक्तीच्या आंतरिक विकासाच्या शक्यता विस्तारतात. गुन्हा म्हटल्यावर सदसद्विवेकबुद्धीला आवाहन असलेच पाहिजे असे नाही. त्यामुळेच आंतरिक विकासाच्या शक्यताही धूसर होतात. सामुहिक जीवनातील चूक आणि त्याला सजा एवढेच त्याचे स्वरूप असते. आज पाप ही कल्पना सोडून दिल्यासारखी दिसते. त्यामुळे penance, प्रायश्चित्त (चित्त महत्वाचे), तपस्या या गोष्टी कालबाह्य ठरत आहेत. म्हणूनच आंतरिक विकासाचा अभाव जाणवतो. या आंतरिक विकासासाठी जगात जे काही प्रयत्न आजवर झालेत त्यातील `पाप-पुण्य' संकल्पना हाही एक महत्वाचा प्रयत्न आहे. कायदा सुव्यवस्था आणि कायद्याचे राज्य यांच्यासाठी `गुन्हा' ही बाब योग्य असली तरीही, त्याला `पाप-पुण्य' याचीही जोड देता येईल का? या दोन्ही कल्पनांचा समन्वय अधिक पूर्णतेकडे नेईल का? विचार व्हायला काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २४ एप्रिल २०१५

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

`सत्वा'वर लक्ष केंद्रित असणारे हनुमंत

आज हनुमान जयंती. मनापेक्षाही वेगवान, इंद्रियांवर ताबा असलेला, बुद्धिमतां वरिष्ठम, वायूचा आत्मज, वानर युवकांचा प्रमुख, श्रीरामदूत; अशा हनुमंताला नमस्कार असो. भारतीय परंपरेतील आदर्श व्यक्तिरेखेतील एक !! आज या महावीराला प्रणाम करताना मनात येतो आहे, त्याने केलेला लंकादहनाचा पराक्रम. सीता हे मानवी सत्वाचं व्यक्तीरूप आहे. तिला डांबून ठेवणारा रावण ब्रम्हज्ञ, बलसंपन्न, कुबेराला लाजवेल अशा संपन्नतेचा स्वामी आहे. मारुतीरायाचं लक्ष मात्र फक्त आणि फक्त `सत्वा'वर, सीतेवर, सात्विकतेवर आहे. त्याला तिची सुटका करायची आहे. अन `सत्व'विरोधकांना कापरं भरवायचं आहे. शारीरिक बळ, बौद्धिक बळ, आर्थिक बळ या कशापुढेही झुकायला ते तयार नाहीत. त्यांची शेपटी वाढतच वाढत जाते. कुठलीच गोष्ट त्यांना घाबरवू शकत नाही अन दीपवूही शकत नाही. सत्वावर लक्ष केंद्रित असणारा, कशानेही प्रभावित न होणारा, शक्ती-बुद्धी-युक्तीने परिपूर्ण महारुद्र हाच आज आदर्श व्हायला हवा.

हे म्हणत असताना आपली दृष्टी जगभर फिरते पण आपल्यावर जात नाही. हे टाळता यायला हवे. गजांत लक्ष्मीचा मोह न धरता लंका उद्ध्वस्त करण्याची प्रेरणा आणि हिंमत आमच्यात किती आहे. झुप्कन येणाऱ्या मोटारीतून उतरणाऱ्या स्त्री वा पुरुषाचा आमच्यावर विपरीत प्रभाव नसतो? अशा व्यक्तीपुढे तोंड उघडायला तरी आपण तयार असतो? पहिल्या पगाराचा आनंद साजरा करण्यासाठी मळलेली शाल पांघरून जाणाऱ्या आई-लेकीला अडवणाऱ्या, गरीब मुलाला हॉटेलच्या आतही आणण्यास मज्जाव करणाऱ्या किंवा महिन्याची कमाई नसणाऱ्या डॉक्टरला व्हिसा नाकारणाऱ्या पंचतारांकित संस्कृतीचा आमच्या मनावरील प्रभाव आणि पगडा हनुमंत भक्तीला शोभणारा म्हणावा काय? याच संस्कृतीत क्रिकेट आणि चित्रपट नायक, नायिकांचा समावेश करावा लागेल.

हनुमानाने लंकेची संपत्ती, महाल, हवेल्या यांची तर वाट लावलीच; पण तेथील जंगलही जाळून टाकले. स्वत: वनवासी असूनही जंगल खाक केले. कारण त्यात डांबलेल्या सत्वाची त्याला मुक्तता करायची होती. आज पूर्व- पश्चिम- उत्तर- दक्षिण- जंगलात डांबलेल्या सत्वाची सुटका करण्यासाठी बलभिमासारखे कठोर होण्याची गरज आहे. चहा कंपन्यांच्या मालकांपासून कामगारांपर्यंत कोणालाही पळवण्याच्या रूपाने असो, नक्षलवाद्यांच्या रूपाने असो, तस्करांच्या रूपाने असो, की जमीन माफियांच्या रूपाने असो; जंगलात कोंडलेल्या सत्वाच्या मुक्तीसाठी बजरंग पराक्रमाची गरज आहे.

रामराज्याची मूल्य, त्यांचे व्यावहारिक संदर्भ, संकल्पना या साऱ्याचं दर्शन घडवणारे हे व्यक्तित्व आहे. हनुमान चिरंजीव या अर्थाने आहेत. त्यांची शक्तीमत्ता, बुद्धिमत्ता, गुणवत्ता मनामनात जनाजनात जागो यासाठी प्रार्थना करूया.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ४ एप्रिल २०१५

अंधाराशी मैत्री

आताशा मला अंधार आवडू लागला आहे. किती छान असतो ना तो? त्याच्या लेखी सगळ्यांना सारखी वागणूक. कोणी लहान नाही, मोठा नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, विद्वान नाही, अज्ञानी नाही, चांगला नाही, वाईट नाही, सुंदर नाही, कुरूप नाही. सगळे सारखे. अंधारात थोडीशी निष्क्रियता असते. उजेडासारखी सक्रियता नसते. पण उजेडातल्यासारखे हेवेदावे, गळेकापूपणा, स्वार्थ हेदेखील नसतात. विचार करून पाहा- नेहमी केवळ अंधारच अंधार राहिला, काय होईल? काहीही होणार नाही. कधी कधी वाटतं, खरा तो अंधारच. त्याला दुसरा कसलाही आधार लागत नाही. स्वत:चं अस्तित्वही त्याला सिद्ध करावं लागत नाही. उजेडासाठी कसं सूर्याला उगवावं लागतं. दिवा लावावा लागतो. काही नाही तर, चकमक तरी घासावी लागते. त्याशिवाय उजेडाचं अस्तित्व नाही. अंधार मात्र स्वयंभू. काही असलं काय नि नसलं काय, अंधार मात्र असतोच. उजेडाला मर्यादाही असतेच. छोटी पणती असेल तर त्यातलं तेल संपेपर्यंतच उजेड. तोही दोन-चार मीटर परिसरातच. तेल संपल्यावर आणि दोन-चार मीटरच्या पलीकडे अंधारच. सूर्य असला तरीही, काही तासांनंतर पुन्हा अंधारच. सगळ्या प्रकारच्या उजेडाचा शेवटही अंधारच. सगळ्या प्रकारचे कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, मातृत्व, चांगलं- वाईट, प्रेम- द्वेष, साऱ्यासाऱ्याचा शेवट शून्य, अंधार. केवढा मानवाचा इतिहास? पण सगळा अंधारच. कोणी एक गोष्ट सिद्ध करतो, कोणी बरोब्बर ती खोडून काढतो. काय सत्य? भविष्याबद्दल तर सारेच अंधारात. आपण काही तरी करायचं. यश आलं तर म्हणायचं- भविष्य उज्वल असतं. अपयश आलं तर- अंधारच. अन यशाचा तरी शेवट अंधारच ना? आणि गंमत माहिताय? अंधारात सारं संपून जातं, मिटून जातं, शून्य होतं, पण आपलं अस्तित्व मात्र कायम असतं. आपलं `मी'पण संपत नाही. अंधार आणि मी यातलं हे साम्य आहे. त्यांचं अस्तित्व स्वयंभू असतं आणि अविनाशीही. म्हणूनच वाटतं, खरा मित्र अंधारच.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ३ एप्रिल २०१५

बुधवार, १ एप्रिल, २०१५

`मी नावडूही शकतो ना?'

आमच्या वस्तीत एक-दीड वर्ष एक कार्यक्रम चालला होता. दर रविवारी सकाळी कोणाच्या तरी घरी जमायचे. अर्थात ठरवून, कारण तशी सूचना द्यावी लागत असे ना. तिथे गप्पागोष्टी, वस्तीतील काही त्रास, समस्या वगैरे असतील तर त्या मांडायच्या. पण समस्या सोडवणे यासाठी काही ते जमणे नसे. सहज अनौपचारिक रीतीने जमायचे. गप्पाटप्पा करायच्या. चहा प्यायचा अन परत. परस्परात सहज, अनौपचारिक संबंध, ओळख वाढावी हा त्याचा उद्देश. चांगले चाळीसेक लोक येत असत. कोणी नियमित, कोणी अनियमित. खरं तर बैठक वगैरे अशी ती कल्पनाच नव्हती, अड्डा अशी ती कल्पना. सुरुवातीला उत्साह होता. मग संख्या रोडावू लागली. एक-दीड वर्ष चालून हळूहळू हा उपक्रम बंद पडला. यावर आज विचार मनात येतो तेव्हा लक्षात येते की, आपण तोंडाने काहीही म्हटले तरीही आपलं जगणं, वागणं, विचार करणं, औपचारिकच असतं आणि असावं लागतं. `सहज' या शब्दाचा आशय आणि अर्थच्छटा आपल्याला फारशा समजत नाहीत, रुचत नाहीत आणि पचतही नाहीत.

या उपक्रमातीलच एका अतिशय छोट्या गोष्टीचे उदाहरण घेता येईल. विषय होता- भ्रमणध्वनी क्रमांक. एकमेकांजवळ एकमेकांचे नंबर्स असावेत. निरोप देण्यापासून, शुभेच्छा देणे असो वा एखादी इमर्जन्सी... नंबर हवेत. मग त्यावर चर्चा. आपल्या सामाजिक वृत्ती आणि स्वभावाला धरूनच सगळे झाले. यादी करा, त्याच्या कॉपीज करा आणि वाटा... वगैरे. दोन-तीनदा नुसत्या चर्चा झाल्या. कारण करा म्हणणे ठीक, करायचे कोणी? अखेर मी असा प्रस्ताव ठेवला की, ही यादी करणे वगैरे बाजूला ठेवा. त्याची गरजही नाही. आपण दर रविवारी भेटतो. गप्पाटप्पा करता करता, चहा पिता पिता एकमेकांचे नंबर द्यायला घ्यायला काय लागतं. भ्रमणध्वनी हातातच असतो. सेव्ह करून घ्यायचे नंबर. किमान जे लोक कधीच आपसात बोलले नाहीत. ते या निमित्ताने बोलतील तरी. सांगणे न लगे की, माझी सूचना हवेत विरली.

भूतकाळात गेला की माणूस असा भटकतो. म्हणजे- काही वर्षांपूर्वीच्या या उपक्रमाची आठवण आली वेगळ्या कारणाने अन लिहू लागलो तर सांगत बसलो वेगळंच. तर सांगायची आहे वेगळी गंमत. झाले असे की, अशाच एका रविवारी सगळे जमले असताना एका उत्साही व्यक्तीने कल्पना ठेवली सहलीची. सहल म्हटले की उत्साह येणारच. पण असे अनेक उपक्रम अगदी लहानपणापासून केल्याने गाठीशी अनुभव साचलेला आहे. लोक उत्साहाने बोलतील पण मग प्रत्यक्षात जातील ४० पैकी चार. ३६ जणांचे काय होते ती वेगळी कथा. पण होते मात्र असेच. मग सहल झाल्यावर सुरु होते त्याचे कवित्व. आरोप-प्रत्यारोप वगैरे. यासाठी मी सूचना केली की, कल्पना तर फार छान आहे. मात्र प्रस्तावित सहल आपल्या या उपक्रमाचा भाग असू नये. त्याची तयारी वगैरे स्वतंत्रपणे करावी. ही सहल रविवारी सकाळी एकत्र येणाऱ्यांसाठी बंधनकारक वगैरे असू नये किंवा या उपक्रमाचा तो भाग असू नये. कारण प्रत्येकाचे वेगवेगळ्या कारणांनी सहलीला येणे जमेलच असे नाही. आर्थिक, कौटुंबिक, शारीरिक अशी कोणतीही कारणे असू शकतील. अगदी मानसिक कारणही असू शकेल. अन मी सहज बोलून गेलो- `एखाद्याला वाटू शकेल की बुवा, श्रीपादसोबत थोड्याशा गप्पागोष्टी, चहापाणी इथपर्यंत ठीक आहे. पण दिवसभर याच्यासोबत राहणे किती बोअर !!! किती कंटाळवाणे !!! प्रत्येकाला, प्रत्येक कंपनी, प्रत्येक ठिकाणी आवडेलच असे नाही ना? कोणाला मी नावडूही शकतोच की.' यावर बहुतेक सगळे खूप हसले. आपण कोणाला नावडू शकतो, हे असं सहज, सरळ सांगणं त्यांना गमतीचं वाटलं. त्यातही बऱ्यापैकी लोकप्रिय असलेल्या, ४० लोकांना दर रविवारी एकत्र आणण्याच्या पाठीशी असणाऱ्या एखाद्याने असं बोलणं त्यांनी अपेक्षितच केलं नसेल ना? त्यामुळे ते हसले.

मुद्दा असा की, आपण असा विचार करायला तयारच नसतो बहुतेक वेळा. स्वत:बद्दल असा तटस्थ अन त्रयस्थ विचार करण्याची सवय आणि संस्कार आपल्याला मिळतच नाहीत. त्यामुळे आपण स्वत:बद्दल अवास्तव कल्पना करू लागतो. माझं म्हणणं एखाद्याला पटत नाही हे कसं? मी एखाद्याला आवडत नाही हे कसं? मी चुकू शकतो हे कसं? मला एखादी गोष्ट जमत नाही हे कसं? या `जमत नाही'ची गंमत तर मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. एक परिचयातली व्यक्ती. एकदा कविता विषयावर चर्चा झाली. आता प्रत्येक जण काही कवी नसतो ना? त्याच्या मनाने घेतलं, आपल्याला कविता जमत नाही म्हणजे काय? अन लागले महाशय कविता करायला. अरारारारा... एक दोन नाही तब्बल दोनशे कविता केल्या पठ्ठ्याने. त्याही दीडेक वर्षात. अन मग त्याच्या परिचितांचे जे काही हाल झाले की विचारता सोय नाही.

अर्थात स्वत:बद्दल वास्तव विचार करणे याचा लंबक दुसऱ्या टोकाला जाऊन न्यूनगंड येऊ शकतो किंवा त्यातून आत्मविश्वासाचा अभाव, आत्मवंचना, आत्मपीडा, गोंधळलेपण, आपल्याला काहीच समजत नाही किंवा आपण कुचकामी आहोत, अशीही मानसिकता तयार होऊ शकते. स्वत:बद्दल योग्य, वास्तव, संतुलित विचार आवश्यक आहे हे मात्र खरं. ही कला आहे की शास्त्र? असा संतुलित विचार करणं शिकवता येतं का? की हळूहळू आयुष्यातूनच ते शिकायचं असतं?

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २ एप्रिल २०१५

आम्ही हे स्वीकारू?

तंबाखू उत्पादने हा अलीकडे पुन्हा चर्चेत आलेला विषय. त्या सवयीने असे होते, तसे होते, इतके मरतात वगैरे सुरु असते. काल कोणते तरी सर्वेक्षण आले की, सिगारेट पिण्याने कर्करोग होतो हे खोटे आहे. खरं खोटं काय असेल ते असो. पण कधी कधी मनात प्रश्न येतो या सगळ्याशी सरकारचा काय संबंध? जागृती, प्रचार-प्रसार, नुकसानभरपाई, कज्जेदलाली; यासारख्या गोष्टींवर सरकारे किती वेळ, पैसा, मनुष्यबळ, साधने वगैरे वाया घालवतात. हे सगळे थांबायला नको? समाजाची, प्रत्येक व्यक्तीची काही जबाबदारी असते की नाही? तंबाखू सारखे प्रश्न त्यांचे त्यांनी पाहून घ्यावेत. सरकारने सरळ सांगून टाकायला हवं की, याच्याशी आमचे देणेघेणे नाही. कोणी तंबाखू खाऊन किंवा ओढून मेला तर त्याची जबाबदारी त्याची वा संबंधितांची. सगळ्यांच्या सगळ्या सवयी, वागणे, बोलणे, चालणे, खाणे, पिणे; अन त्या साऱ्याचे परिणाम यांच्याशी सरकारचा काय संबंध? अशा अनेक गोष्टींची यादी करता येईल, नव्हे तशी ती करून सरकारने हे जाहीर करावे की, याच्याशी आमचा संबंध नाही. हेल्मेट हा असाच एक विषय. हेल्मेट नावाची एक वस्तू आहे. ज्याला वाटेल तो वापरेल, ज्याला नाही वापरावेसे वाटणार तो नाही वापरणार. मरेल तर मरेल. हां, सुव्यवस्थेसाठी गाड्यांचे वेग नियंत्रण, वाहने कुठल्या बाजूने चालवावी, कशी कुठे थांबवावी वगैरे गोष्टी ठरवाव्या आणि त्यात कोणी चुकला वा जाणूनबुजून कोणी त्यात हयगय केली तर नियमानुसार त्याला शासन करावे. पण हेल्मेटसक्ती सुव्यवस्थेत बसत नाही. पण सरकार इतके स्पष्ट ठेमेठोकपणे काम करील का? आणि सगळ्यात मुख्य म्हणजे बावळटपणा, बेजबाबदारपणा यात आघाडीवर असणारा आणि सतत कुणावर वा कशावर अवलंबून राहण्याची सवय असलेला समाज हे स्वीकारेल का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १ एप्रिल २०१५