आजच्या महाराष्ट्र भूषण सोहोळ्यात मला सगळ्यात महत्वाचं अन लक्षणीय काय वाटलं? २५ लाख रुपयांचं दान? नाही. बाबासाहेबांचा जीवनप्रवास, संशोधन वगैरे? नाही. त्यांनी सांगितलेली `रौनकपूर'च्या मशिदीची माहिती? नाही. पंडिती लेखन आणि ललित लेखनाचे विवेचन? नाही. मुख्यमंत्र्यांचा खणखणीतपणा? नाही. हे सगळेच महत्वाचे होतेच. पण मला महत्वाचे अन लक्षणीय वाटले- पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी दाखवण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीतील एक प्रांजळ निवेदन. बाबासाहेबांना अर्पण करण्यात आलेले मानपत्र ध्वनीचित्रफितीच्या रुपात दाखवण्यात आले. त्यात तीन-चार निवेदने होती. एक होते प्रख्यात दलित साहित्यिक प्रा.डॉ. हरी नरके यांचे. त्यांनी सांगितले- `बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र वाचल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. मी शाळेत शिकत होतो. मी त्यांना माझ्या मनातील प्रश्न, शंका विचारल्या. त्यांनीही माझी माहिती विचारली. त्यांनी माझ्या शंकांचे निरसन तर केलेच, पण माझी परिस्थिती जाणून घेऊन मला वह्या पुस्तकांची मदत केली. त्यानंतर सुद्धा ते नियमितपणे मला वह्या पुस्तकांची मदत करीत असत.' `गोब्राम्हण प्रतिपालक' म्हणजे काय हे समजण्यासाठी असे प्रसंग उपयुक्त ठरतात. नुसते शब्द वाचून अर्थ कळतो, असे ज्यांना वाटते; ते `गोब्राम्हण प्रतिपालक' नको म्हणून आकाशपाताळ एक करतात. परमेश्वराच्या नमुन्यांबाबत किती बोलावे?
- श्रीपाद कोठे
१९ ऑगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा