स्वामी विवेकानंदांनी एक ग्रंथ लिहिण्याची तयारी केली होती. त्यासाठी ४२ मुद्देही त्यांनी काढले होते. ग्रंथाच्या प्रारंभीची एक छोटीशी प्रस्तावनाही त्यांनी लिहिली होती. त्या प्रस्तावनेत राजकारण आणि भारताचे जीवितकार्य याबद्दल आवेशपूर्ण शब्दात ते लिहितात- `हे पवित्र आर्यभूमी ! तुझे कधीच अध:पतन झाले नाही. राजदंडांचे तुकडे तुकडे झाले, ते इतस्तत: फेकले गेले, सत्तेचा कंदुक अनेकवार या हातातून त्या हातात असा फिरत स्थानांतर करीत राहिला. परंतु भारतात राजे व त्यांचे दरबार यांचा नेहमी फार थोड्या लोकांवर प्रभाव पडला. उच्चतम श्रेणीपासून तो सर्वात खालच्या श्रेणीपर्यंतचे बहुसंख्य लोक आपापले अनिवार्य मार्ग स्वतंत्रपणे चोखाळीत आले आहेत. राष्ट्रीय जीवनाचा प्रवाह कधी मंदपणे व अर्ध्यामुर्ध्या जाणीवेनिशी, तर कधी प्रबलपणे व संपूर्ण जागृतीनिशी वाहत आला आहे. शेकडो शतकांच्या अखंड उज्ज्वल मालिकेपुढे मी विस्मयचकित आणि स्तंभित होऊन उभा आहे. या मालिकेचा एखादा दुवा अधूनमधून अंधुक दिसतो, तर त्याच्याच पुढचा दुवा दुप्पट तेजाने उजळलेला दिसतो; आणि या सगळ्यांमध्ये माझी मातृभूमी धीरगंभीरपणे पावले टाकीत, पशुमानवाला देवमानवात परिवर्तीत करण्याचे आपले गौरवशाली भवितव्य पूर्ण करण्यासाठी चाललेली मला दिसत आहे. पृथ्वीवरील वा स्वर्गातील कोणतीही शक्ती तिला या कार्यात रोधू शकत नाही.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा