काल नागपुरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रसिद्ध अंबाझरी तलाव दुथडी भरून वाहू लागला. तरुणाई आनंद साजरा करायला गेली. (कॉलेज या तलावाला लागूनच असल्याने ३७-३८ वर्षांपूर्वी आम्हीही जात असू.) त्याचे फोटो छापून आले. अन त्यासोबत छोटीशी बातमी होती. त्यात म्हटले होते की, तिथे सुरक्षेचा कोणताही बंदोबस्त नव्हता. वृत्तपत्राला बातम्या कराव्याच लागतात. पण सवाल हा की, कशाला हवी सुरक्षा व्यवस्था? त्याचे उत्तर आहे- दुर्घटना होऊ नये म्हणून. overflow पाहायला गेले असताना दुर्घटना का होईल? झालीच तर पोरांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच होईल. `बेजबाबदारपणे वागणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो आम्ही वापरणारच.' अशा थाटात वागायचे अन त्या बेजबाबदारपणाच्या परिणामांची जबाबदारी समाजाची, सरकारची, प्रशासनाची असे म्हणायचे; हा तमाशा खूप झाला. अशा overflow, धबधबे, समुद्र किनारे इत्यादी ठिकाणी अशी पोलीस यंत्रणा किंवा सुरक्षेची व्यवस्था वगैरे मुळीच असू नये. स्वत:च्या बेजबाबदार वागण्याने मेले १०-२० जण तर मेले. सरकार किंवा प्रशासन अशी रोखठोक भूमिका घेऊ शकत नाही. पण समाजाचे असे मानस तयार होणे गरजेचे आहे. वृत्तपत्रांनीही असे मानस घडवण्यात भूमिका पार पाडावी. excuses मागण्याची हाडीमासी खिळलेली सवय मोडून काढलीच पाहिजे.
- श्रीपाद कोठे
२८ ऑगस्ट २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा