या व्यवस्थेतील सगळ्यात मोठी त्रुटी कुठली असेल? एखाद्याची आई-बहिण घेण्याची जागा नसणे. रक्तदाबाचं मीटर फुटून जाईल इतका रक्तदाब वाढवणाऱ्या गोष्टी इतक्या घडतात की विचारता सोय नाही. आणि पुन्हा `समजून घ्यायचं' हा निर्लज्ज उपदेश किंवा `समजून घ्यावं' ही बेशरम अपेक्षा. मुख्य म्हणजे हा उपदेश वा ही अपेक्षा ज्याला त्रास होतो त्याच्याकडूनच. मुळात तिखट प्रतिक्रिया त्रास झाल्यावरच येते. त्यामुळे नेहमीच तिखट प्रतिक्रिया समजून घेण्याची भूमिका असायला हवी. पण असते उलटेच. मूळ क्रीयेबद्दल बोलण्यापेक्षा, चर्चा करण्यापेक्षा. त्यात सुधारणा करण्यापेक्षा प्रतिक्रिया कशी चुकीची यावरच सारा रोख. आणि म्हणे आम्ही सुधारलो, सभ्य झालो, आधुनिक झालो वगैरे.
या सगळ्याचं आजचं कारण. महानगरपालिकेचा घराचा कर. घराच्या कराचं जे देयक पाठवलं त्यावर कोणतीही तारीख नाही आणि नियम मात्र हा की देयकाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या आत कर भरणा व्हायला हवा. तसे न केल्यास दरमहा २ टक्के दंड आकारणी. आता तारीख न टाकण्यापासून तर बिलाच्या भाषेपर्यंत किमान दहा गोष्टी अशा आहेत की ज्यासाठी महापालिकेची आय-भन घ्यावी. त्यात कोणतंही पाप नाही आणि गुन्हाही नाही. पण तसं करायला जागा मात्र कुठेही नाही. अन अस्थानी एखादी कृती केली तर तो गुन्हा होतो ना?
- श्रीपाद कोठे
४ ऑगस्ट २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा