गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

कलशारोहण

सगळ्यांनी, म्हणजे इकडच्यांनी आणि तिकडच्यांनी पण ऐकावा असा व्हिडिओ. दोन्ही पक्षांना भांडायला बळ देईल असा. 😄 असो. मला मात्र हा व्हिडिओ ऐकताना एक जुनी आठवण जागी झाली. शंकराचार्य (हे चार पिठातील नाहीत. मग शंकराचार्य कसे? वगैरे शंकांना माझ्याकडे उत्तरे नाहीत. ती मला मिळवायची पण नाहीत.) मंदिराच्या कळसाबद्दल बोलले त्यामुळे.

२००७ असेल. एका लग्नाला गेलो होतो. गप्पा मारत उभा होतो तेवढ्यात एक मित्र एक दोन जणांना घेऊन आला आणि आमची ओळख करून दिली. त्या एक दोघांना माझ्याकडे काम होतं. म्हटलं बोला. अन् त्यांनी काम सांगताच मी उडालोच. नागपूरला हिंगणा मार्गावर एक गजानन महाराज मंदिर आहे. त्या मंदिराचे ते कार्यकर्ते होते. दुसऱ्या दिवशी त्या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम होता. मी ते कलशारोहण करावे अशी त्यांची इच्छा होती. मी त्यांची समजूत काढली की, मी तसाही कोणीच नाही. अन् एवढं मोठं काम करण्यासाठी तर अगदीच पात्र नाही. मग त्यांनी त्यांची अडचण सांगितली. कलशारोहण एखाद्या संन्यासी व्यक्तीच्या हस्ते करायचे असते. पण कामाच्या गडबडीत त्यांना ही गोष्ट कोणी सांगितली नव्हती. ती एक दिवस आधी सांगितली. एक दोन ठिकाणी विचारपूस केली पण संन्यासी कोणी मिळाले नाहीत. आणखी प्रयत्न केले तर कोणी मिळतील देखील पण वेळ कमी होता. नव्हताच म्हटलं तरी चालेल. तेव्हा त्यांना कोणीतरी अधिकारी व्यक्तीने धर्मशास्त्रात असलेला एक तोडगा सांगितला की, एखाद्या ब्रम्हचारी व्यक्तीच्या हस्ते कलशारोहण करता येईल. त्यासाठी ते माझ्याकडे आले होते. मला त्यातले काहीही त्यावेळीही कळत नव्हते अन् आताही कळत नाही. पण कोणाची अडचण आहे अन् आपण ती दूर करू शकतो. शिवाय गजानन महाराजांच्या मंदिराचे काम असल्याने फारसा विचार करण्याची गरज नव्हती. मी हो म्हटले. कलशारोहण झाले. माझे काय पाप पुण्य असेल ते गजानन दरबारी ठेवले.

आज हा व्हिडिओ ऐकताना त्याचे शास्त्र ऐकायला मिळाले की, कलशारोहण करणाऱ्या व्यक्तीचा निर्वंश होतो अशी समजूत आहे. असे असताना कोण गृहस्थ कशाला त्या भानगडीत पडेल? अन् ब्रम्हचारी असेल तरी तो का म्हणून ही रिस्क घेईल? त्यामुळे संन्यासी हवा. मला त्या लोकांनी का बोलावले त्याचा शास्त्रीय उलगडा आज झाला. अन् प्रभूची योजनाही लक्षात आली. गृहस्थ नव्हतो आणि निर्वंश वगैरेची काही भानगड नव्हती. कलशारोहणाने तशी भानगड उत्पन्न होण्याची शक्यताही प्रभूने संपवून टाकली. वंश नाही म्हणजे पुढे नाव नाही. म्हणजेच हा जन्म म्हणजे पूर्णविराम. शेवटला जन्म. पुन्हा येणेजाणे नाही. अशाच एका अवलियाने एकदा बोलता बोलता म्हटलं होतं - 'तुमचा शेवटला जन्म आहे.' तेही आठवलं. त्यामुळे छान वाटलं. सारीपाटावरील शेवटलं दान पडलेलं आहे. कलशारोहण करून सगळ्या पापपुण्याचा हिशेब होऊन गेला आहे. आनंदी आनंद.

- श्रीपाद कोठे

२४ जानेवारी २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा