बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

आय-भन घ्यावी कुठे?

या व्यवस्थेतील सगळ्यात मोठी त्रुटी कुठली असेल? एखाद्याची आई-बहिण घेण्याची जागा नसणे. रक्तदाबाचं मीटर फुटून जाईल इतका रक्तदाब वाढवणाऱ्या गोष्टी इतक्या घडतात की विचारता सोय नाही. आणि पुन्हा `समजून घ्यायचं' हा निर्लज्ज उपदेश किंवा `समजून घ्यावं' ही बेशरम अपेक्षा. मुख्य म्हणजे हा उपदेश वा ही अपेक्षा ज्याला त्रास होतो त्याच्याकडूनच. मुळात तिखट प्रतिक्रिया त्रास झाल्यावरच येते. त्यामुळे नेहमीच तिखट प्रतिक्रिया समजून घेण्याची भूमिका असायला हवी. पण असते उलटेच. मूळ क्रीयेबद्दल बोलण्यापेक्षा, चर्चा करण्यापेक्षा. त्यात सुधारणा करण्यापेक्षा प्रतिक्रिया कशी चुकीची यावरच सारा रोख. आणि म्हणे आम्ही सुधारलो, सभ्य झालो, आधुनिक झालो वगैरे.

या सगळ्याचं आजचं कारण. महानगरपालिकेचा घराचा कर. घराच्या कराचं जे देयक पाठवलं त्यावर कोणतीही तारीख नाही आणि नियम मात्र हा की देयकाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या आत कर भरणा व्हायला हवा. तसे न केल्यास दरमहा २ टक्के दंड आकारणी. आता तारीख न टाकण्यापासून तर बिलाच्या भाषेपर्यंत किमान दहा गोष्टी अशा आहेत की ज्यासाठी महापालिकेची आय-भन घ्यावी. त्यात कोणतंही पाप नाही आणि गुन्हाही नाही. पण तसं करायला जागा मात्र कुठेही नाही. अन अस्थानी एखादी कृती केली तर तो गुन्हा होतो ना?

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०१४

आवाहन

केंद्र सरकारने ८०० अश्लील वेबसाईटवर बंदी घालण्यात काहीही गैर नाही. हा अतिशय योग्य निर्णय आहे.

ज्याला ज्याला माझे हे मत मान्य आहे. त्याने कृपया लाईक करावे. प्रतिक्रियाही देऊ शकता. पण किमान लाईक करा. हा विषय आपला नाही, या व्यक्तीशी माझे मतभेद आहेत, याचे विचार माझ्यापेक्षा वेगळे आहेत, हा आगावू आहे, जास्त शहाणा आहे, याच्याशी माझी मैत्री नाही, हा माझे पोस्ट लाईक करीत नाही, हा माझ्यापेक्षा लहान आहे, हा माझ्यापेक्षा मोठा आहे, हा नागपूर- विदर्भाचा आहे, हा संघवाला आहे, मी स्त्री आहे, नाही लाईक केले तर काय होते, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, कोणी काहीही केले तरी आपण शांत राहावे हाच शहाणपणा असतो- हेच आध्यात्म असतं... इत्यादी इत्यादी... या किंवा अशा कोणत्याही पण-परंतुचा विचार न करता, ज्यांना सरकारचा निर्णय योग्य असल्याचे माझे मत पटत असेल त्यांनी लाईक केल्याशिवाय राहू नका.

याचे कारण हे आहे की, सरकारचा निर्णय चुकीचा असून या साईटस खुल्याच असल्या पाहिजेत, असे म्हणणारा आवाज इतका मोठा होतो आहे की, दुसरी बाजू आहे वा असू शकते याचा जणू विसरच पडला आहे. चांगल्या आणि योग्य गोष्टींचा आवाजही तेवढाच किंबहुना त्याहून अधिक मोठा असायला हवा. त्यासाठी सगळ्यांना लाईक करण्याची विनंती.

ज्यांना माझे मत मान्य नाही त्यांनी यावर कृपया काहीही प्रतिक्रिया देऊ नये. काही उलटसुलट प्रतिक्रिया दिली वा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर संबंधिताला त्याची जागा दाखवून देण्यात येईल.

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०१५ 

कुविचारांना विचार सिद्ध करणारे दिवटे

चॅनेल फिरवता फिरवता `मी मराठी' लागलं. त्यावर चर्चा सुरु होती म्हणून ऐकली अन खरंच हसावं की रडावं कळत नव्हतं. ती चर्चा घेणाऱ्या प्रतिनिधीचा युक्तिवाद होता- `लाखो लोक या साईटस पाहतात. त्यांच्या भावनांचा विचार करायचा की नाही?' म्हणजे विचार- अविचार- कुविचार यातला भेद त्याच्या गावीही नाही. कुविचारसुद्धा खपवून घ्यायचा? अन असे लोक समाजाची वकिली करणार? समाजाला बुद्धी अन अक्कल शिकवणार?

खरे तर हे एकच उदाहरण पुरेसे आहे बंदीचे समर्थन करायला. कसे? त्यासाठी थोडे विश्लेषण आवश्यक आहे. या प्रतिनिधीने हा असा प्रश्न का विचारला? कारण त्याची एकूण बौद्धिक क्षमता कमी आहे. अन जी आहे तीसुद्धा नीट पोसली गेलेली नाही. का झाले असे? कारण त्याच्या घरी, त्याच्या शिक्षणात, त्याच्या अवतीभवती तसे वातावरण नाही, विचार-विवेक यांची जोपासना, त्यांचा आग्रह नाही. प्रत्येक जण स्वतंत्र आहे, हीच त्याच्या अवतीभवतीची मान्यता. अन प्रत्येक जण परिपूर्ण आहे किंवा योग्य अयोग्य त्याचं तो ठरवेल असे वातावरण. त्यामुळे दुसरी बाजू, दुसरा विचार, आपल्या मताचे विविध पैलू, आपल्या विचारांचे परिणाम याचा विचार करायचा असतो, विचार हे घडवायचे असतात, सुधारून घ्यायचे असतात, अन ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे याचा पडलेला विसर.

मग निर्भयावर बलात्कार करणाऱ्याच्या भावनांचे, स्वातंत्र्याचे काय? का नाही समजून घ्यायचे त्यांना? एखाद्याच्या मनात येणारे विचार वा भावना, मनावर उठणारे तरंग हेच अंतिम मानायचे असेल; तर मानवी मनात येणारे खुनाचे, बलात्काराचे, भ्रष्टाचाराचे, फसवणुकीचे असे कित्येक मनोभाव का मान्य करायचे नाहीत? असे होत नाही, होऊ शकत नाही, होऊ नये. मनोभावांचे समर्थन वा त्याज्यता अन्य पुष्कळ घटक विचारात घेऊनच ठरवावी लागते. विचारी म्हणवणाऱ्यान्ना हे ध्यानी येऊ नये?

गेली अनेक दशके स्वातंत्र्य, समता आदींचे निर्बुद्ध विवेकशून्य नारे देत जी एक विधीनिषेधशून्य जीवनशैली विकसित झाली त्याचाच परिणाम आहे, त्या प्रतिनिधीचा हास्यास्पद प्रश्न. आज त्याच विधीनिषेधशून्य जीवनशैलीला पुढे घेऊन जाणारी, या वेबसाईटसना मुक्त करण्याची जी मागणी होत आहे, ती मान्य झाल्यास पुढील काळ कसा राहील? किती निर्बुद्धांचा राहील? कारण आपले वागणे, विचार करणे केवळ त्या त्या क्षणापुरते नसते. ते आपल्या व्यक्तित्वाला अंतर्बाह्य प्रभावित करीत असते. अन हा प्रभाव जाणता वा अजाणता समाजाला प्रभावित करीत असतो. त्यामुळेच व्यक्तीला अमर्यादित स्वातंत्र्य असूच शकत नाही. ते त्याच्यासाठी अन समाजासाठी, दोघांसाठीही घातकच असते. माणसाचे मन पाण्यासारखे आहे. त्याला खाली जायला काहीही लागत नाही. पण वर खेचून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात. ते आपोआप वर येत नाही. हे मनाला वर आणण्याचे प्रयत्न म्हणजेच संस्कार.

संस्कार या गोष्टीत विधी (काय करायचे) अन निषेध (काय करायचे नाही) या दोन्हीचा समावेश असतो. आजचे जीवन, त्यापाठी असणारे तत्वज्ञान संस्कारशून्य आहे याचा अर्थ हाच आहे की त्यात विधी आहेत पण निषेध नाहीत. भारताने हजारो वर्षे संस्कारांची, विधिनिषेधपूर्ण जीवनशैली अंगिकारल्यामुळेच हा समाज अन येथील राष्ट्र सगळ्या वादळवाऱ्यात टिकून राहिले. अन आज जगभरातील मानवता टिकायची असेल तर हीच विधिनिषेधपूर्ण जीवनशैली योग्य आहे यावर सुजन लोक येऊ लागले आहेत. चुकीची दिशा बदलायलाच हवी. त्या दिशेने जाणाऱ्याला कळेल तेव्हा कळेल हे म्हणणे अज्ञानाचे लक्षण आहे.

गेल्या दोन-अडीच हजार वर्षातील भारतेतर विचारपद्धती मनाला एक दगड मानते. त्यामुळे त्यावर कशाचा काही परिणाम होतो वगैरे त्यांच्या गावीही नसते. हा दगड अश्लील चित्रपटासमोर ठेवला काय, हिंसक चित्रपटासमोर ठेवला काय, त्याग बलिदानाची शिकवण देणाऱ्या चित्रपटासमोर ठेवला काय त्यांच्या दृष्टीला, बुद्धीला त्यात काहीच फरक वाटत नाही. व्यवहारात प्रत्ययाला येणाऱ्या विसंगतीही मग ते दृष्टीआड करू लागतात. त्याच आधारे ते भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्ये यांनाही प्रश्न करतात? तुमची संस्कृती काय एवढी तकलादू आहे काय? वगैरे. मुळात संस्कृती, मन, संस्कार हे काही दगड नाहीत. हे सारे प्रवहमान घटक आहेत, असतात. त्यांचे संगोपन, संरक्षण, संवर्धन सतत करत राहावे लागते. तरच त्यांचे अपेक्षित परिणाम प्रत्ययाला येतात. सुग्रास अन्न ज्याप्रमाणे देखभाल केली नाही तर नासते, तसेच हे आहे. जीवमान अशा या बाबी आहेत. मुळात माणसाला तरी ही भारतेतर संस्कृती जीवमान मानते का? अन मानत असेल त्याचा योग्य तो अर्थबोध तिला होतो का?

हे सगळे ठीक आहे हो, पण बंदी हा काही त्यावरचा उपाय आहे का? असा खूप मानभावी प्रश्न विचारणारे आहेतच. त्यांना केव्हातरी उत्तर देईन. तूर्त फक्त त्यांच्यासाठी एक प्रश्न- तुमच्याकडे काय उपाय आहे? अन प्रबोधन वगैरे जे उपाय तुम्ही सांगता त्याने तरी उपाय होतो का? त्यांचा विस्ताराने परामर्श पुन्हा केव्हा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ४ ऑगस्ट २०१५

set of things

`पण बंदीने काय होईल?' सरकारच्या वेबसाईट बंदीचं स्वागत करणाऱ्या काही जणांनी मेसेज करून विचारलं? हे लोक भाजप किंवा मोदींचे किंवा हिंदुत्व वगैरेचे विरोधक नाहीत, `आधुनिक' असं बिरूद मिरवायला आवडणारे ढोंगी नाहीत, अन समाजाच्या भल्याची इच्छा असणारे आहेत. त्यामुळे थोडं विश्लेषण त्यांच्यासाठी.

माणसाची मुळातच ही सवय आहे की, त्याला काहीतरी एक हवं. एक उपाय हवा. एखाद्या आजारावर, व्याधीवर त्याची मागणी असते एक काही तरी सांगा. औषधे, पथ्य, व्यायाम, वातावरण, शिस्त अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर तो कंटाळतो, नाराज होतो, वैतागतो. पण त्याला लक्षात येत नाही की, आजार वा व्याधी हा केवळ एकाच गोष्टीचा परिणाम नाही अन एकाच उपायाने जादूच्या कांडीसारखा तो बराही होऊ शकत नाही. खरं तर या विश्वातली कोणतीही गोष्ट कोणत्याही एकाच गोष्टीने निर्माण होत नाही, नियंत्रित होत नाही. अगदी साधा श्वासोच्छवास. त्यासाठी पुष्कळ गोष्टी लागतात. भाजी करायची म्हणजे फक्त भाजी असून चालत नाही. पुष्कळ गोष्टी लागतात. अगदी कोणतीही क्षुल्लक वा महान गोष्ट असो, त्यासाठी set of things लागतात. अगदी तेच याही बाबतीत आहे. केवळ साईट्स बंदीने सारं काही सुरळीत होईल का? मुळीच नाही. त्यासाठी पुष्कळ गोष्टी कराव्या लागतील. पण त्यासाठी जो काही set of things आहे, त्यात साईट्स वरील बंदी हीदेखील महत्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ बाकी गोष्टी नकोत असा नाही. कोणतीही गोष्ट समजून घेताना हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे.

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०१५

दंभकाळाची वेळ

कोट्यवधी फोन्समध्ये uidai चा नंबर आपोआप सेव्ह झाला. याचाच अर्थ आपल्या कक्षेबाहेरील घटक सदासर्वदा असतातच असतात. आम्ही ते कधी मान्य करणार? मुद्दा फक्त तंत्रज्ञानाचा नाही. इतिहास, राजकारण, अर्थकारण, संस्कृती, आरोग्य, शिक्षण; अगदी समग्र जीवनाचा आहे. प्रयत्नांपुढे दैव आणि दैवापुढे प्रयत्न वारंवार आपटी खातात. एका तर्काला खोडून काढायला दुसरा तर्क हाती तलवार घेऊन उभाच असतो. एका शहाण्याला आरसा दाखवायला दुसरा शहाणा तयारच असतो. तरीही आम्हाला, आमच्या यच्चयावत सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत. या जगात काहीही सिद्ध करता येत नाही. या जगातील काहीही वा कोणीही अंतिम नाही, absolute नाही. पण माणसाला हे नीटच समजावं आणि त्याने तसं जगावं, हे तरी कुठे त्याच्या हातात आहे? तीही त्याची मर्यादाच. त्यामुळे चालतच राहणार. सध्या `दंभकाळाची' वेळ आहे.

(ही पोस्ट वाचून कॉंग्रेस, भाजप वगैरे ज्यांच्या मनात येईल त्यांनी ते आपल्यापुरतच ठेवावं.)

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०१८

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

गणेशोत्सवाबाबत हितगुज

गुरुपौर्णिमा आटोपली. अजून दीड महिन्याने गणेशोत्सवाची धूम राहील. त्याची तयारी मात्र एव्हाना सुरूही झाली असेल. जोश, उत्साह, आनंद वगैरे राहीलच. ते राहायला हवेही. गेल्या काही दिवसात `मराठी' आणि `हिंदू' अशा दोन मितीही गणेशोत्सवाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातून `आमचा' अशी एक भावनाही तयार झाली आहे. यात वावगे काहीही नाही. पण या दोन मिती आणि ही भावना, यात अडकून पडणे वा त्याचे वर्तुळ तयार होणे; याऐवजी त्यांचा विस्तार कसा होईल याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे. त्यादृष्टीने काही सूचना कराव्याशा वाटतात.

१) पैशाचे प्रदर्शन टाळणे.

२) पर्यावरण रक्षण.

३) वाहतूक, स्वच्छता यासारख्या सामाजिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये.

४) `आपल्या' कलेचे प्रदर्शन, प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न.

५) कुठल्याही प्रकारे सिनेगीते किंवा गणपतीसाठी म्हणून तयार केलेली आधुनिक गीते न वाजवता; सनई, बासरी, सतार यासारखे वाद्यसंगीत किंवा शास्त्रीय कंठसंगीतच वाजवले जाईल याचा आग्रह धरणे.

६) आरत्या, भक्तिगीते मर्यादित प्रमाणात वाजवणे.

७) संगीताचा वा भक्तिगीतांचा आवाज कानठळ्या बसवणारा राहणार नाही यावर कटाक्षाने लक्ष देणे. दूरवर आवाज पोहोचावा हे आवश्यक मानू नये. गणपती बाप्पांजवळ येणाऱ्यांना आल्हादक, प्रसन्न वाटावे असा आवाज ठेवावा.

८) आवाज दूरवर पोहोचवायचाच असेल तर जास्त स्पीकर लावावे. पण आवाज मात्र हळूच असावा. (थोडे कठोर वाटेल, पण बहुसंख्य लोक बहिरे नसतात. आपल्या आवाजाच्या माऱ्यामुळे मात्र तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बहिरेपण येऊ शकते.)

९) कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा पूर्णपणे बंद कराव्या. त्याऐवजी सादरीकरण करावे. सादरीकरणात सुद्धा `आपले, शालीन, मर्यादशील, सहज करण्याजोगे, कोणत्याही प्रकारच्या (केवळ वैषयिक नव्हे) भावना भडकवणारे काहीही असू नये. त्याऐवजी भावनांचे विरेचन करणारे, भावनांचे उन्नयन करणारे असे सादरीकरण असावे. विनोदी कार्यक्रम सुद्धा उखाळ्यापाखाळ्या, टर उडवणे, पांचटपणा टाळून असावे.

१०) गणपती ही विद्येची देवता आहे. त्यामुळे पुस्तके, कविता, विचार, सगळ्या प्रकारचे ज्ञान यांना प्रोत्साहन देणारे, उचलून धरणारे, त्यांचा प्रचार प्रसार करणारे, कार्यक्रम, उपक्रम यांना प्राधान्य द्यावे.

११) आपली वेशभूषा, केशभूषा, भाषा, वावरणे; सभ्य, धार्मिक, शालीन असावे. भडक, उत्तान असू नये. महिला वर्गालाही याबाबत विशेष विनंती.

१२) गणेशाच्या आगमनाच्या वा विसर्जनाच्या मिरवणुका शक्ती प्रदर्शन वा गोंधळ वा ओंगळवाण्या होऊ नयेत.

१३) ढोल, ताशांच्या पथकांचे दहा दिवसात विविध ठिकाणी प्रदर्शनीय कार्यक्रम करावेत. त्यासाठी लोकांना निमंत्रण द्यावे. मिरवणुकांमधील त्याचे प्रस्थ कमी करावे. त्यापेक्षा विसर्जन स्थळी एकेक, दोनदोन तास विविध पथकांना वाजवण्याची संधी द्यावी.

१४) केवळ मोठी संख्या, मोठा आवाज, दिसायला मोठ्या गोष्टी म्हणजे सारे काही हा समज दूर करण्याचा प्रयत्न व्हावा.

१५) कला, साहित्य, ज्ञानविज्ञान, धार्मिकता, आध्यात्मिकता; यांची वाढ होईल, रसिकता वाढेल, समज वाढेल, बाह्य एकतेला आंतरिक एकतेचे बळ लाभेल, अशा विचारांनी, अशा भावनांनी लहानमोठ्या सगळ्या गोष्टींचे आयोजन, नियोजन करावे.

१६) वीज, पाणी, खाद्यपदार्थ, अन्न कणभर सुद्धा वाया जाणार नाही याकडे लक्ष पुरवावे.

१७) निमंत्रण पत्रिकांवर नावे छापून जाहिरात करण्याच्या वृत्तीला आळा घालता येईल का याचा प्रयत्न करावा. दानदात्यांशी त्यासाठी हिमतीने, पण योग्य शब्दात कसे बोलता येईल; त्यांचेही मन जाहिरातबाजी पासून वळवून खऱ्या धार्मिकतेकडे कसे वळवता येईल याचा विचार करावा.

- श्रीपाद कोठे

३ ऑगस्ट २०१५

मन आणि नियंत्रण

मनाचं नियंत्रण आणि मनावर नियंत्रण... दोन वेगळ्या गोष्टी. दोन्हींचा परिणामही वेगवेगळा. त्यात जमीन अस्मानाचे म्हणता येईल एवढे अंतर. मनाचं नियंत्रण हा अभारतीय विचार, मनावर नियंत्रण हा भारतीय विचार. मनाचं नियंत्रण म्हणजे भोग, मनावर नियंत्रण म्हणजे योग. मनाचं नियंत्रण म्हणजे गुलामी, मनावर नियंत्रण म्हणजे स्वातंत्र्य. मनाच्या नियंत्रणात राहून त्याच्या तालावर नाचायचं की, मनावर नियंत्रण ठेवून त्याला आपल्या तालावर नाचायला लावायचं? आज स्वातंत्र्याच्या नावाने गुलाम झालो आहोत का आपण? मनाचं नियंत्रण चिकित्सा करू देत नाही. मनावर नियंत्रण चिकित्सा करतं. मी मनाचा की मन माझं? श्रेष्ठ कोण मी की मन?

- श्रीपाद कोठे

३ ऑगस्ट २०१६