बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

लोक प्रतिनिधी

निवडणुका जिंकण्यासाठी सवलती, योजना वगैरे सगळे पक्ष करतात, करतील. परंतु : निवडून आलेल्या आमच्या प्रतिनिधीची संपत्ती त्याच्या कार्यकाळात एक पैसाही वाढणार नाही; असं मात्र कोणीही सांगू शकत नाही. असं आश्वासन देऊ शकत नाही. असे आश्वासन देऊन बहुमताने निवडून येण्याची खात्री असली तरीही.

(टीप - असं केल्याने कोणीही लोक प्रतिनिधी रस्त्यावर वगैरे येणार नाहीत.)

अर्थात व्यक्तिगत अधिकार, मूलभूत अधिकार वगैरे विद्वत्ता सगळे शिकवू शकतातच.

अंतराळ वीर

अमेरिकेने चंद्रावर खरंच यान पाठवलं होतं का? या चर्चेच्या संदर्भात एक तर्क (तसे बरेच पण हा विशेष) वाचनात आला की, त्या यानासोबत गेलेले अंतराळवीर पृथ्वीवर परत कसे आले? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती बाहेर त्यांना पाठवायला रॉकेट वगैरे सोडावे लागले. चंद्रावरून परत पृथ्वीच्या कक्षेत त्यांना ढकलायला कोणी, कुठून आणि कसे रॉकेट सोडले असेल? किंवा काय प्रक्रिया असावी?

जिब्रान

'निष्क्रिय असणे म्हणजे; अनंताच्या प्रवासाला निघालेल्या जीवनाच्या देखण्या शोभायात्रेतून बाहेर पडणे होय. तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही; तासांच्या कुजबुजीला संगीतात परिवर्तित करणाऱ्या हृदयाची बासरी असता. काम करावे लागणे म्हणजे शाप व दुर्दैव नसून; तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही; पृथ्वीच्या स्वप्नाचा जन्म झाला त्याच क्षणी, तुम्हाला सोपवण्यात आलेली त्या स्वप्नपूर्तीतील जबाबदारी पार पाडत असता.'

- खलील जिब्रान

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

दर्जा आणि प्रमाणीकरण

डॉक्टरांनी generic औषधेच लिहून द्यावीत हा आदेश national medical commission ने मागे घेतला. यामागे औषध कंपन्यांची लॉबी नसेल का? या आदेशात केवळ जेनरिक औषधे लिहावी एवढेच नव्हते तर डॉक्टरांनी औषध कंपन्यांच्या कॉन्फरन्स आदींना जाऊ नये असेही आदेश होते. वैद्यकीय व्यवसायातील सध्याची व्यापारी वृत्ती लोकांना दिवसेंदिवस त्रासदायक होत असताना हा आदेश मागे घ्यावा लागणे हे दुर्दैवी आहे.

हा आदेश मागे घ्यावा यासाठी Indian Medical association आणि औषध निर्माण कंपन्या यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्याची भेट घेतली. त्या भेटीत झालेल्या चर्चेत औषधांचा दर्जा हा मुद्दा मांडण्यात आला आणि आदेश मागे घेण्यात आला. मी या विषयातला तज्ञ नाही. अभ्यासक देखील नाही. परंतु नेहमीच सतावणारा एक सामान्य प्रश्न याही निमित्ताने मनात आला की, दर्जा (quality), प्रमाणीकरण (standardization) या गोष्टी आपापली पोतडी भरण्यासाठी वापरल्या जातात का? हे केवळ औषधी या विषयापुरतेच नाही. अन्न, औषधी, शिक्षण, विभिन्न उद्योग, वस्तू, सेवा अशा अनेक बाबतीत दर्जा आणि प्रमाणीकरण हे लोकांना लुबाडण्याचे साधन झालेले नाही का? कालच बिहारमध्ये शिक्षक भरतीसाठी देशभरातून जी प्रचंड गर्दी उसळली आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाची जी चर्चा सुरू आहे; त्यालाही हा मुद्दा लागू होतो.

शिवाय प्रमाण वा दर्जा नेमका ठरवायचा कसा आणि कोणी? आणि हा दर्जा निश्चित केल्यावर सुद्धा अपेक्षित परिणामांची शंभर टक्के खात्री देता येईल का? अत्यंत चोख दर्जेदार औषधे घेतल्यावर माणूस मरण पावणार नाही किंवा नेमके डोज घेतल्यावर perfectly fit होईल याची खात्री देता येईल का? खाद्य पदार्थात मीठ, साखर, तिखट इत्यादी गोष्टी एकदम दर्जेदार आणि प्रमाणात असतील तर त्याची चव उत्कृष्टच राहील आणि सगळ्यांना आवडेल; तसेच त्याने काडीचाही अपाय होणार नाही याची खात्री देता येईल का? शिक्षक सगळ्या मापदंडावर तंतोतंत बसत असेल तर विद्यार्थी अगदी बृहस्पतिचा अवतार होतील असे सांगता येईल का? अचूक कायदे आणि त्यांची कठोर अंमलबजावणी याने समाजातील दुष्ट वृत्ती नाहीशा होतील अशी खात्री देता येईल का?

मूळ प्रश्न हा की, दर्जेदार (म्हणजे काय ते सोडून देऊ) input आणि तेवढाच दर्जेदार output यांचा संबंध किती आणि कसा असतो? याचा अर्थ दर्जा, प्रमाण नकोत असे नाही. परंतु त्याचाही विचार तारतम्याने करावा लागतो. Over stretching ही चांगली गोष्ट तर नाहीच पण तिचा वापर स्वार्थ, अनैतिकता, शोषण यासाठी केला जातो. परिणाम हा केवळ input वर अवलंबून नसतो. क्रिया सिद्धी: सत्वे भवती महतां नोपकरणे. एखाद्या क्रियेची सिद्धी उपकरणांवर नाही तर सत्वावर अवलंबून असते.

टीप : औषधांच्या पाकिटावर त्याचा net उत्पादन खर्च लिहिणे बंधनकारक करून नफा किती घ्यावा याला कायदेशीर बंधन घालावे. परिषदा आणि अभ्यास इत्यादींना उत्पादन खर्च आणि फायदा यात जागा देऊ नये. फक्त एवढं केलं तरी सगळा तमाशा बंद होईल.

#श्रीपाद कोठे

२५ ऑगस्ट २०२३

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

उर्मट भुजबळ

मा सरस्वतीने किती शाळा काढल्या असा उर्मट सवाल करणाऱ्याला खडे बोल ऐकवायलाच हवेत. विशेषत: अशी वटवट करणारी व्यक्ती उच्चपदस्थ असेल तेव्हा. अहो भुजबळ साहेब, तुम्ही समाजाचं दुर्दैव आहात. सावित्रीबाई महान आहेतच कारण त्यांच्या ठायी संघर्ष करण्यासोबतच कृतज्ञ बुद्धी होती. आपल्याला शाळा काढण्याची बुद्धी माता सरस्वतीनेच दिल्याची कृतज्ञ जाणीव त्यांच्या ठायी होती. तुम्हाला मात्र सरस्वतीने कृतज्ञ बुद्धी दिली नाही. खूप मोठं होऊन सुद्धा कृतज्ञ असणं हेच मोठेपणाचं लक्षण असतं. तुमच्या ठायी कृतज्ञते ऐवजी कृतघ्नताच ठासून भरली आहे. माता सरस्वतीची उपासना केल्याशिवाय कृतज्ञता प्राप्त होत नाही. अन् ती नसल्यामुळे तुम्ही खूप लहानच नाही क्षुद्र झाला आहात. बाकी तुमच्या मनातलं जातीयवादाचं डबकं इतकं घाण आणि कुजलेलं आहे की त्याच्या जवळून सुद्धा कोणी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याची गरजच नाही.

- श्रीपाद कोठे

२० ऑगस्ट २०२४

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

अखंड भारत

अखंड भारत ही भौगोलिक आणि प्रशासकीय कल्पना नाही. भौगोलिक आणि प्रशासकीय एकत्व (अखंडता) हा अखंड भारत या कल्पनेच्या परिणाम असेल. शिवाय अखंड भारत म्हणजे हिंदू मुसलमान समस्या नाही. श्रीलंका, ब्रम्हदेश आदी मुस्लिमांमुळे भारताबाहेर गेले नाहीत. तसेच सातव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत हिंदू मुसलमान संघर्ष या देशात सुरू होता. तरीही भारत खंडित झाला नाही. याचा खोलवर विचार करावा लागतो. अखंड भारत ही एक मानसिक अवस्था आहे. भौगोलिक व प्रशासकीय एकत्व हा त्याचा परिणाम असेल.

#श्रीपाद कोठे

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

मनोबौद्धिक उत्क्रांती

ज्यांना राजकारण करायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना समाजकारण करायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना अर्थकारण करायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना अध्यात्मिक जीवन जगायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना फक्त विज्ञान मान्य आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना संघर्ष करायचा आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना संघर्ष टाळायचा आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना समन्वय करायचा आहे किंवा त्यातच रुची आहे...

अशा प्रत्येकाची विचार आणि व्यवहाराची पद्धत वेगवेगळी असते. त्यांचे त्यांचे विचार आणि व्यवहार वेगवेगळे असतात. दुर्दैवाने बहुसंख्य माणसे हे समजून न घेता; बाकीच्यांना नावे ठेवण्यात, बाकीच्यांची टवाळी करण्यात, बाकीच्यांना निरर्थक ठरवण्यात, बाकीच्यांना चुकीचे ठरवण्यात, बाकीच्यांना शत्रू ठरवण्यात, बाकीच्यांना जबाबदार ठरवण्यात; धन्यता मानतात. पूर्वी यासाठी प्रत्यक्ष शारीरिक संघर्ष माणसे करत असत. त्यानंतर शस्त्रांचा वापर करत असत. आता बुद्धीचा वापर करू लागली आहेत. या संघर्षात (शारीरिक, शस्त्रांचा, बौद्धिक) जो जिंकला त्याचे म्हणणे योग्य, स्वीकार्य असेही माणूस समजत होता, अजूनही समजतो.

परंतु संघर्षातला हा विजय हे योग्य अयोग्य ठरवण्याचे मोजमाप नाही असं वाटणारा एक क्षीण प्रवाह सुद्धा प्राचीन काळापासूनच चालत आलेला आहे. तो आजही आहे. या क्षीण प्रवाहानेच आपले अस्तित्वही न जाणवू देता माणसात मनोबौद्धिक उत्क्रांती घडवली आहे. माणसाला त्याचे मानव्य बहाल केले आहे.

- श्रीपाद कोठे

११ ऑगस्ट २०२३

बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

नरेंद्र दत्त आणि विवेकानंद

लोकसभेत आज झालेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत द्रमुक पक्षाचे टी. आर. बालू बोलले. ते जे काही बोलले त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. परंतु त्यांनी केलेला एक उल्लेख मात्र खटकला आणि योग्य वाटला नाही. आपल्या भाषणात त्यांनी नरेंद्र दत्त यांची विधाने उद्धृत केली. श्री. बालू आणि त्यांचा पक्ष यांचा धर्म, अध्यात्म इत्यादी गोष्टींना विरोध असू शकतो पण जग ज्या नरेंद्र दत्त यांना स्वामी विवेकानंद म्हणून ओळखतं त्यांचा विवेकानंद म्हणून उल्लेख न करणे अनुचित तर आहेच पण अवमान करणारेही आहे. याचे कारण म्हणजे स्वामीजी संन्यासी होते. संन्यासी परंपरेत आधीचे नाव विसर्जित झालेले असते. तसेच स्वामीजींचे नरेंद्र दत्त हे नाव विसर्जित झाले होते. ती फक्त एक मृत माहिती आहे. द्रमुक पक्ष आणि श्री. बालू यांना या संन्यासी परंपरेबद्दल श्रद्धा नसू शकते. त्यांना श्रद्धा असायलाच हवी असेही नाही पण त्याबद्दल आदर नसावा आणि सौजन्य नसावे हे त्यांचे खुजेपण दाखवणारे आहे. एवढाच तिरस्कार मनात असेल तर त्यांची विधाने आधाराला तरी का घ्यावीत?

- श्रीपाद कोठे

८ ऑगस्ट २०२३