रविवार, १० जुलै, २०२२

साहस

गुहेत अडकलेली १२ फुटबॉलपटू बालके आणि त्यांचे प्रशिक्षक यांची सुखरूप सुटका ही मानवी धैर्य, प्रयत्न, प्रार्थना; यांची यशोगाथा आहे. अडकलेले १३ जण आणि त्यांना वाचवण्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असलेले सगळे, अन त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे जगभरातील सगळे याने आनंदित झालेत. हे सारे अभिनंदनासाठी पात्र आहेतच. माणसाचाही कस लागला. तंत्रज्ञानाचा कस लागला. पोरांचे आणि त्यांचे धैर्य उंच ठेवणाऱ्या, जिवंत ठेवणाऱ्या प्रशिक्षकासाठी तर शब्द नाहीत. परंतु या पहिल्या प्रतिक्रियेनंतर, पहिल्या भावनावेगानंतर मनात विचार येतो - केवळ कुतुहलापोटी असे धाडस करावे का? अशा धाडसाचे निरपेक्षपणे कौतुक व्हावे का? त्याला उचलून धरावे का? अन का धरावे? एका गीताची एक ओळ आठवते- `किंतु डूबना मझधारो मे साहस को स्वीकार नही है'. ही मुले सुखरूप बाहेर आलीत हे समाधानाचेच आहे, पण साहस अमर्याद आणि अविचारी असूच नये.

- श्रीपाद कोठे

११ जुलै २०१८

सही है, लेकीन यत्न की पराकाष्ठा करनेसेही यश मिलता है।

Yaa... But had they been columbases it's ok. They were not researchers or adventurers having a target. It was just a fun of football playing keeds.

मी तू पणाची झाली बोळवण

'ऐनक मे छब देखन जाऊं, तू ही नजर आवै' आणि 'दर्पणी पाहता मुख, न दिसे वो आपुले' या दोन्हीतली तीव्र आर्तता एकच नाही का? 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' याच्या पुढची अवस्था. डोळे बंद असताना, स्वप्नातच नाही; तर जागेपणी आरशात स्वतःच्या छबीच्या जागी, मनात जे आहे त्याची छबी दिसणं. स्वतःचं नाव म्हणून मनातलं नाव सांगणं. मी आणि तू लोपुन जाणं. 'मी तू पणाची झाली बोळवण'. इतकी एकतानता... प्रेम आणि भक्ती, भक्ती आणि प्रेम... इतकं एकजीव की कळूच नये, आधी काय नंतर काय... बेभानपणा नव्हे भान विसर्जित होणे... एकजीव शब्दाचा अर्थ आकळणे... दोन अस्तित्वातच नुरणे... दुज्याचा लोप... स्वतःचा लोप... हे एकजीव होणं आध्यात्मिक असेल तर मुक्तता... नसेल तर, 'जनम जनम की पीडा तेरी, सब मुझ मे आ जाये' एवढंच मागणं'... आत्मोसर्ग... आत्मविलोप... पूर्णत्व... शांतत्व... समाधान... सगळ्या अशांतीचं, असमाधानाचं हेच मागणं नसतं का - मी तू पणाची व्हावी बोळवण !!

- श्रीपाद कोठे

११ जुलै २०१९

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

`ग्रेट' भेट

आयबीएन-लोकमतवर सुरेखा पुणेकरची ग्रेट भेट पाहिली. अज्ञान, अशिक्षा, निरक्षरता, दारिद्र्य, बकालपणा, भोग हे सारे त्यांनी सांगितले. ते खरे आहे, दाहक आहे, भेदक आहे. तो काळ त्या अर्थाने आता थोडाबहुत बदलला असला तरीही अजूनही जगण्याची धग सोसावी लागते असे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासाठी प्रयत्नही होत आहेत. ते प्रामाणिकपणे आणि वेगाने व्हायला हवेत. आपणही आपापला वाटा उचलायला हवा.

हे सगळे असले तरीही सुरेखा पुणेकर यांनी सांगितलेली याशिवायची एक बाब मनात खोल पोहोचली. त्या काळात तमाशाला येणाऱ्या माणसांबद्दल त्या बोलल्या. त्या म्हणाल्या, `ती माणसे स्त्रीच्या अंगाला touch देखील करीत नसत. असभ्यपणा मुळीच नव्हता. पैसे देत तेव्हा कोणी पदरात टाकत. कोणी हातात देत, पण सहेतुक स्पर्श नाही. मी १०-११ वर्षांची असेन. कधी कधी फडात एखाद्याच्या मांडीवर पण जाऊन बसत असे, पण वावगा स्पर्श नाही.'

आज आम्ही कुठे आहोत? इतके खाली आम्ही का आणि कसे घसरलो? तेही इतक्या कमी काळात?

आणखीन एक बारकावा जाणवला. बोलता बोलता त्या म्हणाल्या, `ज्येष्ठ- श्रावण' आम्ही रिकामे असतो. आज आपण भारतीय कालगणना वापरीत नाही. अनेकांना भारतीय महिनेही माहित नसतात. शिवाजी महाराजांची जयंती तिथीने साजरी करावी की तारखेने असा वाद आपण घालतो. मुळात भारतीय महिने, तिथ्या, वार, नक्षत्र हे सारे आमच्या समाजात रुजलेले आणि रुळलेले आहे. तमाशा कलावंत सुद्धा त्याचाच उपयोग करतात आणि त्यांना ते समजतेही. पण आमची कथित सेक्युलर सरकारे, विचारवंत आणि स्वनामधन्य समाज सुधारक `हिंदू, ब्राम्हणी, रुढीग्रस्त' असे किंचाळत सुटतात. या देशातील मीठही अळणी लागणाऱ्या या महाभागांचे काय करावे हा खरेच मोठा यक्षप्रश्न आहे. आमच्याकडे काम करणारी कामवाली बाई, आभाळ गडगडू लागले की सहज बोलून जाते- आर्द्रा नक्षत्र लागले. अन आमचा माळी पावसाचे अंदाज सांगायला, नक्षत्रांचीच विचारपूस करतो.

यावर खरेच काही म्हणायलाच हवे का?

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०१३

वाहिन्यांच्या चर्चा

मी एकाला सहज विचारलं, वृत्तवाहिन्यांचे लोक रोज इतक्या चर्चा वगैरे करतात. हे कसं काय शक्य होत असेल? अभ्यास, वाचन आणि बोलणे याशिवाय दुसरं काहीच हे करत नाहीत का? कारण तेवढा वेळ तर द्यावाच लागेल ना. इतक्या कमी वयात इतके ज्ञान म्हणजे कौतुकच करायला पाहिजे.

माझ्या बोलण्यातील खोच त्याला कळली अन झोंबली पण. माझ्या बोलण्यावर तो म्हणाला- ज्ञानेश्वर तरी फक्त २१ वर्षांचेच होते ना? अन शंकराचार्य फक्त ३२, तर स्वामी विवेकानंद फक्त ३९ वर्षच ना?

त्याला वाईट वाटेल म्हणून मनातल्या मनात म्हणालो- ज्ञानेश्वर फक्त २१ वर्षांचे असू शकतात, पण २१ वर्षांचे ज्ञानेश्वर असतात असे नाही.

मी मौन आहे असे पाहून त्याला आणखीन स्फुरण चढले. म्हणाला- अन पुष्कळ जण असतात ना. सगळे मिळून विचार करतात, तयारी करतात.

मला जणू अंतर्मुख करण्याचाच त्याचा प्रयत्न होता. मी पुन्हा मनातल्या मनात तुकोबांची आठवण केली अन गुणगुणलो, `सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता...'

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०१५

Common sense

एका राजकीय नेत्याला म्हटले - रस्ते वगैरे खूप छान होताहेत. पण लोकांना सेन्स नाही. घरातला कचरा, अन्न रस्त्यावर आणून टाकतात. शिवाय कुत्रे, गायी यांची घाण वगैरे. तुम्ही जरा व्यक्तिशः बोला लोकांशी, सांगा, आवाहन करा. नेत्याचे उत्तर होते - निवडणूक लढवावी लागते नं भाऊ !!

यात नवीन काहीही नाही. अक्षरशः काहीही नाही. फक्त आशावाद सांगणाऱ्या लोकांचं एकीकडे कौतुक वाटतं अन संताप पण येतो.

- आशा निराशा यांच्या पल्याड गेलेला

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०१८

जीवन

जीवन ही मूळ गोष्ट आहे. सगळीच्या सगळी शास्त्रे, तत्त्वज्ञाने, विचार, आचार, व्यवस्था, धर्म- पंथ- संप्रदाय-, सिद्धांत, विज्ञान, रचना; हे सगळं नंतर. हे सारं जीवनातून येतं आणि जीवनासाठी असतं. ते नाकारताही येत नाही. नाकारून उपयोग नसतो. नाकारणं हा शहाणपणा नसतो. त्याचबरोबर- त्यात जीवन कोंबणं, त्यावर जीवन बेतणं, त्यानुसार जीवन घडवण्याचा प्रयत्न करणं, त्यानुसार जीवनाचा अर्थ आणि आशय लावणं; हाही शहाणपणा नसतो. म्हणूनच- मनुस्मृती वा राज्यघटना यावच्चंद्रदिवाकरौ चालत नसतात. मनुस्मृती जाळली जाते आणि राज्यघटना लिहिणाऱ्यांचा नातूच ती निरर्थक ठरवतो. आम्हाला हे कळतच नाही की मनुस्मृती तिच्या जागी योग्य होती, राज्यघटना तिच्या जागी योग्य आहे. अन दोन्हीही अपूर्ण, परिवर्तनीय, विश्लेषणीय आहेत. मूळ जीवनाला अनुलक्षून सगळ्या बाबी असायला हव्यात. आम्ही मूळ जीवनाचा विचार न करता मनुस्मृती, राज्यघटना, विज्ञान, धर्म, सत्ता, पक्ष, शिक्षण अन काय न काय; यांचाच विचार करतो. मनाला अनुकूल वाटेल त्याचा पक्ष घेऊन, त्यात जीवन कोंबण्याचा प्रयत्न करतो. मात्र आम्हाला प्रश्न पडत नाहीत की- मनुस्मृती वा विक्रमादित्य वा चाणक्य वा अशोक वा शिवाजी महाराज वा आणखीन कुणी अथवा काही; फार म्हणजे फार महान आणि पूर्ण होते तर; मानवी जीवनाचा मनोसामाजिक विकास पूर्णत्वाला का गेला नाही? किंवा आम्हाला हेही प्रश्न पडत नाहीत की; राज्यघटना महान म्हणजे अतिमहान असूनही अजून सगळ्यांना पोटभर जेवण का मिळत नाही किंवा बलात्कार का होत राहतात किंवा आणीबाणी का लावली गेली किंवा सगळ्यांचे समाधान होत का नाही किंवा पाकिस्तान वा चीनचा पुरता बंदोबस्त का होऊ शकत नाही किंवा सगळे लोक सज्जन, प्रामाणिक इत्यादी का होत नाहीत? सगळाच मुर्खपणा. बंद छत्री डोक्यावर नाचवून पावसापासून बचाव करता येत नाही. छत्री उघडावी लागते. विचार करण्यासाठी आधी विचार म्हणजे काय हे नीट समजून घ्यावे लागते. आम्ही अजून तिथवर सुद्धा पोहोचलेलो नाही आहोत.

by the way- मनू आणि ज्ञानोबा तुकोबा यांची तुलना म्हणजे effort of equating oranges with potatoes.

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०१९

शुक्रवार, १ जुलै, २०२२

अशक्य आणि आवश्यक

प्रश्न- महागाई कमी होणं शक्य आहे का?

उत्तर- महागाई कमी होणं कुठल्याही स्थितीत शक्य नाही.

प्रश्न- महागाई कमी होणं आवश्यक आहे का?

उत्तर- कुठल्याही परिस्थितीत महागाई कमी होणं आवश्यक आहे.

*******************************

प्रश्न- बायको, मुलं, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, वाचन, व्यायाम, साधना, चिंतन या गोष्टींसाठी किती वेळ देता?

उत्तर- या गोष्टींसाठी पाच मिनिटं देणंही शक्य नाही.

प्रश्न- बायको, मुलं, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, वाचन, व्यायाम, साधना, चिंतन या गोष्टींसाठी वेळ देणं आवश्यक आहे का?

उत्तर- या गोष्टींसाठी पुरेसा वेळ देणं कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे.

******************************

अशक्य आणि आवश्यक या दोन गोष्टींचा समन्वय शक्यतेच्या चौकटीत आणायचा असेल तर तिसऱ्या मार्गाची गरज असते. हा तिसरा मार्ग नियमांच्या चौकटी, नियोजनाचे आराखडे, कायद्याचे बडगे यातून जात नाही. हा तिसरा मार्ग जातो तुमच्या-माझ्या व्यवहारातून, तुमच्या-माझ्या विचारातून, तुमच्या-माझ्या दृष्टीतून आणि दृष्टीकोनातून. सगळ्या जगालाच या तिसऱ्या मार्गाची गरज नाही का?

- श्रीपाद कोठे

२ जुलै २०१४