गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

मानवी दांभिकता

एखाद्या गोष्टीचं (व्यक्ती, कण, बिंदू, विचार, भावना, घटना... काहीही) स्थान कसं निश्चित होतं? परिमाणांनी. जसे- एखाद्या वस्तूचा बोध आपल्याला होतो, तो लांबी, रुंदी, खोली यांच्या आधारे. ही झालीत परिमाणे. घटनांचा बोध या परिमाणांनी होऊ शकत नाही. त्याचा बोध होतो `काळ' (time) या परिमाणाने. विज्ञानाने या साऱ्याचा अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे. पण तरीही हे सारे वरवरचे म्हटले पाहिजे. प्रज्ञावान शास्त्रज्ञांचे याने समाधान होणे नव्हते. त्यामुळे ते या बाह्य वस्तूंच्या अंतरंगात शिरले आणि त्यातून nuclear physics चा विस्तार झाला. यातूनच सगळ्या वस्तुमात्रांचा, सगळ्या जडद्रव्याचा आधार असलेल्या अणूचा शोध लागून त्याचा अभ्यास सुरु झाला. हा अभ्यास सुरु झाला तेव्हा शास्त्रज्ञांना लक्षात आले की, हे सारे विलक्षण आहे. अणुगर्भातील कण हे अद्यापही शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरले आहेत. त्या बारक्याशा अणूतील हे कण स्वनातीत (supersonic) विमानांपेक्षाही अधिक वेगाने अणूमध्ये फिरत असतात. तो अणु फोडल्यावर जी सुरु होते तीच chain reaction. ही chain reaction च अणुउर्जा आणि अणुबॉम्ब यांचा गाभा होय. असे असले तरीही या अणूची रहस्ये मात्र अजूनही उलगडायची आहेत. ही रहस्ये उलगडण्याच्या प्रयत्नातूनच विकसित झाली स्ट्रिंग थिअरि. या स्ट्रिंग थिअरिने लांबी, रुंदी, खोली आणि काळ या चार परिमाणांनी काम भागत नाही असे पाहून नवीन सहा परिमाणांची कल्पना केली. हो, कल्पना केली. कारण ही सहा परिमाणे अजूनही काल्पनिकच आहेत. त्यांना प्रत्यक्ष अस्तित्व नाही. त्यामुळेच त्यांना अजून नावेही देण्यात आलेली नाहीत. पाचवे, सहावे, सातवे... याक्रमाने दहावे पर्यंत त्यांचा क्रम अभ्यासकांनी लावला आहे. आता तर अभ्यासक असे म्हणू लागले आहेत की, चौथ्या परिमाणाच्या पुढे, म्हणजे पाचव्या परिमाणापासून पुढे आपल्याला समजून घ्यायचे असेल तर ते मानवाच्या आजच्या क्षमतांना शक्य नाही. ही परिमाणे समजून घ्यायची असतील तर नवीन मानव जन्माला घालावा लागेल. हा नवीन माणूस जन्माला घालता येईल का याचाही विचार सुरु झाला आहे. पण गंमत अशी की, जी परिमाणेच माहिती नाहीत ती शोधण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी माणूस तरी कसा निर्माण करायचा. ही काल्पनिक परिमाणे समजून घेण्यासाठी मानवाच्या कोणत्या ज्ञानेंद्रियात वा कोणत्या कर्मेंद्रियात वा मनात वा मेंदूत कोणता बदल करण्याची गरज आहे हे कसे समजायचे? जे माहीतच नाही ते शोधण्याची तयारी कशी करायची? विज्ञान आज अशा प्रकारच्या dead end ला आले आहे. एक प्रकारच्या संभ्रमात सापडलेले आहे. किमान एक कबुली तर आजच्या विज्ञानाने दिलेलीच आहे की, आजच्या परिस्थितीत आपल्याला या जड विश्वाचा बोध पूर्णत: होऊ शकत नाही.

आजचे जडवादी, भौतिकवादी, वास्तववादी, प्रत्ययवादी ज्या प्रकारे वागतात, बोलतात, विचार करतात आणि तरीही स्वत:ला विज्ञानवादी अन आधुनिक म्हणवतात; तेव्हा मती कुंठीत झाल्याशिवाय राहत नाही. मानवी दांभिकतेचं याहून चांगलं उदाहरण शोधूनही कदाचित सापडणार नाही.

- श्रीपाद कोठे

५ ऑगस्ट २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा