कुमार विश्वास नावाचे एक गृहस्थ आहेत. ते लोकप्रिय कविता करतात. हिंदी भाषकात मंचीय कवितांचे प्रचंड वेड आहे. त्यामुळे अनेक कवींचा तोच व्यवसाय आहे. कुमार विश्वास यांचाही. त्यातून त्यांनी भरपूर माया जमवली आहे. त्यातून मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन काही काळ ते राजकारणात गेले. अन् अलीकडे रामकथा करू लागले आहेत. (लोक कथा कशी काय करू लागतात आणि लोक अशा लोकांना कसे काय बोलावतात? हा गडबडगुंता मला तरी सुटलेला नाही. ते असो.) त्यामुळे धर्माचे भाष्यकार देखील समजले जाऊ लागले आहेत. तर हे महाशय सध्याच्या राममय वातावरणाचा पुरेपूर उपयोग करून घेत एका टीव्ही वाहिनीवर 'संपूर्ण अयोध्या' अशी एक मालिका करीत आहेत. त्यात त्यांनी ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेचा आढावा घेतला. त्या आढाव्याचा समारोप करताना ते म्हणाले - 'प्रभू राम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जगाला वंदनीय आहेत परंतु त्या दिवशी रामाच्या नावाने अडवाणी, जोशी, सिंघल, कल्याणसिंह, नरसिंह राव या सगळ्यांनी आपल्या मर्यादा पार करून काम केले.' त्यांनी ज्या लोकांची नावे घेतली त्यांचे आणि त्या पक्षाचे वकीलपत्र घेण्याचे मला कारण नाही. परंतु त्या घटनेला ३० वर्षांहून अधिक काळ झालेला असताना, त्यासंबंधात न्यायालयात सगळा काथ्याकूट झालेला असताना; एका जबाबदार समजल्या जाणाऱ्या माणसाने, तथाकथित रामभक्ताने इतके बेजबाबदारपणे बोलावे?
- श्रीपाद कोठे
५ जानेवारी २०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा