शनिवार, २० जुलै, २०२४

विचारयान

हे जरा तात्विक वाटेल. हो, हे तात्विकच आहे आणि प्रत्येकाने थोडं अधिक तात्विक व्हावं या इच्छेनेच आहे...

मानवी समाजासाठी राज्य/ सत्ता/ शासन/ सरकार या बाबी आवश्यकच असतात. पण, मानवी समस्या सोडवणे, मानवी मनांचे उन्नयन, मानवी संवेदना आणि जाणिवा व्यापक करणे; थोडक्यात मानवी सुखासाठी आवश्यक घटक हे राज्याच्या कार्यकक्षेत येत नाहीत. राज्य श्रीरामांचे असो, श्रीकृष्णाचे असो, शिवाजीचे असो, काँग्रेसचे असो, कम्युनिस्टांचे असो, भाजपचे असो, रिपब्लिकन पक्षाचे असो, हिटलरचे असो, अब्राहम लिंकनचे असो, एलिझाबेथचे असो, लोकशाही असो, राजेशाही असो, हुकूमशाही असो; हेच सत्य आहे. मानवी समस्या सोडवणे, मानवी मनांचे उन्नयन, मानवी संवेदना आणि जाणिवा व्यापक करणे; थोडक्यात मानवी सुखासाठी आवश्यक घटक यांच्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करावा लागतो. ती एक मनोबौद्धिक उत्क्रांतीची प्रक्रिया असते. त्यासाठी सत्ता/ राज्य/ राजकारण यांच्याशी बांधून न घेतलेला समाज हवा. कारण राज्याशी बांधलेले मानवी मन मनोबौद्धिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेला प्रतिसाद देण्यापासून दूर जाते. परिणामी मानवी जीवन सुख शांतीपासून दूर जाते. गेल्या काही शतकातल्या मानवी समाजाच्या राजकीयीकरणाने आणि त्यासाठी आधारभूत विचारांनी मानवाची सत्ताकांक्षा खूप जागवली परंतु त्याची मनोबौद्धिक उत्क्रांती खुडून टाकली. आता होणारे मानवी सुखशांतीचे प्रामाणिक प्रयत्नदेखील याच विषवर्तुळात घोटाळत असून फक्त क्रिया प्रतिक्रिया एवढाच खेळ सुरू असतो. मानवाचे अराजकीयीकरण ही खूप आवश्यक बाब आहे. विचारांचे सध्याचे orbit तोडून मानवी विचारांना पुढील कक्षेत घेऊन जाण्याएवढ्या शक्तीच्या विचारयानाची मानवाला गरज आहे.

#श्रीपाद कोठे

२१ जुलै २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा