- केरला स्टोरीवर अजून चर्चा सुरू आहेच पण सुरुवातीचा धुरळा थोडा खाली बसला आहे. त्यामुळे काही मुद्दे.
- अशा प्रकरणांची संख्या किती? ३२ हजार, ३२ शे, ३२, ३, २??
- हे एकच प्रकरण असेल तरीही ते गंभीरच आहे. अन् एखाद्याच प्रकरणावर चित्रपट निघाले आहेत आणि त्यावर समाज ढवळून टाकणारी चर्चाही झाली आहे.
- या समस्येचे स्वरूप हिंदू मुस्लिम असले तरीही ते त्याचे एकमेव रूप नाही. त्याला अन्यही कोन आहेत. सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार हवा.
- माणसांची ओळख पुसून टाकणारी अवाढव्य शहरांची संस्कृती. यात कोणी कोणाचं नसतं हे तर खरंच पण कोण येतं, कोण जातं, कोण नाहीसं होतं इत्यादी गोष्टी माहिती सुद्धा होत नाहीत. त्याबद्दल संवेदना असणं दूरच. शहरांच्या या बेगुमान वाढीवर नियंत्रण आणण्याचा मुद्दा या निमित्ताने पुढे यायला हवा.
- आजच्या असंख्य समस्या या व्यक्तीवादाच्या समस्या आहेत. यात व्यक्तीचं स्वातंत्र्यदेखील अध्याहृत आहे. त्यावर आगपाखड केल्याने काही होणार नाही. ओरडणारे ओरडत राहतील आणि काळाचा प्रवाह वाहत राहील. बाह्य नियंत्रणाची सगळीच व्यवस्था हळूहळू खिळखिळी होत आहे. यात कुटुंब हा घटक सुद्धा येतो.
- याला उत्तर देण्यासाठी आत्मनियंत्रण महत्त्वाचे ठरते. परंतु ते साध्य कसे होणार? त्यासाठी माझे उत्तर माझ्याकडे हवे. माझे उत्तर दुसऱ्या कोणाकडे किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीत/ पुस्तकात/ शास्त्रात असून चालणार नाही. माझे मला मी समाधानकारक उत्तर देऊ शकलो तर आत्मनियंत्रण शक्य होईल.
- त्यासाठी भारतीय आध्यात्मची तात्विक बाजू अधिक जोरकसपणे पुढे यायला हवी. त्यावर सतत चर्चा होत राहायला हवी. ते माणसांच्या मनात रुजत जायला हवे.
- दुर्दैवाने आज हिंदू समाज अधिक कर्मकांडी होऊ लागला आहे. त्याचे जोरकस समर्थनही केले जाते. कर्मकांड हे अधिक अमूर्त गोष्टी जीवनात रुजवण्यासाठी आहे याचा विसर पडतो आहे. त्यामुळे हे कर्मकांड काय किंवा दुसरं कोणतं कर्मकांड काय, असा विचार कोणी केला तर त्याला काहीही उत्तर नाही.
- जीवनातील श्रेयस रुजवण्याची किंवा समजावण्याची शक्ती तात्विक विचारात असते. कर्मकांडात नसते.
- जीवनाचे भय, अरे ला कारे करणे; या गोष्टींची मर्यादा असते. त्याहून अधिक ठोस आधार कसा देता येईल यावरही मंथन हवे. सारासार विचार करण्याची सर्वत्रिक शक्ती वाढायला हवी.
- याच केरळात सगळ्यात श्रीमंत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. त्याची तिजोरी उघडायची की नाही इथपासून सुरुवात होते. बहुसंख्य हिंदू समाज अनिष्ट अशीच भूमिका घेतो. देशभरातील मंदिरांच्या या संपत्तीचा उपयोग; हिंदू समाज अंतर्बाह्य, लौकिक, वैचारिक, भावनिक, आध्यात्मिक दृष्टीने बलवान करण्यासाठीचे प्रयत्न तोकडे का असावेत?
- शेगावच्या गजानन महाराज मंदिरात वाढणाऱ्या गर्दीने कसे प्रश्न निर्माण होत आहेत यावर तीन लेख नुकतेच वाचले. हिंदू समाजासाठी हे चिंतनाचे विषय व्हायला हवे.
- सद्भावांची शक्ती वाढायला हवी. सद्भावनांच्या पताका खांद्यावर घेणाऱ्या झुंडीची नव्हे.
- स्वामी विवेकानंद म्हणत असत : ज्याला जग हिंदूंचा दुबळेपणा म्हणतं तीच हिंदूंची शक्ती आहे. हिंदू भाव/ विचार हा दवबिंदूप्रमाणे परिवर्तन घडवून आणतो.
- हिंदूंच्या या पद्धतीच्या विरुद्ध वागणारे जगातून संपून गेले. हिंदूंनी नुकसान सहन केले असले तरीही ते संपले नाहीत.
- सर्वंकष विचार होत राहायला हवा.
- श्रीपाद कोठे
१६ मे २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा