सकाळी सकाळी गावात गाडी शिरली. त्यातून काही पोलीस, काही सामाजिक कार्यकर्ते उतरले. अचानक त्यांचे लक्ष रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका व्यक्तीकडे गेले. त्यांनी त्याला घरी जायला सांगितले. त्याला हुसकवायचा प्रयत्नही करून पाहिला. तो माणूस मात्र जागचा हलला नाही. एकाने हिय्या करून त्याच्याशी समजावणीची बोलणी सुरु केली- तू करतो आहे ते बरोबर नाही, इत्यादी. तो मात्र दाद देत नव्हता. अखेरीस पोलिसांना पोलिसगिरी करण्याची हुक्की आलीच. ते सांगू लागले, आम्ही तुझ्यावर केस करू वगैरे. तो माणूस कशाचा ऐकायला? अखेरीस आलेले लोक कंटाळले. त्याला म्हणाले- काय करायचं बाबा तुझं? तो म्हणाला- मी इथून उठणार नाही. तुम्हाला हवं असेल तर या माझ्याजवळ अन उठवा मला. आता त्याच्या तशा अवस्थेत कोण त्याच्या जवळ जाणार अन कोण त्याला बखोट धरून उठवणार... अखेरीस आलेले लोक कंटाळून निघून गेले. सगळं आटोपून तो माणूस घरी परतला. सगळी गंमत दुरून पाहणारं एक टोळकं रस्त्यात उभं होतंच. त्यांनी त्याला टोकलं- काय भाऊ तुम्ही तर पार वाट लावली त्या हागणदारीमुक्तवाल्यांची. कसं काय जमलं बुवा तुमाला?
आदल्या दिवशी रात्री टीव्हीवर पाहिलेल्या चर्चेतून प्रेरणा घेतलेला तो माणूस उत्तरात एकच शब्द बोलला- `अभिव्यक्ती स्वातंत्र्य.'
- श्रीपाद कोठे
१७ ऑगस्ट २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा