- एखाद्या वाईट, हिणकस, बीभत्स गोष्टीचे किंवा घटनेचे साग्रसंगीत वर्णन चघळत बसू नये. त्याने झालं तर नुकसानच होतं.
- आजकाल तर अशा घटना लगेच व्हायरल होतात. त्यामुळे कालची घटना, चर्चित घटना, वादग्रस्त घटना - विधान; असे उल्लेख असावेत. ज्यांना कळणार नाही वा ठाऊक नसेल; त्या सगळ्यांना त्याबद्दल सांगण्याची गरज नसते. त्यांचे त्यांनी पाहून घ्यावे. सगळ्या जगाला तपशीलवार सांगण्याची जबाबदारी स्वतःवर ओढून घेऊ नये.
- कालची घटना ऐहिकतेवर आधारित आत्यंतिक व्यक्तीवादाचा परिणाम आहे. ऐहिकता यात पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक, राजकारण, आनंद पुरुषार्थ इत्यादी कल्पना, असंख्य मानसिक गोष्टी, बौद्धिक उन्मत्तता, चांगले आणि वाईट दोन्हींचा अहंकार; अशा सगळ्या गोष्टी येतात.
- गुण, अवगुण इत्यादींचे गटश: वर्गीकरण न करता; गुणपूजा, गुणग्राहकता यांची चर्चा समाजात सकारात्मक वातावरण तयार करते याचं भानही असायला हवं.
- कालची घटना विचारी माणसाला हतबुद्ध करणारी, दुःखद, संताप आणणारी, समाजाला लाजिरवाणी, त्रिवार निषेध करावा अशी आहे.
- श्रीपाद कोठे
१४ नोव्हेंबर २०२२
(प्रेयसीची हत्या)
श्रद्धा प्रकरणी खूप चर्चा सुरू आहे. लव्ह जिहादपासून; तर संस्कार, जीवनशैली, स्वातंत्र्य, जीवनमूल्ये, कायदे इत्यादी इत्यादी. मात्र हा सगळा विचार करताना आजची आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था आणि रचना यांच्या भूमिकांची चर्चा मात्र होत नाही. आजच्या व्यवस्थेत - विचारांचा अवकाश, संस्कार रुजण्यासाठीचा अवकाश, समज वाढेल असे वातावरण, गुन्हे आणि वाईट गोष्टी लक्षात येतील एवढा भौगोलिक आणि अन्य आवाका, ओळखी आणि ओळख होण्याच्या शक्यता, लपवाछपवीच्या किमान संधी; हे सगळं शक्य आहे का? अभिनिवेश, राग, दुःख, धुंदी बाजूला सारून यावर शांतपणे विचार करायला हवा. चांगल्या, सुरक्षित आणि संघर्षविहीन जगण्यासाठी विद्यमान सामाजिक, आर्थिक, राजकीय रचनाच मुळातून बदलायला हवी आहे. त्याचा विचार कोण आणि केव्हा करणार?
- श्रीपाद कोठे
१७ नोव्हेंबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा