मंगळवार, ९ जुलै, २०२४

रोबोटची पत्रकार परिषद

जिनिव्हा येथे नुकतीच रोबोटची एक पत्रकार परिषद झाल्याची बातमी आहे. या पत्रकार परिषदेत रोबोटनी विश्वास व्यक्त केला की, आम्ही हे जग माणसांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे चालवू शकू. कारण आम्हाला भावना नसल्याने आम्ही फक्त सत्याच्या आधारे जग चालवू. स्वाभाविकच काही प्रश्न मनात आले. कदाचित प्राथमिक स्वरूपाचे. (प्राथमिक शिक्षण हेच सगळ्यात महत्त्वाचं आणि पायाभूत असतं. नाही का?)

- माणसांपेक्षा चांगलं जग चालवू म्हणताना, हे जग माणसं चालवतात असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. ते कितपत बरोबर आहे? पर्यावरण, अन्नधान्याचे कमी उत्पादन किंवा टीव्ही पाहू दिला नाही म्हणून आत्महत्या; यासारख्या असंख्य गोष्टींमध्ये असलेला मानवेतर घटक रोबोटना आकलन झालेला आहे का?

- रोबोटना जे सत्य वाटते किंवा वाटेल ते कोणते वा कोणाचे सत्य असेल? त्यांना जेवू घातलेल्या (feed केलेल्या) पेक्षा अधिक काही त्यांच्या सत्य कल्पनेत आहे का? असेल का? म्हणजेच त्यांचे सत्य हे सापेक्ष सत्यच राहणार.

- रोबोटना जेवू घालणाऱ्याने त्यांना काय जेवू घालावे हे कोण ठरवणार? हे जर त्यांना जन्माला घालणारा माणूसच ठरवणार असेल तर; आम्ही जग चालवू आणि ते चांगले चालवू; या म्हणण्याला किती अर्थ राहतो?

- याच पत्रकार परिषदेत रोबोटना कृत्रिम बुद्धिमत्ता (ai : artificial intelligence) बद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर एका रोबोटने सावध राहण्याचे व पुढे धोके असल्याचे मत व्यक्त केले; तर अन्य एका रोबोटने भविष्यातील संभाव्य धोक्यांची शक्यता फेटाळून लावली.

- माणसांप्रमाणेच एकाच मुद्यावर वेगळी मते असणारे रोबोट जग चालवताना असंख्य गोष्टींवर एक कसे होणार आणि हे जग अधिक चांगल्या प्रकारे कसे चालवणार? मतांतरावरून त्यांच्यात संघर्ष होईल का? किंवा मतांतर असताना ते नेमका निर्णय कसा घेणार?

- माणसांचे काय होणार? रोबोटना माणसांची गरज राहील वा नाही? आज माणसे आज्ञा देऊन रोबोटकडून कामे करवून घेतात. भविष्यात रोबोट माणसांना असेच आपल्या आज्ञांवर कामे करायला लावेल का? इत्यादी इत्यादी इत्यादी.

- पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या ५१ रोबोटकडे याची उत्तरे होती की नाही? माहिती नाही.

- श्रीपाद कोठे 

१० जुलै २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा