काही दिवसांपूर्वी `गणेशोत्सवाबाबत हितगुज' लिहिले. त्यात धांगडधिंगा संगीतापेक्षा भारतीय शास्त्रीय संगीत गणेशोत्सवात वाजवावे, असे आवाहन केले होते. त्यावर काही जणांनी शंका उपस्थित केली होती. ही अपेक्षा थोडी जास्त होत असल्याचेही काही जणांचे मत होते. पण काल अचानक एक सुखद अनुभव पदरी पडला. झाले असे की, भाजीपाला आणण्यासाठी मी नेहमीप्रमाणे नागपूरच्या सक्करदरा बाजारात गेलो. बाजाराच्या शेजारी तेली समाज संघटनेने एक सभागृह बांधले आहे. त्याचे होते उद्घाटन. त्याला मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री वगैरे सगळा लवाजमा होता. मी बाजारात पोहोचलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होते. पाचेक मिनिटात ते आटोपले अन पाहुणे परत गेले. माझे भाजी घेणे सुरूच होते. सभागृहातील सगळे काही ऐकू येतच होते. अन सभागृहातून चक्क सनई ऐकू येऊ लागली. साधारणपणे कोणत्याही समाजाच्या अशा एखाद्या कार्यक्रमात हौशी लोक मोठ्याने गाणीबिणी वाजवतात. पण त्या कार्यक्रमात पाहुणे गेल्यानंतर गोंधळा ऐवजी सनईचे सूर ऐकायला मिळाले. माझा लेख वगैरे त्यांनी वाचला असण्याची शक्यता नाही. अन जे वाचतील त्यातीलही किती प्रतिसाद देतील हाही प्रश्नच आहे. पण समाजात माझ्यासारखा विचार करणारेही आहेत हे जाणवून बरे वाटले.
- श्रीपाद कोठे
१० ऑगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा