सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

अर्णवची झुंड

आपण एखादी गोष्ट नीट वाचत सुद्धा नाही. अलीकडेच मी अर्णव गोस्वामी मला पत्रकार वाटत नाही, अशी पोस्ट टाकली. कोणाला तो सर्वोत्तम पत्रकार वाटू शकतो. मला हरकत नाही. पण मला वाटत नाही. यावर का वाटत नाही, असं कोणी विचारलं तर ते योग्यच ठरेल. पण माझ्या पोस्टबाबत तसं झालं नाही. (हा अनुभवही नवीन नाही.) अर्णव ने लावून धरलेल्या सुशांत प्रकरणात काय चूक आहे? अन त्यात काहीही चूक नसल्यामुळे तो पत्रकार वाटत नाही हे तुमचं (म्हणजे माझं) म्हणणं अयोग्य आणि पक्षपाती आहे; असा माझ्या पोस्टवर आक्षेप घेणाऱ्यांचा मुद्दा. वास्तविक मी सुशांत प्रकरणी काहीही म्हटलेलं नाही. अर्णवने ते लावून धरणे चूक आहे असंही म्हटलेलं नाही. परंतु आम्हाला जो पक्ष प्रिय आहे, त्या पक्षाला महत्वाचा वाटणारा विषय अर्णव लावून धरतो आहे, त्यामुळे अर्णवला काही बोलणे, म्हणजे आमच्या पक्षाला अन त्याच्या भूमिकेला विरोध. अन आम्हाला विरोध म्हणजे तुम्ही समाजद्रोही. म्हणजे तुमची देशभक्ती प्रश्नांकित.

आपली विचारांची ही पद्धती आणि स्थिती आहे. वरून माझं पत्रकारितेचं ज्ञान आणि आकलन तपासण्याची खुमखुमी आहे. अन अशांच्या भरवशावर भारत महान होणार आहे. लाखो वेळा सांगून झालं आहे की; पक्ष, नेते, राजकारण, सत्ता; यांना माझ्या विचार विश्वात काहीही स्थान नाही. त्यांचे उल्लेख वा संदर्भ केवळ माझ्या व्यापक विषयाकडे घेऊन जाण्यासाठी असतात. पण हे समजेल तर शपथ. अनेकांना हे समजतच नाही आणि पुष्कळांना हे पटत नाही. कृपया अशा लोकांना हात जोडून प्रार्थना, तुम्ही मला तुमच्यासारखं समजू नका.

आता अर्णव पत्रकार का वाटत नाही ते. एखादा विषय कोणी किती लावून धरायचा, त्यात किती सहभागी व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु...

- ऐकणाऱ्याला काही कळणार नाही असा आरडाओरडा करणे म्हणजे पत्रकारिता असू शकत नाही.

- एकच बिट सांभाळणाऱ्या एकाच शहरातील दोन पत्रकारांकडे सुद्धा सारखी माहिती असेलच असे नसते. माहिती कशी येते इत्यादी बाबी पत्रकार जाणतात. ही वास्तविकता असतानाही; आपल्या जवळच्या माहितीवर चर्चेतल्या पाहुण्यांनी बोलावे किंवा उत्तर द्यावे; हा दुराग्रह म्हणजे पत्रकारिता असू शकत नाही.

- समोरच्याला उघडं पाडायचं म्हणजे केवळ त्याची बोलती बंद करायची हे नसतं. तर त्याला जे बोलायचं ते, अगदी nonsense सुद्धा बोलू देऊन उघडं पाडता येतं. अन लोकांना सगळं व्यवस्थित समजतं. हे लक्षात न घेता दोन दोन तास तमाशा करणं म्हणजे पत्रकारिता नसते.

- काही गोष्टी कोणाला politically correct वा incorrect राहू शकतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर मर्यादा असू शकतात वा ते दुसरं काही बोलू शकतात. मात्र आपणच बोलावलेल्या लोकांचा अतिशय वाईट पद्धतीने पाणउतारा करणं, म्हणजे पत्रकारिता नाही.

शिवाय ज्यांना तो फार वैचारिक वगैरे वाटतो, त्यांनी काही वर्षांपूर्वीची २२ ऑगस्टची माझी एक पोस्ट पाहावी. (ती पोस्ट द्या असे मलाच सांगू नये. मी नोकर नाही कोणाचा. खाज असेल तर स्वतः शोधावी. माझ्या सगळ्या पोस्ट public असतात.) ज्यावेळी तो times now ला होता त्यावेळी हिंदूंचे प्रतिनिधी कोण याबद्दल किंवा विश्व हिंदू परिषदेबद्दल वगैरे तो कसा बोलत असे ते कळेल.

अन मला शहाणपण शिकवणाऱ्यांनी हे कायम लक्षात ठेवावे की, स्वतःचे हिंदुत्व जोपासण्यासाठी मी फार मोठी किंमत चुकवलेली आहे. माझ्याजवळ सुद्धा उभं राहण्याएवढी किंमत कदाचित आक्षेप घेणाऱ्यांनी कधीही चुकवलेली नसेल.

- श्रीपाद कोठे

रविवार, २३ ऑगस्ट २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा