शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

मनोबौद्धिक उत्क्रांती

ज्यांना राजकारण करायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना समाजकारण करायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना अर्थकारण करायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना अध्यात्मिक जीवन जगायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना फक्त विज्ञान मान्य आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना संघर्ष करायचा आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना संघर्ष टाळायचा आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना समन्वय करायचा आहे किंवा त्यातच रुची आहे...

अशा प्रत्येकाची विचार आणि व्यवहाराची पद्धत वेगवेगळी असते. त्यांचे त्यांचे विचार आणि व्यवहार वेगवेगळे असतात. दुर्दैवाने बहुसंख्य माणसे हे समजून न घेता; बाकीच्यांना नावे ठेवण्यात, बाकीच्यांची टवाळी करण्यात, बाकीच्यांना निरर्थक ठरवण्यात, बाकीच्यांना चुकीचे ठरवण्यात, बाकीच्यांना शत्रू ठरवण्यात, बाकीच्यांना जबाबदार ठरवण्यात; धन्यता मानतात. पूर्वी यासाठी प्रत्यक्ष शारीरिक संघर्ष माणसे करत असत. त्यानंतर शस्त्रांचा वापर करत असत. आता बुद्धीचा वापर करू लागली आहेत. या संघर्षात (शारीरिक, शस्त्रांचा, बौद्धिक) जो जिंकला त्याचे म्हणणे योग्य, स्वीकार्य असेही माणूस समजत होता, अजूनही समजतो.

परंतु संघर्षातला हा विजय हे योग्य अयोग्य ठरवण्याचे मोजमाप नाही असं वाटणारा एक क्षीण प्रवाह सुद्धा प्राचीन काळापासूनच चालत आलेला आहे. तो आजही आहे. या क्षीण प्रवाहानेच आपले अस्तित्वही न जाणवू देता माणसात मनोबौद्धिक उत्क्रांती घडवली आहे. माणसाला त्याचे मानव्य बहाल केले आहे.

- श्रीपाद कोठे

११ ऑगस्ट २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा