आज ऋषी पंचमी आणि श्री गजानन महाराज यांचा समाधी दिवस आहे. सहज विचार आला दोहोंच्याही नैवेद्याचा. देवधानाच्या तांदळाचा भात आणि घरी उगवलेल्या आणि शिजवलेल्या भाज्यांची बिना मसाल्यांची भाजी हा ऋषी पंचमीचा, तर साधी भाजी भाकरी हा गजानन महाराजांचा नैवेद्य. यात काही तरी आज दिसलं. साधेपणा, सद्भाव, सात्विकता आणि सत्य. ऋषी म्हणजे, संत म्हणजे या चार गोष्टी. जीवनात समाधान देण्याची आणि समाजाची धारणा करण्याची मूलभूत आणि अंगभूत शक्ती असलेले हे चार स - कार. आणखीन एक गोष्ट जाणवली - unattached attachment आणि non involved involvement. त्यांचं प्रेम, त्यांची काळजी, त्यांचा राग, त्यांचे कष्ट, त्यांची साधना हे सगळं unattached आणि non involved असतं. सामान्य माणूस attachment आणि involvement याशिवाय काहीच करू शकत नाही. त्याचे विचार, व्यवहार, भावना त्याशिवाय होतच नाहीत. ऋषी आणि संत मात्र कोणतंही नातं, कोणतंही बंधन यात न राहूनही सदैव सद्भावाचा कल्याणमंत्र जपत असतात.
- श्रीपाद कोठे
२० सप्टेंबर २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा