पेढे छानशा सुबक, सुंदर डब्यात आहेत; की साध्या कागदात बांधलेले... मला फारसा फरक नाही पडत. माझं लक्ष असतं पेढ्यावर. ते छान हवेत. चविष्ट, ताजे (अन भरपूर असले तर उत्तमच) इत्यादी. ते कोणत्या दुकानातले आहेत हे किंवा इतर तपशील गौण वाटतात मला. आवरण आणि तपशील छान असावं, आकर्षक असावं, नेमकं अन नेटकं असावं याला माझा विरोध मुळीच नाही. पण त्यासाठी अति आग्रह अन पेढ्यांकडे थोडं दुर्लक्ष, हे काही पटत नाही. घरचे प्रसंग, घटना, मित्र, संस्था किंवा अन्यत्र सुद्धा असंच. एवढं कशाला लेखनात, भाषणात वगैरेही गाभा महत्वाचा, आशय महत्वाचा वाटतो. तपशील दुय्यम असा त्याचा अर्थ नाही, पण तपशील उन्नीस-बीस झाला तरी आभाळ कोसळत नाही ही भूमिका. एकूण विवेचनातून काय सांगायचे आहे त्याला प्राधान्य, त्याला महत्व. तपशील बदलला तरीही आशय बदलण्याचे काम पडणार नाही इतकं तलस्पर्शी असावं. बाकी तपशील वा आवरण महत्वाचे असले तरीही दुसऱ्या स्थानावर.
कोणास ठावूक हे चांगले आहे की नाही ते...
- श्रीपाद कोठे
८ ऑगस्ट २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा