बुधवार, १३ जुलै, २०२२

Philosophy of science

उद्या इसरोची चांद्रयान २ मोहीम सुरू होते आहे. मानवी बुद्धी, प्रतिभा आणि कुशलता यांचा पुढील टप्पा म्हणून त्याचे सानंद स्वागत. मात्र या मोहिमेची जी चर्चा सुरू आहे ती भारताला/ माणसाला काय मिळेल याचीच सुरू आहे. माती, पाणी, खनिजे, वसाहत यांचीच चर्चा. आज आमच्या सगळ्या विचारांचाच नव्हे तर विज्ञानाचाही एकमेव संदर्भ - आमचे भोग, अधिकाधिक भोग; आमची साधने, अधिकाधिक साधने; आणि या भोग आणि साधनांवर आणि त्या माध्यमातून माणसांवर ताबा, हाच झालेला आहे. कदाचीत यातून एखादं नवीन विश्व आकारास येईल. पण पुढे काय? यातून साध्य काय होईल? आकारास येऊ शकणारं संभाव्य विश्व कोणत्या माणसांचं राहील? आजचा माणूस त्यात नक्कीच नसेल. माणूस हा अमुक तारखेला अस्तित्वात येऊन, अमुक तारखेला अंतर्धान पावणारा प्राणी असेल तर पुढच्या मानवाच्या संभाव्य विश्वाशी त्याचा काय संबंध? त्यासाठी आजच्या मानवाने का कष्ट घ्यावे किंवा त्या भावी विश्वाच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा आनंद का मानावा किंवा आपला वेळ, पैसा, बुद्धी, कष्ट त्यासाठी खर्च का करावे? माणूस ही जर एक अनादी अनंत जीवमान प्रक्रिया असेल तर त्याचा हेतू काय? तो हेतू अशा चार दोन वैज्ञानिक पावलांनी किती आणि कसा साध्य होणार? मानवी बुद्धी आणि त्याचा विलास असणारे विज्ञान यांचा मानवी जीवनाशी संबंध काय? तो संबंध उपभोग आणि उपभोग साधने यांच्यातूनच पाहायचा का? तेच पूर्णत्व म्हणता येईल का? या चांद्रयान २ च्या चर्चेतच एक विषय आला अवकाश विज्ञानाचा. पर्यावरण, त्याच्या घडामोडी आम्हाला कळू शकतात. ग्लेशियर वितळत आहेत हे आम्हाला अवकाश विज्ञानामुळेच कळू शकले. खूप छान. पण हे ग्लेशियरचे वितळणे थांबवण्याची इच्छा आणि संकल्पशक्ती अवकाश विज्ञान आम्हाला देऊ शकले का? हा जो paradox आज आमच्यापुढे आहे तो दूर करण्यासाठी, philosophy of science चा विचार मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. आज science of philosophy, technique of philosophy, science and technique of spirituality; यांचा विचार होतो. त्याच धर्तीवर philosophy of science हाही विचार गांभीर्याने होणे, होत राहणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

१४ जुलै २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा