९०-९५ टक्के लोकांचं आयुष्य, त्यांचं जगणं साधारण सारखं असतं. सुख दु:खाचं कमीअधिक प्रमाण, संघर्षाचे टप्पे, संघर्षाचे विषय इत्यादीत थोडं इकडे तिकडे असू शकतं; पण जगण्याचा आशय आणि दिशा सारखी असते. काही थोड्या माणसांच्या बाबतीत मात्र जगण्याचा आशय आणि दिशा कधी थोडी तर कधी खूप वेगळे असतात. झोपणं, उठणं, जेवणखाण, तब्येत अशा पुष्कळशा बाह्य बाबी सारख्याच दिसतात. वरवर सारख्या असतातही. पण त्या गोष्टींचं स्थान, त्यावरचा भर, त्याबाबतचे आग्रह, प्राधान्य हे खूप वेगळे असतात. अन या व्यावहारिक बाबींशिवाय जे काही जगणं असतं ते तर अजिबातच वेगळं असतं. त्यांचे विचार, त्यांची दृष्टी, त्यांचं भावजीवन याची ९०-९५ टक्क्यातील माणसे कल्पनाही करू शकत नाहीत. या मूठभर निराळ्या लोकांची म्हणूनच फरपट होत असते. वेगळी प्रतिभा, वेगळी प्रज्ञा, वेगळ्या प्रेरणा यांनी आकार घेणारी अशी माणसे समजणं, समजून घेणं जवळपास दुरापास्त असतं. This is a creative minority. अनेकदा ९०-९५ टक्के सामान्य माणसांना त्यामुळे अपमानास्पद वाटतं. हे मूठभर लोक स्वतःला फार शहाणे समजतात असा ग्रह त्यातून निर्माण होतो. यातून उपहास, तिरस्कार, द्वेष, अढी या गोष्टी जन्म घेतात. यावर एकच उपाय असतो. तो म्हणजे, ९०-९५ टक्क्यांनी स्वतःला हे नीट समजावणे की, काही लोक वेगळे असतात. अमुक अमुक वेगळा आहे किंवा वेगळी आहे. बाकी समजून वगैरे घेणं जेवढं होईल तेवढं होईल. अन ते नाही झालं तरीही फरक पडत नाही. किंबहुना समजून घेण्याचा आग्रह वगैरे नसावाच. कारण कोण कोणाला समजून घेऊ शकतो? समजून घेणे ही मुळातच फार मर्यादित गोष्ट आहे. माणसांच्या वेगळेपणाची जाणीव आणि त्याचा स्वीकार हे मात्र सगळ्यांनाच करता येण्यासारखे आहे. तीच माणसाच्या परिपक्वतेची एक कसोटीही आहे.
- श्रीपाद कोठे
३० जुलै २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा