शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

शायराला श्रद्धांजली

दोन दिवसांपूर्वी राहत इंदोरी यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर शोकसंवेदना आणि टीका दोन्ही पाहायला मिळते आहे. ते मोठे शायर होते म्हणून शोकसंवेदना तर ते हिंदुविरोधी होते यासाठी टीका होते आहे. हा देश कोणाच्या .... नाही, सगळ्यांचा आहे. सगळ्यांनी यासाठी रक्त सांडलेले आहे, अशा आशयाचा त्यांचा शेरही प्रसिद्ध आहे. मुळात अभिनिवेश आणि एकांगीपणा आला की काय होतं, त्याचं हे उदाहरण म्हणता येईल. हा देश सगळ्यांचा आहे म्हणताना कोणावर अकारण टीका करण्याचे कारण नाही. तशी टीका असेल तर ते चूकच म्हटले पाहिजे. त्याला उत्तर म्हणून मग ज्यांच्यावर टीका होते ते बाह्या सरसावून उभे होतात. देशावर सगळ्यांचा अधिकार इत्यादी भाषा वापरली की, तो विचार व्यापक समजला जातो. प्रत्युत्तरात, टीका करणाऱ्याचे बेगडीपण दाखवून देश आपला असल्याचे दावे होऊ लागतात. जगभरात आतापर्यंत काय वेगळे झाले आहे आणि काय वेगळे आजही सुरू आहे. ही या वा त्या बाजूची मजबुरी असू शकते. सत्ताधारी, राजकीय पक्ष, राजकीय कार्यकर्ते यांची मजबुरी असू शकते. क्रियेची प्रतिक्रिया समजून घेता येऊ शकते. पण शहाणपणाचे काय? माणसाला शहाणे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारवंतांची, दार्शनिकांची, द्रष्ट्यांची काय मजबुरी असू शकेल? जगभरातले संघर्ष 'जमीन कोणाची' यावरूनच झाले आहेत. होत आहेत. ही पृथ्वी, ही जमीन, ही भूमी कोणा एकाची तर नाहीच; पण सगळ्यांची सुद्धा नाही. कोणी वा कोणाच्या आद्य पुरुषानी वा आद्य स्त्रीने जमीन निर्माण केलेली नाही. म्हणूनच ती ईश्वराची आहे. ज्यांना ईश्वर मान्य नाही त्यांनीही हे समजून घेतले पाहिजे. आपली बुद्धी केवळ वादविवादात वाया घालवण्यापेक्षा आशय समजून घेण्याची थोडी तसदी घेतली पाहिजे. ही जमीन जर कोणाची नाही तर डाकुगिरी करून ती ताब्यात ठेवणे राक्षसी आहे. ही जमीन ईश्वराची आहे अन आम्हा सगळ्यांसाठी मातृरुप आहे. हा विचार नवीन नाही. 'ईशावास्यम इदं सर्वम' किंवा 'माता भूमी:' हा या देशाने सगळ्या जगासाठी दिलेला पुरातन विचार आहे. हा विचार आणि त्यातील भाव जगभर रुजवू न शकल्याने आजची समस्या आहे. आजच्या समस्या सोडवण्यासाठी हाच विचार रुजवण्याची (केवळ सांगण्याची नव्हे) गरज आहे. त्या ऐवजी राक्षसी विचार अंगिकारून तू तू मी मी करण्यात हशील नाही. योग्य विचारांची रुजवणूक करण्याचा मार्ग सध्याच्या गोंधळातून काढणे हे आव्हान असले तरीही तो काढावा लागेल. हे आव्हान पेलण्याऐवजी योग्य विचारच नाकारण्याची, बासनात गुंडाळून ठेवण्याची, मिटवून टाकण्याची वृत्ती घातकीच असेल. विचारवंत, दार्शनिक, द्रष्टे आज जिवंत आहेत का; हा प्रश्नही यानिमित्ताने चर्चिला जाणे अपरिहार्य ठरते.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा