शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

योग

तोंडावर (खाणे आणि बोलणे दोन्हीसाठी) नियंत्रण हे योगाचं केवळ लक्षण नाही तर तो योगाचा आधार आहे आणि सर्वस्व देखील. याचा विसर पडू नये. योग्यांना आणि योग मानणाऱ्या व्यक्तींना, समूहांना, समाजाला. भारतीय अथवा हिंदू विचार योगभ्रष्ट कल्पना अधिकृतपणे मान्य करते. धैर्य, कणखरपणा यासाठी भारतीय किंवा हिंदू विचारांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. हा लौकिक टिकून राहायला हवा. टिकवायला हवा.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०२२

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

आंबेडकर म्हणतात -

मनाचे स्थैर्य आणि नीरक्षीरविवेक म्हणजे काय याचा उत्तम नमूना-

`मै मानता हूँ की, इस मुद्दे पर कोई विवाद नहीं हो सकता है की, अचल संपत्ति के बंटवारे पर नियंत्रण अपनाया जाता है तो, हमारी कृषि पर आधारित जनसंख्या का बड़ा हिस्सा भूमिहीन हो जायेगा. यह देश के सर्वाधिक हित में नहीं है की, गरीब तबकों को इस ढंग से और गरीब कर दिया जाए. महोदय, मै यह बताना चाहता हूँ की, यद्यपि हिन्दू कानून कई तरह से बहुत त्रुटीपूर्ण है, तथापि उत्तराधिकार का हिन्दू कानून लोगों का बहुत बड़ा रक्षक रहा है. हिन्दू धर्म द्वारा स्थापित सामाजिक और धार्मिक एकछत्रवाद ने लोगों के एक बहुत बड़े वर्ग को निरंतर दासता में जकड़े रखा है. यदि इस दासता में भी उनकी दशा सहनीय है तो इस कारण से की, उत्तराधिकार के हिन्दू कानून ने कुबेरपतियों के निर्माण को रोका है. महोदय, हम सामाजिक दासता को आर्थिक गुलामी से नहीं जोड़ना चाहते. यदि आदमी सामाजिक रूप से स्वतंत्र नहीं है, तो उसे आर्थिक रूप से स्वतंत्र होने दीजिए. इसलिए मै उस न्यायपूर्ण और उत्तराधिकार की समतामूलक व्यवस्था को समाप्त करने के पूर्णतया खिलाफ हूँ.' (डॉ. आंबेडकर समग्र साहित्य, खंड ३, पृष्ठ १४८- मुंबई विधिमंडळात १० ऑक्टोबर १९२७ रोजी `छोटे किसान राहत विधेयक' यावर केलेले भाषण)

या छोट्याशा वेच्यावर स्वतंत्रपणे लिहिता येईल. ते पुन्हा केव्हा तरी.

#श्रीपादचीलेखणी

रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

स्थिरता

शहीद संतोष महाडिक याच्या अंत्य संस्काराचं प्रक्षेपण सुरु होतं. लोक घोषणा देत होते. संतोषची पत्नी, मुले यांचं धीरोदात्त वागणं दिसत होतं. अन मध्येच ब्रेक झाला. डोळ्यासमोर पायऱ्यांवरून उतरणारी हिरो सायकल, मराठी तारकेच्या अदा अन असंच काहीबाही दिसू लागलं. आपण सगळेच असे प्रकार रोज अनुभवतो. वर्तमान काळाची ती ओळखच झाली आहे. असंख्य प्रतिमांचा मारा अखंडपणे, अनावश्यकपणे अन अविचारीपणे चाललेला असतो. एखाद्या प्रतिमेचा मनावर परिणाम होण्याआधीच तो पुसला जातो. एखादी कृती वा आकृती, एखादी भावना वा विचार मनात, बुद्धीत स्थिर होण्यापूर्वीच पुसून टाकले जाते. विशिष्ट गोष्ट मनबुद्धीत रुजणे वगैरे तर दूरच. स्थिरता ही जणू खूप चुकीची गोष्ट आहे असेच वर्तन दिसून येते. यामुळे चटकदार, नावीन्यपूर्ण परंतु विरविरीत, भुसभुशीत, ठिसूळ जीवन आकाराला येते आहे.

काहीतरी धडा शिकवण्याचे काळाच्या मनात असेल.

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०१५

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

शिकार?

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर बरीच चर्चा सुरू आहे. त्यात एक प्रतिक्रिया आहे की, शिकार करण्यासाठी कधीकधी दोन पावलं मागे जावं लागतं. काय होतो या प्रतिक्रियेचा अर्थ? कृषी कायदे हा राजकीय धोबीपछाड देण्याचा विषय होता वा आहे का? कोणाची शिकार करायची आहे? शेतकऱ्यांची शिकार करायची आहे असा युक्तिवाद तर कोणीच करणार नाही. (कोणाच्या मनात असेल तरीही.) मग एकच पर्याय उरतो, तो म्हणजे विरोधकांची. कृषी कायद्यांचा हाच आशय असेल तर त्याची सगळी बैठकच मोडीत निघते. भाजपला सगळ्यात अडचणीचे ठरते आहे ते त्याचे प्रचार तंत्र. भाजपचा, त्याच्या नेत्यांचा, त्याच्या धोरणांचा, त्याच्या निर्णयांचा; जो अनावश्यक, आक्रस्ताळा, अप्रमाण, कधीकधी उन्मादी प्रचार असतो; तो अतिशय घातक आहे. हे लक्षात का येत नसावे हा प्रश्नच आहे. या प्रचारतंत्रात योजना किती आणि उत्स्फूर्तता किती यावर वाद घालत येईल. पण तो मर्यादेत, शालीन आणि आवश्यक तेवढाच असायला हवा हे मात्र निश्चित. पानटपरीवरच्या किंवा कॉलेज कट्ट्यावरच्या भांडणांसारखे वाद करून राजकारणही करता येत नाही आणि समाजही चालू शकत नाही; हे उमगेल तो सुदिन.

- श्रीपाद कोठे

१९ नोव्हेंबर २०२१

काय चुकलं?

चिडलेल्या, त्रासलेल्या, वैतागलेल्या, उबलेल्या माणसाला सबुरीच्या अन समजावणीच्या गोष्टी सांगू नयेत. ते क्रौर्य आणि अपरिपक्वता असते. बहुतेक माणसे तेच करतात अन मग विचारतात - 'मी काय चूक केली?' कारण संवादाचं एकच माध्यम आहे असा अजूनही बहुसंख्य माणसांचा समज आहे. बोलणे, सांगणे, विचारणे यापेक्षा वेगळ्या पध्दतीचे communication असू शकते याचा गंधच नसतो. अन असा वेगळा काही मार्ग असतो हे ऐकून/ वाचून माहिती असले तरीही, तो अवगत नसतो. खरं तर communication त्याच्या तंत्रात नाहीच, संवादाची मुळं, संवादाची सुरुवात मनात होत असते. स्वतःच्या आणि ज्याच्याशी संवाद करतो आहे त्याच्या, अशा दोन्ही मनांच्या मुळाशी पोहोचू शकणाराच प्रभावी आणि परिणामकारक संवाद करू शकतो. नुसतं मनानी चांगलं असणं, कळकळ बिळकळ असणं पुरेसं नसतं. या अंगाने पुष्कळदा जाणवतं की माणूस psycho- socio- cultural evolution च्या संदर्भात अजूनही पुष्कळ प्राथमिक स्तरावरच आहे.

- श्रीपाद कोठे

१९ नोव्हेंबर २०१७

पुरुष दिन

आज पुरुष दिवस असल्याची एक पोस्ट दिसली. थोडं आश्चर्यच वाटलं. कारण आजकाल कोणताही दिवस असला तर सकाळी हाती पडणाऱ्या वृत्तपत्रापासून त्याची माहिती मिळायला सुरुवात होते आणि मग फेसबुक, whats app, अन गेला बाजार वृत्तवाहिन्या त्याच्या कौतुकात बुडून गेलेले दिसतात. कविता, कथा, तक्रारी, कौतुके, प्रमाणात किंवा प्रमाणाबाहेर - खरी किंवा खोटी- गाऱ्हाणी; असं एरव्ही दिसणारं चित्र काही दिसलं नाही. लिहिताना सगळेच `डेज' डोळ्यापुढे आहेत. खरं तर इच्छाही नाही, पण महिला हा विषय नाईलाजाने लिहावा लागेल. कारण पुरुष दिवस आहे. तर महिला दिनाला शुभेच्छा आदी; त्याही फुगे- फुले- इत्यादी इत्यादीची फोडणी देऊन; न चुकता देणारे पुरुष संख्येने महिलांपेक्षा अधिकच दिसतात. ते ओळखीची महिला, अनोळखी महिला असाही भेद फारसा करीत नाहीत. पण आजच्या पुरुष दिनाला शुभेच्छा आदी- कोरड्या का असेना- देणारा महिला वर्ग मात्र दिसला नाही. ओळखीच्यांनाच नाही तर अनोळखी पुरुषांचे काय घेऊन बसलात? अन कोरड्या शुभेच्छा नाहीत, तिथे कौतुक, कथा, कविता, गाऱ्हाणी, तक्रारी वगैरे वगैरेचे काय?? नाही म्हणायला अलिबागच्या जगप्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर आणि नागपूरच्या फुटाळा चौपाटीवर कोण्या संस्थेने सर्व्हे केला म्हणे- आजचा पुरुष दिवस कोणाकोणाला माहीत आहे याचा. सर्व्हे करणाऱ्या लोकांची संख्या माहिती असणाऱ्या लोकांपेक्षा जास्तच होती म्हणतात. सर्व्हेची बातमी कानावर आलेली आहे. खातरजमा केलेली नाही. पण सूत्र विश्वसनीय आहेत. तर, या पुरुष दिनाच्या पाचा उत्तरी कहाणीतून काहीही सुचवायचे नाही. मात्र कोणी आपापले अर्थ काढले तर त्यालाही काहीच हरकत नाही. 🤣🤣

- श्रीपाद कोठे 

१९ नोव्हेंबर २०१७

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

कालच्या दुर्दैवी घटनेबद्दल...

- एखाद्या वाईट, हिणकस, बीभत्स गोष्टीचे किंवा घटनेचे साग्रसंगीत वर्णन चघळत बसू नये. त्याने झालं तर नुकसानच होतं.

- आजकाल तर अशा घटना लगेच व्हायरल होतात. त्यामुळे कालची घटना, चर्चित घटना, वादग्रस्त घटना - विधान; असे उल्लेख असावेत. ज्यांना कळणार नाही वा ठाऊक नसेल; त्या सगळ्यांना त्याबद्दल सांगण्याची गरज नसते. त्यांचे त्यांनी पाहून घ्यावे. सगळ्या जगाला तपशीलवार सांगण्याची जबाबदारी स्वतःवर ओढून घेऊ नये.

- कालची घटना ऐहिकतेवर आधारित आत्यंतिक व्यक्तीवादाचा परिणाम आहे. ऐहिकता यात पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक, राजकारण, आनंद पुरुषार्थ इत्यादी कल्पना, असंख्य मानसिक गोष्टी, बौद्धिक उन्मत्तता, चांगले आणि वाईट दोन्हींचा अहंकार; अशा सगळ्या गोष्टी येतात.

- गुण, अवगुण इत्यादींचे गटश: वर्गीकरण न करता; गुणपूजा, गुणग्राहकता यांची चर्चा समाजात सकारात्मक वातावरण तयार करते याचं भानही असायला हवं.

- कालची घटना विचारी माणसाला हतबुद्ध करणारी, दुःखद, संताप आणणारी, समाजाला लाजिरवाणी, त्रिवार निषेध करावा अशी आहे.

- श्रीपाद कोठे

१४ नोव्हेंबर २०२२

(प्रेयसीची हत्या)

श्रद्धा प्रकरणी खूप चर्चा सुरू आहे. लव्ह जिहादपासून; तर संस्कार, जीवनशैली, स्वातंत्र्य, जीवनमूल्ये, कायदे इत्यादी इत्यादी. मात्र हा सगळा विचार करताना आजची आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था आणि रचना यांच्या भूमिकांची चर्चा मात्र होत नाही. आजच्या व्यवस्थेत - विचारांचा अवकाश, संस्कार रुजण्यासाठीचा अवकाश, समज वाढेल असे वातावरण, गुन्हे आणि वाईट गोष्टी लक्षात येतील एवढा भौगोलिक आणि अन्य आवाका, ओळखी आणि ओळख होण्याच्या शक्यता, लपवाछपवीच्या किमान संधी; हे सगळं शक्य आहे का? अभिनिवेश, राग, दुःख, धुंदी बाजूला सारून यावर शांतपणे विचार करायला हवा. चांगल्या, सुरक्षित आणि संघर्षविहीन जगण्यासाठी विद्यमान सामाजिक, आर्थिक, राजकीय रचनाच मुळातून बदलायला हवी आहे. त्याचा विचार कोण आणि केव्हा करणार?

- श्रीपाद कोठे

१७ नोव्हेंबर २०२२