सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

धर्म म्हणजे काय?

चित आणि पट यांना धरून ठेवणारं अप्रमेय तत्त्व म्हणजे धर्म. त्या दोनच्या मध्ये काय असतं? नाही सांगता येत. पण काहीतरी असतं हे नक्की. ते कळतं, आकळतं. आकलन, समज, अनुभूती, अनुभव; हे शब्दसुद्धा समजावून सांगता येत नाहीत. मग ज्या गोष्टी आकलन, अनुभूती, समज यांच्या कक्षेतील आहेत; त्या शब्दबद्ध कशा करणार? समजावून कशा देणार किंवा घेणार? धर्म ही अशीच बाब आहे.

दोन श्वासांच्या मधल्या मोकळ्या वेळात `मी'ला धरून ठेवतो तो धर्म.

लौकिक आणि अलौकिक यांना धरून ठेवतो तो धर्म.

दिवस आणि रात्र यांना धरून ठेवतो तो धर्म.

समजणे आणि न समजणे यांना एकत्र ठेवतो तो धर्म.

चित आणि पट हे एकच आहेत आणि त्यांना धर्माने धरून ठेवले आहे हे आपल्याला कळतं कारण आपण त्या नाण्याचा भाग नसतो. त्या नाण्याच्या बाहेर असतो. त्यामुळे पूर्णांशाने त्याचं आकलन होऊ शकतं.

या संपूर्ण अस्तित्वाची धारणा करणारा धर्म जाणून घ्यायचा असेल तर या अस्तित्वाचं एक असणं समजायला हवं. अन ते समजायचं असेल तर या अस्तित्वाच्या बाहेर, अस्तित्वाच्या अतीत जायला हवं. या अस्तित्वापासून वेगळं व्हायला हवं. तोच साक्षात्कार, तीच समाधी अवस्था, तीच आत्मतत्त्वाची उपलब्धी, तेच धर्माचे आकलन.

धर्म ही बौद्धिक चर्चेची नव्हे सायासाची बाब आहे. भक्ती, उपासना इत्यादी त्यासाठीचे प्रयत्न.

धर्माचं हे आकलन होईपर्यंत चित किंवा पट यातील काहीतरी एकच कळू शकतं, समजू शकतं. त्याला धरूनच आपले व्यवहार चालतात. धर्माचं आकलन झालं की व्यवहाराचं स्वरूप बदलून जातं. या सनातन धर्मातूनच व्यक्तीधर्म, समाजधर्म, राजधर्म, युगधर्म, आपद्धर्म, स्थितीधर्म प्रसूत होतात.

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा