आयबीएन-लोकमतवर सुरेखा पुणेकरची ग्रेट भेट पाहिली. अज्ञान, अशिक्षा, निरक्षरता, दारिद्र्य, बकालपणा, भोग हे सारे त्यांनी सांगितले. ते खरे आहे, दाहक आहे, भेदक आहे. तो काळ त्या अर्थाने आता थोडाबहुत बदलला असला तरीही अजूनही जगण्याची धग सोसावी लागते असे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासाठी प्रयत्नही होत आहेत. ते प्रामाणिकपणे आणि वेगाने व्हायला हवेत. आपणही आपापला वाटा उचलायला हवा.
हे सगळे असले तरीही सुरेखा पुणेकर यांनी सांगितलेली याशिवायची एक बाब मनात खोल पोहोचली. त्या काळात तमाशाला येणाऱ्या माणसांबद्दल त्या बोलल्या. त्या म्हणाल्या, `ती माणसे स्त्रीच्या अंगाला touch देखील करीत नसत. असभ्यपणा मुळीच नव्हता. पैसे देत तेव्हा कोणी पदरात टाकत. कोणी हातात देत, पण सहेतुक स्पर्श नाही. मी १०-११ वर्षांची असेन. कधी कधी फडात एखाद्याच्या मांडीवर पण जाऊन बसत असे, पण वावगा स्पर्श नाही.'
आज आम्ही कुठे आहोत? इतके खाली आम्ही का आणि कसे घसरलो? तेही इतक्या कमी काळात?
आणखीन एक बारकावा जाणवला. बोलता बोलता त्या म्हणाल्या, `ज्येष्ठ- श्रावण' आम्ही रिकामे असतो. आज आपण भारतीय कालगणना वापरीत नाही. अनेकांना भारतीय महिनेही माहित नसतात. शिवाजी महाराजांची जयंती तिथीने साजरी करावी की तारखेने असा वाद आपण घालतो. मुळात भारतीय महिने, तिथ्या, वार, नक्षत्र हे सारे आमच्या समाजात रुजलेले आणि रुळलेले आहे. तमाशा कलावंत सुद्धा त्याचाच उपयोग करतात आणि त्यांना ते समजतेही. पण आमची कथित सेक्युलर सरकारे, विचारवंत आणि स्वनामधन्य समाज सुधारक `हिंदू, ब्राम्हणी, रुढीग्रस्त' असे किंचाळत सुटतात. या देशातील मीठही अळणी लागणाऱ्या या महाभागांचे काय करावे हा खरेच मोठा यक्षप्रश्न आहे. आमच्याकडे काम करणारी कामवाली बाई, आभाळ गडगडू लागले की सहज बोलून जाते- आर्द्रा नक्षत्र लागले. अन आमचा माळी पावसाचे अंदाज सांगायला, नक्षत्रांचीच विचारपूस करतो.
यावर खरेच काही म्हणायलाच हवे का?
- श्रीपाद कोठे
९ जुलै २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा