आज भारतीय राज्यघटनेचा सण आहे. त्यानिमित्त एक नोंद.
राज्यसभा वाहिनीवर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवरील मालिका दाखवतात. घटना समितीतील चर्चाही त्यात असतात. देशातील जमीनदारी नष्ट करण्याच्या विषयावर चर्चा सुरु होती. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी याबद्दलचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला विरोधही जबर होता. त्या चर्चेत श्री. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हेदेखील सहभागी झाले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले- `साधारणपणे मी पंतप्रधान नेहरू यांच्याशी सहमत होत नाही. पण या प्रस्तावाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.' पुढे थोडे विवेचन करून ते म्हणाले- `आपण विचार करायला हवा की शेवटी पैसा कशासाठी? पैसा हा धर्मासाठी, हे त्याचे उत्तर आहे. पैसा धर्मासाठी असतो.' संपूर्ण घटना समितीने हे शांतपणे ऐकले. त्यावर कोणीही आक्षेप इत्यादी घेतले नाही. गदारोळ झाला नाही. दुर्दैवाने त्यानंतर आमचे राजकीय नेते, कथित सुधारक, कथित विचारवंत, कथित मार्गदर्शक, कथित बुद्धीजीवी यांनी `धर्म' ही फक्त आणि फक्त गोंधळ अन गदारोळ माजवण्याची गोष्ट मानली. `धर्म' ही बाब आपल्या कुवतीनुसार आणि बुद्धीनुसार मापण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि भारतीय गणराज्याचे अतोनात नुकसान करून ठेवले. अजूनही करीत आहेत. स्वत:च्या कुवतीचा अन बुद्धीचा दंभ सोडून ती अधिक व्यापक, सखोल अन परिपक्व करण्याचा विचार जरी या लोकांनी केला तरी गणतंत्र दिनाचे सार्थक होईल. अन्यथा कुळाचार सुरूच असतात.
- श्रीपाद कोठे
२६ जानेवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा