रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची एक पत्रपरिषद सुरु होती. अनेक विषयांवर पत्रकार प्रश्न विचारीत होते. गुरुजी त्यांची उत्तरे देत होते. अखेरीस पत्रकार थकले. घायकुतीला येऊन एका पत्रकाराने प्रश्न केला- आपण म्हणता ते सगळे ठीक आहे, पण हे होणार कधी? त्यावर गुरुजींनी मार्क ट्वेन या प्रसिद्ध इंग्लिश विनोदी लेखकाचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले- एकदा सगळे साहित्यिक गच्चीवर जमले होते. बोलता बोलता एकाने विचारले, आकाशातील चंद्रावर पोहोचायला किती मासे लागतील? सगळे विचारात पडले. त्या साहित्यिकात मार्क ट्वेन पण होता. त्याने क्षणभर विचार केला आणि तो म्हणाला- एक मासा पुरेसा आहे; provided it is long enough. (फक्त तो पुरेसा मोठा असावा.) आणि हा किस्सा सांगून गुरुजी म्हणाले- तुम्हा सगळ्या लोकांनी मनावर घेतले तर संघाचे काम काय, एका दिवसात पूर्ण होईल.
अन हे अक्षरश: खरे आहे. संघाचे काम काय आहे? सगळ्यांना एक माणूस म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून, या चिरंतन राष्ट्राचा घटक म्हणून जबाबदारीची जाणीव करून देणे आणि त्यानुसार वागण्याचे वळण लावण्याचा प्रयत्न करणे. कोणाला तरी सतत काही तरी उपदेश देत राहणे आणि आम्ही म्हणतो त्याप्रमाणे वागा असे सांगणे, त्यासाठी सगळं काही मुठीत ठेवणे हे संघाचं काम नाहीच. हे शिक्षणासारखं आहे. शिक्षकाने शिकवणं आणि विद्यार्थ्याने शिकणं दोन्ही आवश्यक अन हो पेपर सोडवणंही. १०० टक्के विद्यार्थी शिकले आणि त्यांनी नीट पेपर सोडवले तर शाळेचा निकाल १०० टक्के, नाही तर नाही. जबाबदारी प्रत्येकाची. माझी आणि समाजाचीही सगळी जबाबदारी माझी आहे, असं मनाच्या तळातून वाटतं का? आणि आभाळाच्या चंद्रापर्यंत पोहोचणारी मासोळी तयार होईपर्यंत धीर धरण्याची हिंमत आहे का? संघाचे पाच सरसंघचालक खपले तरीही संघाचा धीर आणि दम टिकून आहे. अधीर आणि कच्च्या दमाच्या खेळाडूंचे हे काम नोहे.
- श्रीपाद कोठे
२२ ऑगस्ट २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा