रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

Communism म्हणजे काय?

गरीब, वंचित वगैरेंबद्दल बोललं की; कम्युनिझमच्या नावाने खडे फोडणारे खूप वाढले आहेत. त्यांनी फक्त दोन गोष्टी माहिती करून घ्याव्या - कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कधीचा आहे आणि मेकॉलेने ब्रिटिश संसदेत केलेले - 'मी संपूर्ण भारत पालथा घातला पण मला कुठेही भिकारी दिसला नाही, घरांना कुलुपे दिसली नाहीत' - हे विधान कधीचे आहे ते माहिती करून घ्यावे. भारताने हे कसे साध्य केले होते आणि कसे साध्य केले असावे याचा विचार करावा. अन् त्यानंतर ऊर्जा आणि उत्साह उरलाच तर - 'ईशावास्यमिदं सर्वं' हा आर्थिक विचार सांगणारा मंत्र कशातला आणि कधीचा आहे हे माहिती करून घ्यावे. उथळपणे कम्युनिस्ट कम्युनिझम करत राहणारे लोक स्वार्थी, हावरट, विचारशून्य आणि संवेदनाहीन भांडवलशाही समर्थक असतात.

- श्रीपाद कोठे 

३० सप्टेंबर २०२३

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

तो

कुठे तरी जाणारी कुणाची तरी पालखी. त्यातल्या एका भक्ताने फाटक वाजवले. समोर जाऊन पाहिले. आत आलो. परत समोर जाऊन दक्षिणा त्याच्या हातावर ठेवली. त्याने माझ्याबद्दल सांगणे सुरू केले. पण या प्रकाराचा अनुभव असल्याने आणि आपल्याबद्दल काही जाणून वगैरे घेण्यात रस नसल्याने हात जोडून आत येऊ लागलो. त्याने पेलाभर पाणी मागितले. पक्का चिकटू दिसतो असं मनात म्हणत त्याला पाणी दिलं. पाणी पिल्यावर पुन्हा तो सुरू झाला. मीही एकेक पाऊल मागे येऊ लागलो. शेवटी म्हणाला - 'चिंता करू नका. सगळं व्यवस्थित होईल. कोणालाही तुमचं काही करावं लागणार नाही. प्रकृती सदा उत्तम राहील.' मी आत आलो. तो पुढे गेला. बस्. या प्रसंगातील त्याची शेवटची दोन वाक्ये मात्र आवडून गेली. बाकी कर्ता करविता जाणे.

अमर्याद

फेसबुक पेज वरखाली करताना एक व्हिडिओ दिसला. एक महिला आलिशान गाडी चालवत येते आणि एका ठिकाणी थांबते. खिडकीची काच खाली करते आणि भीक मागणारी काही मुलं खिडकीजवळ येतात. ती आपल्याजवळच्या पोलिथिनमधून दोन केळी, एक सफरचंद, एक डाळिंब काढते अन् एकाच्या हातावर ठेवते. तोवर छोट्या छोट्या मुलामुलींची रांग तयार झाली असते. गाडीतील महिला प्रत्येकाला दोन केळी, एक सफरचंद, एक डाळिंब देते. हे काम आटोपल्यावर खाली उतरते आणि त्या मुलामुलींना जवळ घेते. कोणाला मिठी मारते, कोणाचा मुका घेते. कोणाच्या डोक्यावरून हात फिरवते.

ती मुलेही खुश होतात. हसतात. फळे खातात. नव्वदेक किलोची पंचतारांकित पोशाख केलेली ती महिला आलिशान मोटारीत बसून निघून जाते. त्या महिलेची गाडी, पोशाख, व्यवहार सगळं पाहून; ती उच्चभ्रू वर्गातील असल्याचं स्पष्टच होतं. अन् तिची कृती पाहून तिच्या मनात करुणा होती हेही स्पष्ट होतं. नेमकी याच ठिकाणी सामान्यत: गल्लत होते. करूणेचं पारडं जड होतं. गरीबांना मदत ही नीती मनावर ठसते. अन् हळूच माणूस भरकटतो. त्याची विचारशक्ती खुंटते.

करुणा ही चांगली गोष्ट आहे. गरीबांना मदत ही आदर्श बाब आहे. पण मूळ प्रश्न हा आहे की, गरीबांना मदत करण्याची वेळ का येते? भुकेल्या मुलांना फळे देऊन आपल्या मनातील करुणा शांत करण्याची आणि मिळालेली फळे खाऊन आनंदी होण्याची स्थिती का उत्पन्न व्हावी?

ती महिला अमर्याद जीवनशैलीची प्रतिनिधी होती. ही अमर्याद जीवनशैलीच विषमता आणि करुणा व आनंदाचे कृतक समाधान यासाठी कारण आहे, हे लक्षात घेतले जात नाही किंवा लक्षात येत नाही किंवा दुर्लक्षित केले जाते. अमर्याद पैसा, अमर्याद स्वातंत्र्य, अमर्याद भोग, अमर्याद सुख, अमर्याद काम, अमर्याद संग्रह, अमर्याद सत्ता, अमर्याद घरे, अमर्याद फार्म हाऊसेस, अमर्याद गाड्या, अमर्याद वेग, अमर्याद तंत्रज्ञान, अमर्याद स्वप्ने, अमर्याद इच्छा... जे जे काही असेल ते अमर्याद. ही मर्यादाशून्यता विषमतेला जन्म देते. कारण अमर्यादपणाची लालसा आपली space मर्यादित करण्याला नकार देते आणि त्याच वेळी दुसऱ्यांना त्यांची space देण्यालाही नकार देते. यातून संघर्ष निर्माण होतो. ज्याला या अमर्याद संस्कृतीने स्पर्धा असं फसवं नाव दिलेलं आहे. त्या स्पर्धेत टिकला तो टिकला. पुढे गेला तो पुढे गेला. त्याचं अनावश्यक समर्थन केलं जातं. स्पर्धेतील हा विजय आपल्या अमर्यादपणाचे pampering आहे याकडे डोळेझाक केली जाते. पण कधीकधी मूळ मानवी वृत्ती उसळी मारते आणि करुणेचे शमन करण्यासाठी सेवेचा आसरा घ्यावा लागतो. हे सगळंच फार उथळ आणि दिखाऊ असतं. अमर्यादपणाचा सोस कमी करणं हाच उपाय आहे. हा उपाय कोण आणि कसा करणार? ते शक्य होईल?

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३

सर्वांजवळ सर्वच असेल, हे होऊ शकणार नाही.

याचा केवळ समतेच्या दृष्टीने विचार केला तर तो फार वरवरचा होईल.

प्रत्येकाला त्याच्या क्षमते नुसार काम व गरजे येवढा पैसा मिळायला हवा, हे आदर्श तत्त्वज्ञान.

आपण जरा विद्वानांच्या भाषेत बोलू....

उच्च कोटीचाया विद्वानाच्या प्रवचनाला फारच तोकडे लोक असतात व इंदूरीकरांचे समोर जागाच उरत नाही.

यात न उच्चकोटीचे चुकीचे आहेत ना इंदूरीकर. यात इंदूरीकरांनी जाहिरात केली होती वगैरे पळवाटा आहेत.

प्रश्न समरसतेचा वा जिव्हाळ्याचा आहे. जे माझ्याकडे भरभरून आहे, व इतरांकडे नाही, ते मी त्यांच्यासोबत वाटून घेणे (sharing) हा भाव महत्त्वाचा.

हाच भाव कमी होत चालल्याने कम्युनिस्ट व कम्युनलांचे फावते.

आपल्याकडे म्हणूनच लहानपणापासून वाटण्याची सवय लावतात.

मला आजही आपल्या उत्पन्नाच्या १०% समाजावर खर्च करणारे काहीजण माहित आहेत.

Kishor Paunikar मला वाटतं थोडा अधिक खोल, शब्द आणि त्यांचे अभिनिवेशी समर्थन किंवा विरोध यांच्या बाहेर पडून विचार करायला हवा. समता वगैरे मी म्हटलेले नाहीच. दुसरे म्हणजे आपण म्हणता त्या प्रमाणे प्रत्येकाला गरजे एवढे कसे मिळेल? आज जो अनिर्बंध आणि अमर्यादपणा विचार, योजना, धोरण, सिद्धांत या सगळ्यात आलेला आहे त्याने प्रत्येकाला गरजे एवढं मिळेल का? अंबानी आणि मोटारीच्या खिडकीतून फळं घेणारे यात काही वावगे वाटत नसेल तर गोष्ट वेगळी. सगळ्यांना सगळे मिळणार नाही वगैरे तत्वज्ञान, माणसाच्या लालसा आणि हाव झाकण्यासाठी वापरले जाऊ नये. मानवी प्रयत्न सगळ्यांना सगळे मिळावे हाच असायला हवा. त्यात निसर्गत: जे कमी अधिक राहील ते राहील. पण प्रयत्न करतानाच सगळ्यांना सगळं मिळू शकत नाही याला मान्यता दिली तर तो ढोंगीपणा, स्वार्थ आणि लालसा यांचेच पोषण करेल. सर्वेपी सुखिन: संतु म्हणजे कमुनिझम वगैरे होत नाही.

Shripad Kothe रस्त्यावरचा मजूरही श्रम करतो व अंबानी पण करतो. पण अंबानी लाखो लोकांना पोसतो व मजूर मोठ्या मुष्किलीने आपले पोट भरतो.

आता अंबानीची क्षमता जास्त असल्याने तो जास्त कमावतो, हा रोष साम्यवादाकडेच झुकतो.

मजुराची क्षमता वाढणे शक्य नसल्याने अंबानीला लुटून गरीब करणे, हाच पर्याय बाकी राहतो.

त्यामुळे सर्वैपी सुखिनः म्हणजे ज्याला जितकी मुलभुत गरज आहे तितके किमान मिळणे. यासाठी जास्त साधन संपत्ती असलेला माणूस खिडकी उघडतो ही सांस्कृतिक समृद्धीच आहे.

Kishor Paunikar मोठा विषय आहे. वाद घालायला मला वेळ नाही. पण तुमची चूक होते आहे हे निर्विवाद. राग आला तरी - अधिक अभ्यास आणि चिंतन करण्याचा आणि निरपेक्ष चिंतन करण्याचा सल्ला देईन. 🙏

अन् हो, अंबानींची क्षमता जास्त वगैरे तद्दन फालतू तर्क सोडता आले तर बरं. 🙏

Shripad Kothe आपले मार्गदर्शन नक्कीच शिरोधार्य!

निरपेक्ष चिंतन वगैरे कळत नसल्यानेच मी याविषयी कुठे मार्गदर्शन मिळेल का हे शोधत असतो.

आपला रामशास्त्री बाणा मला नेहमीच आवडतो. 🙏

Kishor Paunikar गरीब, वंचित वगैरेंबद्दल बोललं की; कम्युनिझमच्या नावाने खडे फोडणारे खूप वाढले आहेत. त्यांनी फक्त दोन गोष्टी माहिती करून घ्याव्या - कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कधीचा आहे आणि मेकॉलेने ब्रिटिश संसदेत केलेले - 'मी संपूर्ण भारत पालथा घातला पण मला कुठेही भिकारी दिसला नाही, घरांना कुलुपे दिसली नाहीत' - हे विधान कधीचे आहे ते माहिती करून घ्यावे. भारताने हे कसे साध्य केले होते आणि कसे साध्य केले असावे याचा विचार करावा. अन् त्यानंतर ऊर्जा आणि उत्साह उरलाच तर - 'ईशावास्यमिदं सर्वं' हा आर्थिक विचार सांगणारा मंत्र कशातला आणि कधीचा आहे हे माहिती करून घ्यावे. उथळपणे कम्युनिस्ट कम्युनिझम करत राहणारे लोक स्वार्थी, हावरट, विचारशून्य आणि संवेदनाहीन भांडवलशाही समर्थक असतात.

#श्रीपादचीलेखणी

Shripad Kothe अरेऽव्वा! आज आपण मुक्त विद्यापीठात फिरवून आणत आहात.

हे सारे मी टिपून ठेवतो. कधीतरी तर या साऱ्यांवरून नजर फिरवण्याचा योग येईलच! 🙏

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

भूक

आजकाल अलक असा एक प्रकार असतो. हे अलकमध्ये बसेल का?

###########

देवळात विठोबा करून बाहेर पडलेला महेश, पोटोबा करायला शेजारच्या उपहारगृहात जात होता. उपहारगृहातून एक जण पोटोबा करून बाहेर येत होता. त्याच वेळी केस पिंजारलेल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलीने त्या व्यक्तीपुढे हात पसरला. त्याने पैसे वा खाद्यपदार्थ न देता तिला सल्ला दिला - भिक नको मागत जाऊ. महेशने खिशात हात घातला आणि तिच्या हातावर एक नोट ठेवली. ती निघून गेली. बाहेर पडणारी व्यक्ती महेशला म्हणाली - 'तुम्ही लोक असे करता. हे बरोबर नाही. त्यांनी सन्मानाने जगले पाहिजे.' महेश त्या गृहस्थाला म्हणाला - 'तुमच्याशी सहमत. त्यांनी सन्मानाने जगलेच पाहिजे. पण मला त्या सन्मानाच्या आधी रांगेत उभी असलेली तिची भूक दिसली आणि महत्त्वाची पण वाटली.' तो बाहेर पडला. महेश आत गेला.

- श्रीपाद कोठे

बुधवार, २७ सप्टेंबर २०२३

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

विज्ञान आणि वैज्ञानिक वृत्ती

आजच्या मंगळ मोहिमेने आनंदाची अन अभिमानाची लाट आलेली आहे. ती अतिशय योग्य अशीच आहे. ज्याला आनंद आणि अभिमान वाटणार नाही त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. पण उत्साहभरल्या प्रतिक्रियांमधल्या वेगवेगळ्या शब्दातील काही प्रतिक्रिया अशा होत्या ज्यांचा आशय होता- मंगळाच्या मानवी जीवनावरील प्रभावाबाबत. आपण आता तरी त्यातून बाहेर पडणार का असा त्या प्रतिक्रियांचा आशय. गंमत वाटली. ज्योतिष्यशास्त्र मानायचं वा नाही, मंगळाचा प्रभाव मानायचा वा नाही; हे मुद्देच वेगळे आहेत. पण आपण मंगळावर पोहोचलो म्हणजे मंगळ त्याचा प्रभाव पाडणे बंद करेल का? माणसाने मिर्चीचे गुणधर्म शोधून काढले किंवा न्यूटनने गुरुत्वाकर्षण शोधून काढलं म्हणजे मिर्ची वा गुरुत्वाकर्षणाने परिणाम करणे सोडले का? आपण मंगळावर पोहोचून विज्ञानात किती प्रगती गाठली ते दाखवून दिले. पण वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला किती शिकलो आहे? वैज्ञानिक वृत्तीसाठी अजून खूप मोठा पल्ला बाकी आहे.

- श्रीपाद कोठे

२४ सप्टेंबर २०१४

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

चार 'स'कार

आज ऋषी पंचमी आणि श्री गजानन महाराज यांचा समाधी दिवस आहे. सहज विचार आला दोहोंच्याही नैवेद्याचा. देवधानाच्या तांदळाचा भात आणि घरी उगवलेल्या आणि शिजवलेल्या भाज्यांची बिना मसाल्यांची भाजी हा ऋषी पंचमीचा, तर साधी भाजी भाकरी हा गजानन महाराजांचा नैवेद्य. यात काही तरी आज दिसलं. साधेपणा, सद्भाव, सात्विकता आणि सत्य. ऋषी म्हणजे, संत म्हणजे या चार गोष्टी. जीवनात समाधान देण्याची आणि समाजाची धारणा करण्याची मूलभूत आणि अंगभूत शक्ती असलेले हे चार स - कार. आणखीन एक गोष्ट जाणवली - unattached attachment आणि non involved involvement. त्यांचं प्रेम, त्यांची काळजी, त्यांचा राग, त्यांचे कष्ट, त्यांची साधना हे सगळं unattached आणि non involved असतं. सामान्य माणूस attachment आणि involvement याशिवाय काहीच करू शकत नाही. त्याचे विचार, व्यवहार, भावना त्याशिवाय होतच नाहीत. ऋषी आणि संत मात्र कोणतंही नातं, कोणतंही बंधन यात न राहूनही सदैव सद्भावाचा कल्याणमंत्र जपत असतात.

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०२३

बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

प्रतिसाद

माणूस जगतो, वागतो म्हणजे काय? खूपदा वर्णन केलं जातं- जन्म आणि मृत्यू यांच्या मधील काळ म्हणजे जगणं. तरीही जगणं म्हणजे काय याचा उलगडा होत नाहीच. जो जन्म आणि मृत्यू यांच्या मधला काळ आहे, त्याचा आणि आपला काय संबंध? त्यामुळे हे वर्णन फार काही पदरात टाकत नाही. मग जगतो, वागतो म्हणजे काय? तर जगणे, वागणे म्हणजे respond करणे. अगदी आईच्या पोटातून निघालेल्या बाळापासून तिरडीवर ठेवण्याच्या अवस्थेपर्यंतचा माणसाचा प्रवास म्हणजे रिस्पॉन्स देणे. प्रत्येक क्षण म्हणजे रिस्पॉन्स. प्रतिसाद !! शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक गरजांना प्रतिसाद. अगदी कोणतीही कृती घ्या किंवा कोणताही विचार घ्या; कशा ना कशाला दिलेला तो प्रतिसाद असतो. आपण प्रत्येक जण जिला प्रतिसाद देतो, ती साद येते कोठून? ती आपल्याच आतून येते. भूक लागली की आतून साद येते. प्रश्न पडतो तो आतून येतो. कोणतीही गरज जाणवते ती आतून जाणवते आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपण कृती वा विचार करतो. ही प्रत्येकाला येणारी साद वेगळी असते. म्हणूनच एकाच वातावरणात राहणारे वेगवेगळा प्रतिसाद देतात. एखादं निसर्गदृश्य किंवा चित्र किंवा अपघात किंवा घटना किंवा काहीही; त्याला किती प्रकारांनी प्रतिसाद मिळतो. का? कारण त्या बाह्य सादाला दिलेला आतला प्रतिसाद वेगळा असतो. हा आतला प्रतिसाद पुन्हा आपल्याला साद घालतो आणि आपण त्याला प्रतिसाद म्हणून प्रतिक्रिया देतो. ही आतल्या - बाहेरच्या साद आणि प्रतिसादाची एक अखंड मालिका म्हणजे जीवन. हे प्रतिसाद आपल्या गरजा भागवण्यासाठी असतात. गरज भागली की प्रतिसाद थांबतो वा बदलतो. यातूनच सुखदु:ख, हर्षविषाद, आकर्षण अपकर्षण, उत्साह निराशा; एवढंच काय सगळं अर्थकारण, समाजकारण, राजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म, वैद्यक, शिक्षण, कला, साहित्य सगळं सगळं आकाराला येतं. सांगण्याची गरजसुद्धा साद घालते आणि त्यातून साहित्य, ग्रंथ आकाराला येतात. कला जन्म घेतात. अनेकानेक व्यवस्था याच गरजांना दिलेल्या प्रतिसादातून विकसित होतात. आपल्या गरजांचे प्रकार आणि प्रमाण यानुसार आपण विविध व्यवस्था, संघटना, गट इत्यादीत सामील होत असतो. अन गरज पूर्ण झाली की त्यातून बाहेर पडतो. एवढेच काय त्या त्या व्यवस्थेत, गटात वा संघटनेत, संस्थेत सुद्धा गरजेप्रमाणे बदल घडवून आणतो. अन आपल्याला suit होईल त्याप्रमाणेच त्यांचे आचारविचार पाळतो. याला कोणीही अपवाद नाही. कोणता हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आपापल्या धार्मिक आज्ञा वा नियम आदी काटेकोरपणे पाळतो? कोणता कम्युनिस्ट कम्युनिझमच्या तत्वांचे तंतोतंत पालन करतो? किती कम्युनिस्टांनी व्यक्तिगत संपत्तीचा त्याग केलेला आहे? किती जण आहेत ज्यांनी संपूर्ण राज्यघटना वाचली आहे? अन पूर्ण राज्यघटना वाचणाऱ्यांपैकी किती जण रोज ती वाचत वाचत आपले दैनंदिन व्यवहार करतात? जेव्हा कुठेही कधीही व्यवहाराचा संघर्ष होतो तेव्हा, घटना म्हणा, कायदा म्हणा, धर्मग्रंथ म्हणा वा कोणताही प्रमाणग्रंथ काढून त्यानुसार चर्चा सुरु होते. पण तेव्हाही फक्त चर्चाच. वरचढ ठरतात गरज आणि तिला द्यावयाचा प्रतिसाद हेच. मग काय, हे सगळे ग्रंथ, शास्त्र, घटना, व्यवस्था, संस्था, संघटना, रचना निरर्थक म्हणायच्या? नाही. त्या निरर्थक नक्कीच नाहीत. नसतात. ते वरवर चढतानासाठी आधाराचे कठडे असतात. आपल्यापूर्वी जे चढले त्यांनी तयार केलेले. तोल जाऊ नये म्हणून त्याचा उपयोग. तसेच त्याला टेकून अंमळ दम खाता येतो. अन त्याच्या आधारे थोडे थांबून किती चढलो याचा अंदाज घेता येतो. मात्र कठडा म्हणजे शिखर नाही. जगणे म्हणजे कठडा धरून ठेवणे नाही. जगणे म्हणजे शिखर सर करणे. शिखर गाठणे. अन प्रत्येकाला हे शिखर गाठावे लागते. इतके लोक चढले, असं म्हणून भागत नाही. आपल्या पूर्वी अनेकांनी शिखर गाठले म्हणून थांबता येत नाही. आपल्या पूर्वीचेही चढले, आपल्यालाही चढायचे आहे आणि आपल्यानंतरचेही चढणारच आहेत. नव्हे शिखर चढणे हीच होऊन गेलेल्या, असलेल्या वा येणाऱ्या सगळ्यांची नियती आहे. अन प्रत्येकाला चढाईची ही सुरुवात पहिल्या पावलानेच करावी लागणार आहे. ही relay race नाही. हे शिखर सतत साद घालत असते आणि आपण त्याला प्रतिसाद देत पुढे पुढे चालत असतो. ग्रंथ, गट इत्यादी आधाराला घेऊन. शिखर चढताना असंख्य वाटावळणे. कधी वाटतं आलं शिखर अन पोहोचावं तर लक्षात येतं किती फसगत झाली ते. मग कधी कंटाळून, कधी चिडून, कधी वैतागून बोटे मोडणे, नावे ठेवणे, आणखीन किती चालायचे आहे? असे प्रश्न उपस्थित करणे; असे सगळे सुरु असते. पण थांबता येत नाही. कारण शिखराची साद थांबू देणार नसते. शिखर गाठेपर्यंत. हो- अज्ञात शिखर गाठेपर्यंत. शिखर गाठले की मग सगळं निवांत...!!! ना प्रतिसाद देणे, ना कठडे धरणे.

- श्रीपाद कोठे

१२ सप्टेंबर २०१७

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

आरक्षण

मराठा आरक्षण आंदोलनाने पुन्हा उचल घेतली आहे. आरक्षण या विषयाचा आता चोथाच झाला आहे. मुख्य म्हणजे सगळ्या प्रकारचं आरक्षण हळूहळू संपलं पाहिजे आणि आम्ही आरक्षणविहीन समाज निर्माण करू; असं म्हणण्याची ताकद आणि हिंमत कोणातही नाही. आर्थिक आणि सामाजिक असे आरक्षणाचे दोन पैलू आहेत. त्यातील आर्थिक पैलू हा समन्यायी आर्थिक विकासाशी संबंधित आहे. असा समन्यायी आर्थिक विकास, समन्यायी आर्थिक वितरण करण्याची दृष्टी आणि क्षमताही कोणाकडे नाही. सामाजिक पैलू हा अत्यंत सापेक्ष विषय आहे आणि त्यासाठी एक सुदृढ सामाजिक विचार देण्याचीही कोणाची इच्छा नाही. कुरघोड्या आणि शक्तिसंतुलन या गोष्टी वाईटच आहेत.

- श्रीपाद कोठे

३ सप्टेंबर २०२३