गौतम गंभीरने आपल्या खांद्याची दुखापत लपवली आणि देश मोठा की आयपीएल मोठे ही चर्चा सुरू झाली. `वेडपटपणाचा कळस' या दोन शब्दात त्याचे वर्णन करता येईल. ही चर्चा उत्पन्नच कशी होऊ शकते? निर्विवादपणे देश मोठा असेच त्याचे उत्तर राहायला हवे. दुर्दैवाने इतके स्पष्ट व निर्विवाद उत्तर आता मिळत नाही. आपलं क्रिकेटवेड हे आता विकृतीपर्यंत पोहोचलं आहे. जगभरातील १५०-२०० देशांपैकी ८-१० देशात खेळल्या जाणार्या क्रिकेटला आम्ही जागतिक वगैरे बनवलं आहेच. ज्या युरोपात त्याचा जन्म झाला तेथे इंग्लंडशिवाय कोणीही तो खेळत नाही. त्या व्यतिरिक्त इंग्लंडच्या गुलामगिरीत राहिलेले देश तो खेळतात. त्या गुलामीतून आम्ही बाहेर आलेलोच नाही. बरे एक खेळ म्हणून जरी विचार केला तरी समाजाचा वेळ, पैसा, विचारशक्ती, संकल्पना, व्यवहार, कामकाज, संसाधने या सार्यावर त्याचे जे विपरीत परिणाम होत आहेत त्याचे काय? अगदी आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यातही स्वदेश भावना जगात कुठेही लोप पावलेली नाही. हां कुठे कुठे ती क्षीण झाल्यासारखी दिसते. पण जिथे ती क्षीण झाल्यासारखी दिसते तिथे स्वार्थ प्रबळ आहे हेच दिसून येईल. आयपीएल बाबतही तेच खरे आहे. सारेच लोक सुखासाठी धडपडत असतात. क्रिकेटपटुही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. सारेच काही गांधी, सुभाष, सावरकर नसतात. हे अगदी १०० टक्के खरे आहे. गांधी, सुभाष, सावरकर शतकांमधून कधी तरी जन्माला येत असतात. पण सुखासाठी धडपडतानाही त्याची काही मर्यादा असायला हवी की नको? सुख या गोष्टीचं इतकं हपापलेपण माणसामध्ये निर्माण झालं आहे की, आपण त्याबाबतीत मुक्या प्राण्यांनाही केव्हाच मागे टाकलं आहे. क्षणभर ते बाजूला ठेवू. परंतु तथाकथित सुखासाठी जी सौदेबाजी आज सगळीकडे सुरू आहे तिला मर्यादा असलीच पाहिजे. असं म्हणतात की, दुसर्याचे नाक सुरू होते तिथे तुमच्या स्वातंत्र्याची मर्यादा संपते. देशाचा विचार, समाजाचा विचार जेथे येतो तेथे सुखाच्या सौदेबाजीची सीमारेषा असलीच पाहिजे आणि ती सीमारेषा ओलांडण्याची सूट कुणालाही असता कामा नये. कोणीही कितीही मोठा पैसेवाला, कोणीही कितीही मोठा उद्योगपती, कोणीही कितीही मोठा राजकारणी, कोणीही कितीही मोठा खेळाडू, कोणीही कितीही मोठा विचारवंत असो त्याला हे ठणकावून सांगायलाच हवे. पण हे ठणकावून सांगणार कोण? या महान राष्ट्रातील लहान माणसांनीच हे सांगायला हवे. अगदी अलीकडे जंतरमंतरवर थोड्या प्रमाणात या लहान माणसांनी हे सांगितले. हे मोठ्या प्रमाणावर आणि वारंवार घडायला हवे. मधेमधे येणारे सगळे अडथळे पार करण्याच्या जिद्दीसह.
-श्रीपाद कोठे
सोमवार, ३० मे २०११
सोमवार, ३० मे, २०११
शुक्रवार, २७ मे, २०११
मुंग्या बर्या
दोन मुंग्या समोरासमोर येतात ते आपण नेहमीच पाहतो. अन् दोन वाहने समोरासमोर येतात तेही पाहतो. मुंग्या काहीतरी कुजबुज करतात आणि समजूतदारपणे एक मुंगी बाजूला होऊन निघून जाते. वाहने समोर आल्यावर मात्र ही समजुतदारी का दिसत नाही? पहिला प्रश्न असतो, `दिखता नहीं क्या?' किंवा `दिसत नाही का भाऊ?' खरं तर हा प्रश्न गैर नाहीच. पण हाच प्रश्न त्या विचारणार्यालाही लागू होतोच ना? नंतर मग फुलत जातो एक आनंदसंवाद. म्हणजे आजूबाजुच्यांना आनंद देणारा संवाद. मुळात रस्त्याने वाहन चालवताना माणसे एकमेकांच्या समोर येतातच कशी? आणि समजा कधी चुकून समोरासमोर आलीच तर समजुतदारपणे पुढे का जात नाहीत. अशा वेळी चूक कोणाची आहे हे दोघांनाही माहीत असते, पण ज्याची चूक आहे तो स्वत:हून माफी मागताना दिसत नाही. गुंड लोक सोडले तर कोणी मुद्दाम असे एखाद्याच्या गाडीला आडवे येत नाही. चुकूनच असे होते. पण आपली चूक मान्य करण्यात मात्र आपल्याला एवढा कमीपणा वाटतो की बास!! खरा प्रश्न तर हा आहे की रस्त्यावर आपण डोळे मिटून चालतो का? मग असे प्रसंग येतातच का? वाहतुकीचे नियम पाळणे किंवा समंजसपणे गाडी चालवणे यात कमीपणा वाटण्यासारखे काय आहे? किंवा वाहतुकीचे नियम मोडणे वा कशीही वाहने चालविणे यात पुरुषार्थ तरी कोणता? अशी कोणती घाई लोकांना असते कळत नाही. अन् तरीही वेळेवर न पोहोचणे हेच आम्हा भारतीयांचे वैशिष्ट्य ठरले आहे. वाहतूक पोलिस रस्त्यावर नाही आणि तरीही वाहतूक सुरळीत सुरू आहे हे स्वप्नही पाहण्याची आमची कुवत नाही. खरे तर अशा बेशिस्त वाहतुकीमुळे प्रवासाला वेळ जास्तच लागतो. शिस्तशीर वाहतूक असेल तर प्रवास लवकर होतो. ही साधी गोष्टही आमच्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडील असावी? अन् या वागण्याबद्दल आम्हाला ना खंत ना खेद. लहानपणी एक विनोद ऐकल्याचे आठवते. तो खरा की खोटा ठाऊक नाही पण मार्मिक जरुर आहे. रशियाचे एक नेते दिल्लीत आले होते. भारतीय समाज समजून घ्यायचा म्हणून ते रस्त्यावरून फिरायला निघाले. दिल्लीचा फेरफटका मारून ते परत आले. त्यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर ते म्हणाले, `मी कम्युनिस्ट रशियातून आलो आहे. कम्युनिझमचा देवावर विश्वास नाही, तसाच माझाही देवावर विश्वास नाही. पण आज दिल्लीतील वाहतूक पाहून मात्र मला वाटू लागले आहे की, देव नक्कीच असला पाहिजे. नाही तर आज मी सुखरूप परत येणे अशक्य होते.' यातील आपल्या वाहतुकीवरची टिप्पणी खूप काही सांगून जाते. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही आपण वाहतुकीसाठी समाज तयार करू शकलेलो नाही. अशा वाहतुकीने राष्ट्र कसे महान होणार कोणास ठाऊक?
-श्रीपाद कोठे
२७ मे २०११
-श्रीपाद कोठे
२७ मे २०११
मंगळवार, २४ मे, २०११
गरीब बिचारा
राज्यात सुरक्षा रक्षक अपुरे आहेत, अशी बातमी वाचली आणि डोळ्यासमोर एक गरीब बिचारं चित्र उभं राहिलं. कुठे तरी कोपर्यात उभा किंवा टाकून दिलेल्या खुर्चीवर बसलेला, अंगावर विशिष्ट असा एखादा गणवेष, गणवेशातील hat एखादेवेळी घातलेली, बहुतेक वेळी काढून हातात घेतलेली किंवा गुडघ्यावर ठेवलेली, चेहर्यावर शून्य भाव, एखादी विशिष्ट व्यक्ती आली तर लगेच सावरून, hat घालून salute मारणारी, दुपारी १-२ च्या सुमारास कुठेतरी जागा पाहून डब्बा खात बसलेली, आजुबाजूला काय चाल्लय, काय काय आहे याची काहीही माहिती नसणारी अशी एक मूर्ति डोळ्यासमोर उभी राहिली. हे चित्र माझ्याच नव्हे सगळ्यांच्याच नित्य पाहण्यातील आहे. असा हा सुरक्षा रक्षक खरंच आपली, एखाद्या दुकानाची, गृहसंकुलाची, कारखान्याची, बँकेची सुरक्षा करू शकेल का, की कोणी त्याची मानगुट पकडली तर आपल्यालाच त्याची सुरक्षा करावी लागेल असा प्रश्न त्यांना पाहताना पडतो. तो सुरक्षा रक्षक आहे याचा अर्थच त्याच्याकडे सामान्य माणसापेक्षा थोड़ी अधिक ताकद असायला हवी. तो थोडासा हट्टाकट्टा, चपळ हालचाली करणारा, धारदार नजरेचा आणि व्यक्तिमत्वाचा, चौकस, चांगली निरीक्षण शक्ती असणारा, आजुबाजूच्या घटना, हालचाली यांचे अर्थ कळू शकणारा, स्वत:हून निर्णय घेण्याची क्षमता असणारा असा असायला हवा ना! त्याची अधिक शक्ती त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वातून, वागण्या बोलण्यातून, वावरण्यातून झळकायला हवी. पण असे क्वचित कुठे पाहायला मिळते. कधी कधी तर त्याच्या खांद्याला बंदूक असते आणि ती इतकी केविलवाणी दिसते की विचारू नका. सुरक्षा या महत्वाच्या व गंभीर विषयाकडे आपण किती सहजतेने पाहतो आणि त्याची उपेक्षा करतो!! सुरक्षा रक्षाकाचा धाक वाटला पाहिजे. त्याच्यावर मोठी जबाबदारी असते, ती तो योग्य प्रकारे पार पाडू शकला पाहिजे, याचा विचार कोणी कधी करीत असेल असे वाटत नाही. या सुरक्षा एजन्सिजही समाजातील बड्या व्यक्तिन्शी संबंधितच असतात. त्यांना विचार वगैरे करणे मागासलेपणाचेच वाटते. जिथे कुठे काम मिळेल तिथे मालकाला वा साहेबाला सलाम करता आला आणि केला म्हणजे झालं. सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवायला तेवढाच निकष पुरेसा आहे. मध्यंतरी `अजब प्रेम की गजब कहानी' असा एक चित्रपट आला होता. आपल्याही देशाचे चित्र `अजब देश की गजब कहानी' असेच आहे.
-श्रीपाद कोठे
सोमवार, २३ मे २०११
-श्रीपाद कोठे
सोमवार, २३ मे २०११
रविवार, २२ मे, २०११
म्हातारा न इतुका...
दोन दिवस झाले कनिमोझी हे नाव सर्वत्र चर्चेत आहे. अनेक वर्षे तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद भूषविलेले एम्. करूणानिधी यांची ही कन्या. आजवरचा सर्वात मोठा समजला जाणारा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा. त्यातील कनिमोझीचा सहभाग. त्याचे अर्थकारण, अनर्थकारण, राजकारण वगैरे वगैरे चर्चा सार्यांना ठाऊक आहेत. माझ्या मनात मात्र एकच गोष्ट पिंगा घालते आहे. ती म्हणजे करूणानिधी आणि त्यांचं वय. आज या राजकारणपटुचं वय आहे ८७ वर्षे. त्यांना चालता येत नाही. चाकाच्या खुर्चीवरून फिरावं लागतं. या वयात, अशा स्थितीत निवडणुका, राजकारण हे सावरता सावरता आता मुलीच्या अटकेचंही सारं पाहावं लागणार. केवढी ही दगदग, त्रास. हा त्रास त्यांना कोण देतंय? ते स्वत:च. कारण? कारण एकच, खुर्ची सुटत नाही. आपल्या देशात ही कथा काही नवीन नाही. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू, मोरारजी देसाई, हरकिशन सिंह सुरजित, के. करुणाकरन, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी... राजकारणाची पाने चाळून यादी वाढवता येईल. खुर्ची मात्र सुटता सुटत नाही. अन् वाजपेयी यांच्यासारख्या एखाद्याने म्हटले की, आपल्याला राजकारण सोडायचे आहे तर सारी प्रसार माध्यमे केवढा गदारोळ उडवून देतात. एका वयानंतर बाजूला व्हायलाच हवं याचं भान संबंधित व्यक्तीला तर कमीच असतं, पण समाजाचीही त्याला तयारी नसते. योगायोगाने आजच एका वृत्तवाहिनीचे सर्वेक्षण पाहण्यात आले. केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तचे सर्वेक्षण. पंतप्रधान पदासाठी सगळ्यात लायक कोण? या प्रश्नावर लोकांनी डॉ. मनमोहन सिंग यांनाच पहिली पसंती दिली आहे. त्यांनी देशाला अगदी शिखरावर वगैरे नेऊन ठेवले आहे का? आणि त्यांचे वय? तेही ८० च्या घरात आहेतच. पण आपल्याला तेच हवेत. काय आपल्याकडे माणसे नाहीत? आणि समजा नसतील, तरीही संबंधित व्यक्ती आणखी किती काळ पुरणार आहे याचा विचार वगैरे करण्याच्या फंदात आपण पडत नसतोच. नवीन, कमी वयाच्या व्यक्तीने नेतृत्व करावे याला आपण मनाने स्वीकारतच नाही. नवीन व्यक्ती चुकेल कदाचित, पण त्यातूनच तयार होईल आणि भविष्यात नेतृत्व करेल हा विचार आम्हाला शिवतच नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वा ब्रिटनचे पंतप्रधान आपला कार्यकाळ संपल्यावर कुठे असतात, कुठे राहतात, काय करतात हे जाणून घेण्याची सुद्धा आम्ही तसदी घेत नाही. महान राष्ट्राची स्वप्ने पाहणारे आम्ही आमची सरंजामदारी वृत्ती मात्र बदलू शकत नाही.
-श्रीपाद कोठे
रविवार, २२ मे २०११
-श्रीपाद कोठे
रविवार, २२ मे २०११
शनिवार, २१ मे, २०११
आवाजाचे वेड
रात्री ११-१२ वाजताच्या सुमारास डीजे बंद करा म्हणून सांगायला गेलेल्या एका वृद्धाला ७-८ जणांनी मारहाण केली आणि त्याच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली. नागपुरात २० मे रोजी रात्री ही घटना घडली. अशा प्रकारच्या अनेक घटना आपण आजुबाजूला पाहत असतो, वाचत असतो आणि विसरून जातो. `आवाज' या गोष्टीचं इतकं प्रचंड वेड आपल्याला का आहे समजत नाही. अगदी चढाओढ सुरू असते कोण किती मोठ्या आवाजात गाणी लावू शकतो याची. आमच्याकडे काही सण-समारंभ आहे, आनंदाचा प्रसंग आहे हे इतक्या कर्कश्शपणे जगाला सांगितलेच पाहिजे का? आणि कशासाठी? आपला आनंद आपण साजरा करा ना! शक्य झाले तर आजुबाजूच्यांना त्यात सहभागी करून घेता आले तर पाहा. पण सगळ्यांच्या (आणि स्वत:च्याही) कानांचे पडदे फाडण्याचा हा अट्टाहास कशासाठी? एवढीच हौस असेल तर कानाला इअर फोन लावून वाजवा ना कितीही मोठ्याने गाणी. स्वत:च्या कानाचे पडदे फाडा. विद्यार्थ्यांचा अभ्यास, रुग्णांच्या तब्येती, वृद्धांचा निवांतपणा हे सारे हिरावून घेण्याचा आम्हाला काय अधिकार? यात धार्मिक आयोजनेही मागे नसतात. वास्तविक धार्मिक आयोजनांनी दुसर्यांचा विचार, समाजाचा विचार प्रथम करायला हवा. ही आयोजने व्यक्तीच्या अंत:करणापर्यंत पोहोचायला हवीत. पण कर्णकर्कश्श आवाजाच्या हट्टापायी ती माणसांच्या अंत:करणापासून दूरच जातात याचेही भान आयोजकांना नसते. अनेकदा तर या आवाजामुळे घरातील व्यवहारही नीट होऊ शकत नाहीत. टीव्ही, रेडिओ वा आपल्याला हवे ते ऐकणे किंवा एकमेकांशी बोलणे सुद्धा दुरापास्त होते. घराघरातील आवाजाचे वेडही काही कमी नाही. प्रमाण नावाची गोष्टच आम्ही विसरलो आहोत. ध्वनीप्रदूषणाबाबत कायदे आहेत, नियम आहेत. पण या सार्याकडे स्वत:हून लक्ष द्यायला पोलिस व अन्य यंत्रणांना वेड थोडेच लागले आहे? बरे या विचारशून्य, विवेकशून्य वृत्तीवर स्पष्टपणे आणि वारंवार बोलून अशा वृत्तींवर एक सामाजिक नियंत्रण आणले जाऊ शकते. पण इथे वेळ कुणाला आहे आणि मुख्य म्हणजे वाईटपणा कोण घेईल? त्यापेक्षा त्रास सहन करावा. नाहीतरी आपली परंपराच आहे ना सहिष्णुतेची? नाशिक शहरात बैंडबाजा, डीजे, वराती यावर बंदी घातली आहे अशी बातमी गेल्या आठवड्यात पाहिली. पण बंदी काय उठवलीही जाऊ शकते. नाही का? महान राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहणारी आम्ही लहान माणसे विचारी अन् संवेदनशील होणार आहोत का?
-श्रीपाद कोठे
शनिवार, २१ मे २०११
-श्रीपाद कोठे
शनिवार, २१ मे २०११
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)