जीवन ही मूळ गोष्ट आहे. सगळीच्या सगळी शास्त्रे, तत्त्वज्ञाने, विचार, आचार, व्यवस्था, धर्म- पंथ- संप्रदाय-, सिद्धांत, विज्ञान, रचना; हे सगळं नंतर. हे सारं जीवनातून येतं आणि जीवनासाठी असतं. ते नाकारताही येत नाही. नाकारून उपयोग नसतो. नाकारणं हा शहाणपणा नसतो. त्याचबरोबर- त्यात जीवन कोंबणं, त्यावर जीवन बेतणं, त्यानुसार जीवन घडवण्याचा प्रयत्न करणं, त्यानुसार जीवनाचा अर्थ आणि आशय लावणं; हाही शहाणपणा नसतो. म्हणूनच- मनुस्मृती वा राज्यघटना यावच्चंद्रदिवाकरौ चालत नसतात. मनुस्मृती जाळली जाते आणि राज्यघटना लिहिणाऱ्यांचा नातूच ती निरर्थक ठरवतो. आम्हाला हे कळतच नाही की मनुस्मृती तिच्या जागी योग्य होती, राज्यघटना तिच्या जागी योग्य आहे. अन दोन्हीही अपूर्ण, परिवर्तनीय, विश्लेषणीय आहेत. मूळ जीवनाला अनुलक्षून सगळ्या बाबी असायला हव्यात. आम्ही मूळ जीवनाचा विचार न करता मनुस्मृती, राज्यघटना, विज्ञान, धर्म, सत्ता, पक्ष, शिक्षण अन काय न काय; यांचाच विचार करतो. मनाला अनुकूल वाटेल त्याचा पक्ष घेऊन, त्यात जीवन कोंबण्याचा प्रयत्न करतो. मात्र आम्हाला प्रश्न पडत नाहीत की- मनुस्मृती वा विक्रमादित्य वा चाणक्य वा अशोक वा शिवाजी महाराज वा आणखीन कुणी अथवा काही; फार म्हणजे फार महान आणि पूर्ण होते तर; मानवी जीवनाचा मनोसामाजिक विकास पूर्णत्वाला का गेला नाही? किंवा आम्हाला हेही प्रश्न पडत नाहीत की; राज्यघटना महान म्हणजे अतिमहान असूनही अजून सगळ्यांना पोटभर जेवण का मिळत नाही किंवा बलात्कार का होत राहतात किंवा आणीबाणी का लावली गेली किंवा सगळ्यांचे समाधान होत का नाही किंवा पाकिस्तान वा चीनचा पुरता बंदोबस्त का होऊ शकत नाही किंवा सगळे लोक सज्जन, प्रामाणिक इत्यादी का होत नाहीत? सगळाच मुर्खपणा. बंद छत्री डोक्यावर नाचवून पावसापासून बचाव करता येत नाही. छत्री उघडावी लागते. विचार करण्यासाठी आधी विचार म्हणजे काय हे नीट समजून घ्यावे लागते. आम्ही अजून तिथवर सुद्धा पोहोचलेलो नाही आहोत.
by the way- मनू आणि ज्ञानोबा तुकोबा यांची तुलना म्हणजे effort of equating oranges with potatoes.
- श्रीपाद कोठे
९ जुलै २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा