२६ जानेवारीच्या लष्करी संचलनात वाजवली जाणारी धून बदलण्याची चर्चा सुरू आहे. मोडीत निघणारी abide with me ही प्रार्थना गांधीजींची आवडती प्रार्थना होती अशीही चर्चा आहे. यात गांधीजी कुठून आले कळायला मार्ग नाही. गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग', 'हिंद स्वराज' किंवा गांधी जन्मशताब्दीनिमित्त गांधी स्मारक निधीने प्रकाशित केलेले त्यांच्या साहित्याचे भाग, gandhi : his life and thought हे आचार्य कृपलानी (आचार्य कृपलानी गांधीवादी होते, गांधीजींचे निकटचे सहकारी होते, अनेक वर्षे काँग्रेसचे सरचिटणीस होते, भारत स्वतंत्र होण्याच्या काळात काँग्रेसचे अध्यक्ष होते) यांनी लिहिलेले चरित्र, लुई फिशरने लिहिलेले गांधी चरित्र, जवाहरलाल नेहरू यांची आत्मकथा, सरदार पटेल यांचं चरित्र, विनोबांनी लिहिलेले गांधीजी; यात कुठेही abide with me याचा उल्लेखही नाही. नरसी मेहता यांचे 'वैष्णव जन तो तेणे कहीयेजे' आणि 'रघुपती राघव राजाराम' हे मात्र गांधीजींचे आवडते भजन होते हे जगजाहीर आहे. तसा स्पष्ट उल्लेखही आहे. 'रघुपती राघव राजाराम'च्या जागी abide with me ची घुसखोरी ही एक गंमतच म्हटली पाहिजे.
(नवीन वाजवली जाणारी 'सारे जहाँ से अच्छा' ही धून पण फार कौतुक करावं अशी नाही हा भाग वेगळा. एक तर हे गीत लिहिणारे इकबाल हे नंतर पाकिस्तानचे मोठे समर्थक झाले होते, हे एक कारण. पण ते कारण छोटं आहे. त्याहून महत्वाचं कारण म्हणजे, आम्ही या देशाचे 'बुलबुले' नाही आहोत अन हा देश आमचा 'गुलसीता' नाही. या सगळ्या कल्पनाच अभारतीय, अहिंदू, खुज्या आहेत. असो.)
- श्रीपाद कोठे
२५ जानेवारी २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा