शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

रामरहीम बाबा

रामरहीम बाबाचा निकाल लागला एकदाचा. बरे झाले. खऱ्या भक्तांना, धार्मिक व आध्यात्मिक लोकांना यात काहीही वावगेही वाटणार नाही अन दु:खही होणार नाही. समर्थांनी म्हटलेच आहे ना- असे गुरु पायलीचे पन्नास मिळतात. रामकृष्ण परमहंस देखील म्हणत- गुरु दिवसा पहावा, रात्री पहावा, नीट पारखून गुरु करावा. त्यामुळे जे झाले त्यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. तरीही...

अन हा तरीही महत्वाचा आहे अन त्यावर वारंवार बोलायलाही हवे. एका वाहिनीवर या विषयावरच्या चर्चेत दोन मुद्दे आले- १) अन्य धार्मिक लोक अशा लोकांचा आधीच विरोध का करीत नाहीत? २) बाबा कोण याचे निकष असावेत.

या दोन्ही गोष्टींचा समाचार घेतला गेला पाहिजे. मुळात आधीपासून विरोध कसा करायचा? का करायचा? दोषी सिद्ध होईपर्यंत जर गुन्हेगार हा गुन्हेगार नसतो तर त्याला विरोध कसा करणार? असा युक्तिवाद करणाऱ्या वृत्त वाहिनीने तरी अशा लोकांचा आधीच विरोध केला का? किंवा करतील का? आणखीन एक मुद्दा- समाजात कोणी कशा पद्धतीने काम करायचे हे कोण सांगणार? वृत्तवाहिन्या? वाईट गोष्टींवर प्रहार ही जशी एक गोष्ट, तशीच चांगल्या सकारात्मक गोष्टींची सवय लावणे, सकारात्मक जाणीवा तयार करणे ही दुसरी गोष्ट. असंख्य धार्मिक व्यक्ती, संस्था अशी सकारात्मक कार्ये करीत आहेतच. मात्र, नाही नाही... त्यांनीही आमच्यासारखेच आकांडतांडव केले पाहिजे, ही भूमिका निखालस चुकीची ठरेल. हा साधा पोच नसलेल्या वृत्तवाहिन्यांचीच खरे तर झाडाझडती घेतली जायला हवी. हा देश आता बाबा बुवा चालवणार का, असा कंठशोष करणाऱ्या वाहिन्यांना प्रतिप्रश्न केला पाहिजे- हा देश कोण चालवणार यावर जरूर चर्चा करू, पण हा देश वृत्तवाहिन्या चालवणार का? या प्रश्नाचे अगोदर उत्तर द्या.

दुसरा मुद्दा- बाबा कोण याचे निकष ठरवण्याचा. हा खूप मोठा विषय आहे. तूर्त एवढीच नोंद पुरेशी ठरेल की, असे निकष ठरवणे ही भारतीय परंपरा तर नाहीच शिवाय धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही ते चुकीचे ठरेल. भारतेतर विचार पद्धतीच्या परिणामी असे युक्तिवाद होतात. त्यावर विस्तृत मंथन गरजेचे आहे. ज्यांना धर्म आध्यात्म यांच्याशी काहीही देणेघेणे नसते असे लोकच यात आघाडीवर असतात. शिवाय यातून सत्ता विरुद्ध संत असा भारताला आजवर अपरिचित असा वर्गसंघर्ष लादला जाऊ शकतो. वास्तविक असे संघर्ष लादणे हाच अजेंडा घेऊन काम करणाऱ्या लोकांची ही कारस्थाने आहेत का, अशी शंका घ्यायला पुरेशी जागा आहे. समाजाच्या सगळ्या क्षेत्रात आज सुरु असलेला discourse बारकाईने अभ्यासला तर या संशयाला पुष्टी मिळते. रामरहीम सारख्या घटना घेऊन, बुद्धीचा फारसा वापर न करणाऱ्या समाजाच्या मोठ्या भागाला, चुकीच्या विचारांकडे घेऊन जाणे आणि या देशाचे, समाजाचे सशक्त आधार मोडून काढण्याचा प्रयत्न करणे हे या निमित्तांनी घडते; हे लक्षात घेतले पाहिजे. रामरहीमच्या निमित्ताने झालेला हिंसाचार highlight केला जातो आणि ऐन दिवाळीच्या दिवशी पूज्य शंकरचार्यांना खोट्या आरोपाखाली अटक केल्यावरही हा समाज त्याचा धैर्याने सामना करतो हे हेतूपुरस्सर विसरले जाते. अन एकूणच धर्म इत्यादींना ठोकून काढले जाते. सुविद्य लोकांनी विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २८ ऑगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा