शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

भारत, अध्यात्म, संघ

आजची प्रबोधिनी एकादशी वाया जाऊ नये म्हणून... (तशी आपली रोजच प्रबोधिनी एकादशी असते. कधीतरी देवशयनी एकादशी व्हावी अशी अनेकांची इच्छा असली तरी ती काही येत नाही. 😃 तर असो...) विषयाकडे वळतो.

भारत म्हणजे काय? हा एक देश आहे. या देशात हजारो वर्षांपासून अनेक लोक राहत आले आहेत. त्यात ईश्वरवादी, निरिश्वरवादी, इहवादी, जडवादी सगळेच आहेत. सगळ्याच देशात असं असतं. अगदी मुस्लिम देशातही हे असंच असतं. या विविध लोकांनी मिळूनमिसळून राहणे, त्यासाठी एकमेकांचा आदर करणे, परस्परांना स्पेस देणे; देश म्हणून आवश्यक असते.

******************

उपासना म्हणजे ढोबळ मानाने ईश्वराशी संबंध जोडणे. सगळ्या लोकांना याची गरज असेल असे नसते. सगळ्यांनी ईश्वराशी संबंध जोडायला हवा हेही आवश्यक नाही. ईश्वराशी संबंध जोडण्याची गरज कोणाला वाटावी आणि कोणाला नाही याची प्रेरणा सुद्धा तो ईश्वरच देतो. कोणीही त्याबाबत दुराग्रह करण्यात अर्थ नसतो. ईश्वराशी संबंध कसा जोडायचा याचीही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. माझीच पद्धत योग्य आणि अंतिम असं म्हणणं किंवा विशिष्ट मार्गाने आपल्याला बरं वाटतं किंवा चांगले अनुभव आले वगैरे म्हणून, बाकीच्यांनी त्याच मार्गाने यायला हवे, हे तर्क आणि शहाणपण दोन्हीला धरून नाही.

भारतात तर ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, राजयोग, तंत्र इत्यादी प्रमुख मार्ग आणि त्यांचे उपमार्ग विकसित झाले आहेत. सगळ्यांची गृहितके, सगळ्यांचे सिद्धांत, सगळ्यांच्या पद्धती सारख्या नाहीत. त्यामुळे त्या त्या मार्गाने जाणारे साचेबद्ध नसतात. त्यांच्या विचार, व्यवहारात साम्य नसते. याचा secularism वगैरेही काही संबंध नाही. Secularism हा शब्दही जन्माला येण्याच्या आधीपासून भारताची ही प्रकृती आहे. यात ईश्वराला मानायलाच हवे याचीही गरज नसते.

******************

कुंकू प्रकरणी शास्त्र इत्यादी फार आग्रहीपणे सांगून जे त्याबाबत आग्रही नाहीत ते कसे चुकीचे आहेत हे सांगितले जात आहे. या एकांगीपणासाठी दोन मुद्दे - 

१) प्रत्येकाने आपला मेंदू आपण म्हणतो तसाच पोसावा, हा नक्कीच हटवाद आहे. २) असंख्य अगदी असंख्य लोक (धार्मिक, संत महंत, सामाजिक कार्यकर्ते, सुधारक, जीवनाच्या असंख्य क्षेत्रातले cream; तेही भारतासह जगभरात) कपाळी कुंकू लावत नाहीत. ते निरर्थक झाले का? विज्ञान, शास्त्र वगैरे करताना विचारांना तिलांजली देऊ नये एवढंच.

प्रस्तुत विषयात आज गोळवलकर गुरुजी यांचंही नाव चर्चेत आलं आहे. पाश्चात्य पोशाख घालून होणाऱ्या विवाहाला गुरुजी जात नसत. मग त्यांचे अनुयायी प्रतीकांना महत्त्व का देत नाहीत? असा एकूण विषय. त्याबद्दल -

१) गुरुजी माझ्यासाठी पूजनीय आहेत. उद्या मी समजा - मला संघाशी देणेघेणे नाही या अवस्थेला पोहोचलो तरीही गुरुजी मला पूजनीयच असतील. तरीही मी म्हणेन की, गुरुजी स्थलकालाच्या अतीत नाहीत. एक पुण्यपुरुष, महान आत्मा म्हणून ते कालातीत आहेत पण विचार, आचार, अभिव्यक्ती या संदर्भात स्थळकाळाने बद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी अमुक केले वा म्हटले वा सांगितले ते नेहमीसाठी, सगळ्यांसाठी अनुकरणीय असे नाही. दुसरे म्हणजे गुरुजी अतिशय संतुलित असल्याने कुठे आग्रह धरायचा, कशाचा आग्रह धरायचा याचा उत्तम विवेक त्यांच्याकडे होता. विवाहात पाश्चात्य पोशाख नसावा याचा आग्रह धरताना, स्वतः नियमितपणे करत असलेल्या संध्येचा आग्रह मात्र त्यांनी कोणालाही कधी केला नाही. एवढेच नाही तर अप्रबुद्धांनी ज्यावेळी त्यांना म्हटले की, संघाने स्वयंसेवकांना संध्या शिकवायला हवी तेव्हा त्यांनी ती सूचना अयोग्य असल्याचे त्यांना सांगितले.

२) गुरुजींनी काही गोष्टींचा आग्रह धरला असेल तरीही त्या गोष्टींचा आग्रह नेहमीच धरायला हवा असे नाही. चालायला शिकताना जी बाबागाडी वापरतो ती धावू लागल्यावर टाकूनच द्यावी लागते. ज्या काळी गुरुजींनी पारंपरिक पोशाखाचा आग्रह धरला त्यावेळी हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचा विरुद्ध टोकाला गेलेला लंबक खेचून आणायचा होता. आज तो दुसऱ्या टोकाला जाऊ नये याची काळजी घेण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मांडणी बदलणे स्वाभाविक ठरते.

३) प्रतीके योग्य असली तरीही प्रतिकात अडकून संकुचित राहण्याचा दुराग्रह हास्यास्पद ठरतो. जीवनाचे प्रवाहीपण नाकारणे हा शहाणपणा नसतोच.

- श्रीपाद कोठे

४ नोव्हेंबर २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा