रविवार, २४ जुलै, २०२२

विकास - विनाश

वृक्ष जन्माला येतो तेव्हा बीज नष्ट होतं. त्याकडे दोन प्रकारे पाहता येतं. बीजाचा विकास म्हणून आणि बीजाचा विनाश म्हणून. विकास म्हणून पाहिलं तर सार्थकता आणि परिपूर्णता अनुभवास येते. विनाश म्हणून पाहिलं तर निरर्थकता आणि शून्यता अनुभवास येते. `बीज' म्हणून बीजाचा विनाश होतो खरा पण जीवमान चैतन्य म्हणून ते झाडाच्या रुपात कायम असतं. झाड लयाला जाऊन बीज उरतं तेव्हाही असंच घडतं.

गर्भाचं गर्भत्व नष्ट होतं आणि मूल जन्मास येतं. मुलाचं मूलपण नष्ट होऊन युवक जन्म घेतो. युवकाचं युवापण लयास जाऊन प्रौढत्व जन्म घेतं. `काल' नष्ट होऊन आज जन्माला येतो. दृश्य अशा आकाराप्रमाणेच मनही नवीन आकार धारण करतं. कालचं मन आज असणार नाही, आजचं उद्या नसेल.

दृश्य वा अदृश्य, आकार वा निराकार, सतत परिवर्तन म्हणजेच जीवन. या परिवर्तनाकडे विनाश म्हणून पाहिलं तर विफलता हाती येते. अन विकास म्हणून पाहिलं तर पूर्णता. फक्त एकच आहे- विकास म्हणून पाहण्यासाठी लयास न जाणाऱ्या- बीजात आणि वृक्षातही कायम असलेल्या- गर्भावस्थेपासून प्रौढत्वापर्यंत न बदललेल्या- आणि त्यानंतरही कायम राहणाऱ्या जीवमान चैतन्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

- श्रीपाद कोठे

२५ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा