बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

विचारांचा प्रतिवाद

`महाराष्ट्र भूषण' गाजतंय. एक फार चांगलं झालं, चेहरे आणि वृत्ती उघड झाल्या. भाषा, भावना, भूमिका यातील काहीही ज्यांच्याकडे नाही त्यांनी नीचपणा करावा यात नवल काहीच नाही. दुर्दैवाने आजवर हेच राज्याचं, देशाचं, समाजाचं, शेतकऱ्यांचं वगैरे भलं करीत होते. यानिमित्ताने त्यांचा फार आदर करणारे, त्यांना गुरु मानणारे, त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेणारे यांनीही आपल्या भूमिका थोड्या तपासून आणि दुरुस्त करून घ्याव्या.

विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा म्हणजे काय असतं, हे स्पष्ट होण्यासाठी फक्त एक उदाहरण. ४-५ वर्षांपूर्वी श्री. शेषराव मोरे यांनी एक ग्रंथ लिहिला. तब्बल ७५० पानांचा. शीर्षक होते- `कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?' त्यावर खूप वादळ उठले, चर्चा झाल्या. म्हणून राजहंस प्रकाशनाने आक्षेप घेणाऱ्या १२ जणांचे प्रदीर्घ लेख आणि मूळ पुस्तकातील भूमिका अन आक्षेपांवर मत व्यक्त करणारे, लेखक शेषराव मोरे यांचे दोन लेख, असा ३६० पानांचा भरगच्च दुसरा ग्रंथ काढला. त्या विषयाची बरीच चिरफाड झाली.

आज श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी गेल्या ६० वर्षात असा काही उद्योग का केला नाही? त्यासाठी क्षमता आणि लायकी लागते, एवढेच. विद्वत चर्चेला सामाजिक विद्वेषाचे रूप द्यायला चार आण्याचीही अक्कल लागत नाही, फक्त मनाची काठोकाठ भरलेली दुष्टता अन क्षुद्रता लागते.

- श्रीपाद कोठे

१८ ऑगस्ट २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा